Friday, 12 July 2013

समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र

BY:PROF HARI NARKE




{महाराष्ट्र टाइम्स, दि.२९ जून २०१३, संपादकीय पान, सर्व आवृत्त्या}

समाजक्रांतीचे उर्जाकेंद्र
प्रा. हरी नरके


जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. 
..........................................................
आधुनिक भारताच्या सामाजिक जडणघडणीत महाराष्ट्राचा, विशेषत: पुण्याचा, लक्षणीय वाटा आहे. १९व्या शतकात पुणे हे भारतीय प्रबोधन चळवळींचे केंद्र होते. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकहितवादी, न्या. रानडे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, आगरकर, महर्षी कर्वे, बायजा कर्वे, महर्षी शिंदे आदींनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींना ऊर्जा पुरवली. पुण्यातील त्यावेळच्या जुन्या गंज पेठेतील फुलेवाडा सुमारे ५० वर्षे सामाजिक चळवळींना रसद पुरवित होता. या वाड्याच्या खाणाखुणा पाहताना या अभिमानास्पद इतिहासाचा पोवाडा आपल्या कानात गुंजत राहतो. 

पूर्व पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक पर्यावरण संमिश्र आणि विविधतेने नटलेले आहे. सर्व जाती, धर्मांचे कष्टकरी या भागात राहतात. तेथील वाड्यातच जोतिराव फुले यांचा ११ एप्रिल १८२७ रोजी जन्म झाला. मिशनऱ्यांच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. १८४८मध्ये त्यांनी देशातील मुलींची पहिली भारतीय शाळा सहकाऱ्यांच्या मदतीने भिडे वाड्यात सुरू केली, तेव्हा सावित्रीबाई याच वाड्याचा उंबरठा ओलांडून सार्वजनिक जीवनात पहिले पाऊल टाकत्या झाल्या. भारतीय स्त्रियांचे सार्वजनिक जीवन अशा रीतीने येथून सुरू झाले. भारतातील प्रौढ साक्षरता अभियान १८५४मध्ये याच वाड्यात सुरू झाले. रात्रीच्या स्त्री-पुरुषांच्या दोन पहिल्या शाळा याच वाड्यात सुरू झाल्या. 

विधवांच्या बाळंतपणाची सोय करणारे केंद्र आणि देशातील पहिला भारतीय माणसांनी चालवलेला अनाथाश्रम (बालहत्या प्रतिबंधक गृह) येथेच सुरू झाला. अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाला पाण्याचा हक्क देणारा पहिला हौद याच वाड्यात आहे. १८७३ साली याच घरात स्थापन करण्यात आलेला सत्यशोधक समाज देशातील सर्वदूर ग्रामीण भारतात पसरलेले पहिले जनआंदोलन ठरले. येथेच जोतिरावांनी मराठीतील पहिले आधुनिक नाटक 'तृतीय रत्न' लिहिले. १८६९ साली शिवरायांचा पोवाडामय चरित्रपट येथेच निर्माण झाला. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांच्या मुक्ती चळवळींना अर्पण करण्यात आलेला 'गुलामगिरी' हा ग्रंथ येथेच जन्माला आला. 'शेतकऱ्यांचा असूड' आणि सार्वजनिक सत्यधर्माचे क्रांतिकारक तत्त्वज्ञान येथेच साकारले. आयुष्यातील ५० वर्षे सामाजिक परिवर्तनाची लढाई लढून जोतिराव-सावित्रीबाई या दोघांचेही पार्थिव येथेच विसावले. जोतिरावांची समाधी याच वाड्यात आहे. 

राज्य सरकारने १९६७ साली हे घर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले. १९९३ साली छगन भुजबळ यांच्या पुढाकारातून त्याची फेरउभारणी करून ते तत्कालीन राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. या वाड्याला राष्ट्र्पतींनी समतेचे राष्ट्रतीर्थ म्हणून 'समता भूमी' घोषित केले. सुमारे १४० वर्षे जुन्या असलेल्या या वाड्यात जोतिरावांचे वडिलोपार्जित घर, ज्याचा जुना गंज पेठ, घर नं. ३९५, होता ते आणि त्यांनी स्वकष्टार्जित कमाईतून खरेदी केलेले घर यांचा समावेश आहे. जोतिरावांच्या नोंदणी केलेल्या मृत्युपत्रात त्यांनी या घराचे सर्व तपशील दिले आहेत. 

यातले त्यांनी नवे बांधलेले घर ११ खणांचे होते. त्याच्या पूर्वेला रस्ता, पलीकडे तुंबडीवाले बैराग्याची आणि बापूभाई पिठवाल्याची घरे, पश्चिमेला बोळापलीकडे राजाराम गोविंदराव फुले यांची दोन घरे, दक्षिणेला बोळापलीकडे रामचंद्र किसन कुंभार यांचे घर व बाबाजी राणोजी फुले यांची बखळ; तसेच उत्तरेला रस्ता आणि नगरपालिकेचे पाण्याचे दोन हौद होते. यातील काही जागा वडिलोपार्जित, काही जोतिरावांनी लिलावात खरेदी केलेली, तर काही खरेदीद्वारे घेतलेली होती. जोतिरावांचे घर नं. ३९४, हे तीन खणांचे दीड मजल्याचे होते. त्याच्या पूर्वेला रा. कि. कुंभार, पश्चिमेला खंडोजी कृष्णाजी व बाबाजी राणोजी फुले, दक्षिणेला सटवाजी कृष्णाजी फुले यांची घरे. तर उत्तरेला बा. रा. फुले यांची बखळ होती. जोतिरावांची स्वत:ची खरेदी केलेली बखळ जागा ४३ फूट लांबी २८ फूट रुंद होती. याशिवाय आणखी दोन बखळ जागा त्यांनी विकत घेतल्या होत्या. १८९४पर्यंत ही घरे जोतिरावांच्या नावे होती. पुढे १९०७पर्यंत ती यशवंत फुले, त्यानंतर ती १९०९ ते १९१० याकाळात चंद्रभागा यशवंत फुले यांच्या नावे होती. त्यांनी २८ ऑक्टोबर १९१०ला ही वास्तू देडगेंना १०० रुपयांना विकली. त्यांच्याकडून ती १९२३पासून सावतामाळी फ्री बोर्डिंगने खरेदी केली. १९६७ साली महाराष्ट्र सरकारने ही घरे ताब्यात घेतली. 

जोतिराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले. त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केले. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे कार्यकारी संचालक होते. ही कंपनी बांधकाम आणि इतर व्यापारी क्षेत्रात कार्यरत होती. पुणे-नगर रस्त्यावरील येरवड्याचा (बंडगार्डन) पूल बांधण्याच्या १८६९ सालच्या कामाचे उपकंत्राट त्यांच्या या कंपनीला मिळाले होते. या कामाला खडी, चुना, आणि दगड पुरविण्याचा मुख्य ठेका त्यांच्याकडे होता. १०० वर्षे मुदतीचा हा पूल आज १४४ वर्षांनंतरही मजबूत आहे. जोतिरावांच्या कंपनीने केलेली महत्त्वाची कामे म्हणजे कात्रजचा बोगदा आणि खडकवासला धरणाचा कालवा होय. जोतिरावांच्या या कंपनीतर्फे पुस्तक प्रकाशनाचेही काम केले जाई. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांच्या 'वज्रसूची' या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक तुकाराम तात्या पडवळ यांनी १८६५ साली लिहिले. जोतिरावांनी ते 'जातीभेद विवेकसार' प्रकाशित केले. या कंपनीचे पुस्तकविक्री केंद्र होते. सोन्याचे दागिने बनविण्याचे साचे विकण्याची एजन्सी जोतिरावांकडे होती. ही कंपनी भाजीपाला विक्री व पुरवठा यांचेही काम करीत असे. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. 

स्वत:च्या शाळांमध्ये त्यांनी वयाच्या सहाव्या वर्षांपासून सर्व मुला-मुलींना शेती व उद्योगाचे शिक्षण सक्तीचे केले होते. १५० वर्षांपूर्वी कृषी-औद्योगिक शिक्षणाचा आग्रह धरणारे फुले हे आधुनिक भारताच्या कृषी-औद्योगिक प्रगतीचे द्रष्टे शिल्पकार ठरतात. भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतिरावांचेच प्रोत्साहन होते. टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यातही तेच दोघे पुढे होते. १८६९ साली जोतीरावांनी शिवचरित्र लिहिले. १८८५ साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणून लोकमानसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत. 

शरीरसंबंध हेच लग्न?

BY: PROF HARI NARKE






वटसावित्रीचा सण नुकताच साजरा करण्यात आला. युनोने हाच दिवस नेमका विधवादिन म्हणून घोषित केला. दरम्यान संमतीने ठेवलेले शरीरसंबंध हेच लग्न होय, हा मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय खळबळ माजवून गेला. चित्रपट अभिनेता शाहरूख खानने बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याची अफवा उठवली गेली. या सार्‍या घटनांमुळे समाज आणि स्त्रिया ही चर्चा पुन्हा एकदा ऎरणीवर आलेली आहे.
  शाहरूख खान याने गर्भलिंग चाचणी केल्याची बातमी मिड- डे या इंग्रजी वृत्तपत्राने दिली होती. हीच बातमी काही मराठी वृत्तपत्रांनीही दिली. नंतर चॅनलवाल्यांनी ही बातमी चालविली.सतत प्रसिद्धीच्या झोताची चटक लागलेल्या एका महिला कार्यकर्तीने तर कोणतीही शहानिशा न करता यानिमित्ताने चमकून घेण्यासाठी दवाखाना आणि किंग खानवर सरळ कारवाईची मागणीच केली. माझाच "तारा अजिंक्य" या तोर्‍यात उठसूठ कोणावरही बदनामीकारक आरोपांचा  "वर्षाव" करण्याची ही उथळ वॄती स्त्री चळवळीला मारक ठरते. आता दवाखान्याने मानहाणीची नोटीस देवून बाईंच्या माफीची मागणी केलेली आहे.
मुळात शहारूख खानने कुठे तरी मला मुलगा होणार आहे,असे वाक्तव्य केले होते,त्यावरून साप,साप म्हणून भुई धोपटण्याचा हा प्रकार घडला.मात्र शहारूख खान याने हे वक्तव्य कुठे आणि कधी केले होते,याची माहिती कोणाकडेही नव्हती.
भारतात ज्या दिवशी असंख्य सौभाग्यवती वडाला फेर्‍या मारीत होत्या तोच दिवस नेमका युनोने विधवादिन म्हणून घोषित केला.भारतीय संस्कृतीमध्ये मिथक कथांना खूप महत्व आहे. नवर्‍याचे प्राण यमाकडून परत आणणार्‍या सावित्रीची कथा महाभरतात आहे. हजारो वर्षे तिच्या प्रभावाने अनेक स्त्रिया वटसावित्रीची ही पुजा  करीत आल्यात. सालाबादप्रमाणे अनेक भाविक आणि उच्चशिक्षित स्त्रियांनी हा सण उत्साहात  साजरा केला. आमच्याकडे येणारी मदतनिस मुलगी सकाळीच माझ्या पत्नीला विचारीत होती, "ताई, तुम्ही का जात नाही वडाला फेर्‍या मारायला?" माझी बायको म्हणाली, "माझा आणि माझ्या नवर्‍याचा या प्रकारांवर विश्वास नाही. मुळात आमचा पुनर्जन्मावरच विश्वास नाही. हा जन्म आनंदात जावा एवढीच आमची मनापासूनची धडपड आहे."
तिला काही हे पटलेले दिसले नाही. "असे कुठे असते काय? यांचे आपले जगावेगळे काहीतरीच!" असे काहीसे भाव तिच्या चेहर्‍यावर होते.
कुमुद पावडे यांच्या "अंत:स्फोट" मध्ये एक प्रसंग आहे. त्यांच्या आत्याला चांगली ४० वर्षे संसार केल्यानंतर नवर्‍याने सोडले. कारण दिले, "बायको आवडत नाही!"आत्या माहेरी भावाकडे येऊन राहू लागली. वटसावित्रीच्या दिवशी भक्तीभावाने वडाला सात फेर्‍या मारून "हाच नवरा सात जन्म मिळू दे"अशी प्रार्थना करून आली. कुमुदने आत्याला विचारले,"ज्या नवर्‍याने तुला सोडले, तो कशाला सात जन्म हवाय तुला?" आत्या म्हणाली, त्याने त्याचा धर्म सोडला, आपण कशाला आपला धर्म सोडायचा? मी फेर्‍या मारणारच!" कुमुदने कपाळावर हात मारुन घेतला.
आत्याच्या नवर्‍याने दरम्यान दुसरी बायकोही केली.तरी आत्याच्या फेर्‍या चालूच! कुमुद म्हणाली," अगं आत्या, तू म्हणतेस हाच नवरा सात जन्म हवा, त्याची दुसरी बायको म्हणते हाच नवरा सात जन्म हवा, म्हणजे हीच सवत तुला सात जन्म मिळणार!" आत्या हादरली, म्हणाली "नको गं बाई, ही सवत मला नको." आत्याने वडाला फेर्‍या मारायचे तात्काळ बंद केले.
मध्यंतरी आम्ही एक सर्वेक्षण केले होते.यादिवशी वडाला फेर्‍या मारणार्‍या स्त्रियांच्या आम्ही मुलाखती घेतल्या. त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली. यात मुद्दाम शहरी,ग्रामीण, निरक्षर ते पीएच.डी., मजुरी करणार्‍या ते आय.ए.एस.,वय वर्षे १५ते ८५ असा सगळा मोठा स्त्री गट घेतला होता.
तुम्ही दबावापोटी ही पूजा करता की मनापासून करता? हाच नवरा तुम्हाला सात जन्म खरेच हवाय का? या प्रश्नावर २५% महिलांचे उत्तर होते, "हो. नवरा खूप छान आहे. आमचा संसार खूप सुखाचा आहे.ही पूजा मी मनापासून करते."
५३% महिला म्हणाल्या, सात जन्माचे सोडा, याच जन्मात नवरा नको झालाय. उल्ट्या फेर्‍या मारायची सोय असती तर आत्ताच मारल्या असत्या.पण काय करणार? फेर्‍या नाही मारल्या तर नवरा मारहाण करणार.शेजारीण संशय घेणार. एव्हढा ताप कुणी सांगितलाय?फेर्‍या मारा मोकळे व्हा."
१३% महिला म्हणाल्या," ही आमची गुंतवणूक आहे. लग्न झाले तेव्हा नवरा खूप वाईट वागायचा. २०/२५ वर्षे खूप मेहनत घेतली. नवर्‍याचे लाड केले. कायदा, नातेवाईक, संघटना सारे फंडॆ वापरले. नवरा आता दुरूस्त झालाय. आता हाच सात जन्म हवा. दुसरा करायचा म्हणजे कोणताही असला तरी भारतीय "नग"असणार. म्हणजे पुन्हा उमेदीची २०/२५ वर्षे वाया घालवावी लागणार. त्यापेक्षा आमची ही गुंतवणूक कामी येईल."
६% बायका म्हणाल्या," आम्ही मनापासून पूजा करतो. आमची  देवाला एकच प्रार्थना आहे. देवा एक मेहरबानी कर.हाच जन्म सातवा घोषित कर."                                                                                                                                                                                                         शरीरसंबंध हेच लग्न होय, या तामिळनाडूमधील मद्रास उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालपत्राने कुटुंबसंस्थेत भुकंप घडवून आणला आहे. कोईमतूर येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये एका महिलेने पोटगीसाठी प्रकरण दाखल केले होते. नवर्‍याचे चपलांचे दुकान आहे व त्याचे उत्पन्न २५ हजार आहे, असा दावा तिने केला होता. या नवर्‍यापासून दोन मुले जन्माला आल्याचा तिने दावा केला होता. दुसरीकडे नवर्‍याने सदर अर्जदार ही आपली लग्नाची बायको नसल्याचा बचाव सादर केला होता.पतीने तो दुकानदार नसून, चपलांच्या गोडाऊनमध्ये  नोकर असल्याचे  न्यायालयाच्या निदर्शनास आणले होते. हे दोघेही  मुस्लिम धर्माचे आहेत.कौटुंबिक न्यायालयाने   दोन्ही मुलांची पोटगी म्हणून पित्याने  ५00 रुपये रक्कम द्यायचा आदेश दिला. पण महिला ही लग्नाची बायको असल्याचे सिद्ध करू न शकल्याने तिला पोटगी नाकारली. या निकालाविरुद्ध महिलेने मद्रास उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपिलाच्या सुनावणीला सदर पुरुष हजर राहिला नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने एकतर्फी निर्णय दिला आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                 
दुसर्‍या अपत्याच्या जन्मावेळी त्या महिलेचे सीझरिंग ऑपरेशन करावे लागले होते. त्यासाठी संमतीपत्रावर प्रतिवादीने नवरा म्हणून स्वाक्षरी केली होती. त्यामुळे उच्च न्यायालयाने महिलेला पत्नीचा दर्जा दिला.निकालात न्यायालय असे म्हणते, की दोन्ही व्यक्ती एकत्र होत्या व संमतीने त्यांनी शरीरसंबंध केला होता. त्यामुळे संमतीने शरीरसंबंध झाला, त्यावेळी महिलेला पत्नीचा दर्जा प्राप्त झाला आणि पुरुषाला पतीचा दर्जा प्राप्त झाला. एवढेच नव्हे, तर या दोन व्यक्तींमधील विवाह हा नोंदणीकृत झाला नसला तरीदेखील सदर विवाह वैध आहे. वैध विवाहासाठी असणारी सप्तपदी किंवा  कबूलनामा अशा गोष्टी महत्त्वाच्या नसून, शरीरसंबंध हा महत्त्वाचा असल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे.  हिंदू विवाह कायद्यामध्ये विवाह पूर्ण होण्यासाठी सप्तपदी होण्याचे बंधन आहे.
पारसी विवाहामध्येदेखील आशीर्वाद नावाचा महत्त्वाचा विधी कायद्याने आखून दिला आहे. अन्य धार्मिक कायद्यांमध्ये आणि विशेष विवाह कायद्यामध्येही आवश्यक गोष्टींची यादी आहे. परंतु या निकालपत्रामुळे या सर्व गोष्टी गौण झाल्या असून, शरीरसंबंध हा एकच निकष महत्वाचा बनला आहे.                                                                                                                                   आजपर्यंत कायद्याने विवाहपूर्व संबंधांना आणि विवाहबाह्य संबंधांना कधीच मान्यता दिलेली नाही. विविध कायद्यांतील तरतुदींत अशा कृत्यांना प्रतिबंध केला असून, तो गुन्हा मानलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये  मद्रास उच्च न्यायालयाच्या या  निकालपत्राने बरेच गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.हिंदू विवाह कायदा १९५५ सालचा आहे. सर्वच कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करणे गरजेचे असते. आज आपल्या समाजामध्ये विवाहाशिवाय एकत्र राहणारी काही तरूण जोडपी आहेत. "लिव्ह इन रिलेशनशिप"च्या या वाढत्या प्रकाराला कायद्याच्या चौकटीत बसवण्याचा मुद्दा विचारार्थ आहे. मद्रास उच्च न्यायालयाचे हे निकालपत्र सर्वोच्च न्यायालयात टिकेल किंवा नाही हेही पाहावे लागेल. भारतीय विवाह संस्थेच्या गढीला या निकालाने जोरदार हादरा दिला एव्ह्ढे मात्र खरे.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,

Friday, 31 May 2013

मराठीला अभिजात दर्जा - एक मिशन

  BY : PROF. HARI NARKE

प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आज अभिजात मराठी भाषा समितीची शेवटची बैठक झाली.आम्ही तयार केलेल्या १२७ पानांच्या अंतिम अहवालाला मान्यता देण्यात आली.बैठकीला समितीचे सदस्य प्रा. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा.मधुकर वाकोडे, प्रा. आनंद उबाळे,प्रा. मैत्रेयी देशपांडॆ. प्रा.कल्याण काळे,सतीष काळसेकर, आणि सर्व शासकीय संस्थांचे प्रमुख उपस्थित होते.
गेल्या वर्ष-सव्वा वर्षात आम्ही तमाम ११ कोटी मराठी भाषकांच्या वतीने मराठीला "अभिजात" दर्जा मिळण्यासाठी हा प्रस्ताव तयार केलेला आहे.तो आता राज्य  सरकारतर्फे भारत सरकारकडे रितसर सादर करण्यात येईल. त्याची छाननी केल्यानंतर भारत सरकार मराठीला "अभिजात" दर्जा दिल्याची योग्यवेळी घोषणा करु शकेल.
हा अहवाल तयार करण्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य मिळाले. आपले मार्गदर्शन आणि शुभेच्छा याबद्दल धन्यवाद.
अहवालाच्या प्रस्तावनेत अध्यक्ष प्रा. पठारे म्हणतात, "हा मसुदा तयार करण्यात सर्व सदस्यांचे मन:पुर्वक सहकार्य लाभले.प्रत्यक्ष मसुदा तयार करण्याचे किचकट आणि बौध्दिक परिश्रमांची मागणी करणारे काम अतिशय मन:पुर्वक प्रा. हरी नरके यांनी केले हे मी खास करून नमूद करतो."
मायमराठीची प्रतिष्ठा उंचावणारे काम
"एक मिशन" म्हणून करण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो.
केंद्र सरकारकडून मराठीला हा दर्जा मिळाल्यास १.मराठी ही श्रेष्ठ दर्जाची राष्ट्रीय भाषा असल्याचे शिक्कामोर्तब होईल... २..मराठीची जागतिक प्रतिष्ठा उंचावेल...३.मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी भारत सरकारकडून राज्याला दरवर्षी किमान १००कोटी ते ५०० कोटी रूपये मिळतील...४...मराठीचा अभ्यास करण्यासाठी देशातील सर्व विद्यापिठांना मराठी अध्यासन स्थापन करण्यासाठी विद्यापिठ अनुदान आयोग भरीव निधी देईल...५..असा दर्जा मिळवणारी मराठी ही तमीळ,संस्कृत,तेलगू, कन्नड आणि मळ्यालम नंतरची सहावी भाषा असेल...६..७..८..९....

Sunday, 5 May 2013

'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर'


सोमवार 29 एप्रिल 2013


श्री आलोक जत्राटकर,

उपकुलसचिव, शिवाजी विद्यापिठ,कोल्हापूर यांच्या सौजन्याने....



कोल्हापूरच्या राजर्षी शाहू स्मारक सभागृहात आज सायंकाळी प्रा. हरी नरके सर यांचे आणखी एक अभ्यासपूर्ण, चिंतनपर व्याख्यान ऐकण्याचा योग आला. समता प्रबोधिनी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट भारतीय छात्र संसद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतीशेष शामराव जाधव स्मृती व्याख्यान-2013 चे पहिले पुष्प आज प्रा. नरके यांनी गुंफले. यावेळी एमआयटीचे राहुल विश्वनाथ कराड उद्घाटक म्हणून तर डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक वर्षे खाजगी सचिव असणाऱ्या परंतु प्रकाशझोतापासून दूर असलेल्या शामराव जाधव यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा व्याख्यानमालेचा उपक्रम हाती घेतला आहे. 'आम्हा भारतीयांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर' असा यंदाच्या पहिल्या व्याख्यानाचा विषय होता.
प्रा. हरी नरके यांनी दीनदलितांचे कैवारी म्हणूनच केवळ डॉ. आंबेडकरांकडे पाहणे हा त्यांच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा अपमान असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे बाबासाहेबांनी एक सच्चा भारतीय व राष्ट्रीय नेता म्हणून भारतीय समाजजीवनावर करून ठेवलेल्या अनंत उपकारांची आणि त्यांच्या द्रष्टेपणाची अनेक उदाहरणे, त्यांच्या भाषणांचे अनेक दाखले देऊन अतिशय सूत्रबद्ध मांडणी केली.
प्रा. नरके यांनी भाषणाच्या सुरवातीलाच डॉ. रामचंद्र गुहा यांनी 'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या ग्रंथात डॉ. आंबेडकरांचा आघाडीचे शिल्पकार म्हणून उल्लेख केल्याचे सांगितले. प्रा. नरके यांचे भाषण त्यांच्याच शब्दांत---
दि. 4 एप्रिल 1938 रोजी आमदार म्हणून केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी कोणाही नागरिकाच्या भारतीयत्वाला हिंदू, मुस्लीम अथवा तत्सम दुसरी पर्यायी ओळख असू नये किंवा असताच कामा नये, असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. इथला नागरिक हा सर्वप्रथम भारतीयच असला पाहिजे, शेवटीही भारतीयच असला पाहिजे आणि फक्त भारतीय आणि भारतीय हीच त्याची ओळख असली पाहिजे. अनुसूचित जाती-जमातींसाठी बाबासाहेबांनी केलेले काम वंदनीयच आहे, पण त्यांना केवळ त्याच चौकटीत बंदिस्त करणे अन्यायकारक आहे. केंद्रीय कामगारमंत्री म्हणून डॉ. आंबेडकरांनी काम केल्याचे सर्वांना माहिती आहे. पण त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पाटबंधारे विमान वाहतूक आदी आठ ते नऊ खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभारही बाबासाहेबांनी यशस्वीपणे सांभाळल्याचे फार कमी लोकांना ज्ञात आहे. जो मंत्री खऱ्या अर्थाने वजनदार आहे, त्याच्याकडेच अशी महत्त्वाची, जबाबदारीची खाती दिली जात असतात. कोणतीही पूर्वपिठिका अथवा पाठबळ नसताना बाबासाहेबांवर इतकी मोठी जबाबदारी सोपविण्यामागे ते ती यशस्वी करणारच, हा एक प्रकारचा विश्वासच यंत्रणेला होता. बाबासाहेबांच्या अभ्यासूपणाची तर कमालच होती. प्रत्यक्ष नेहरूंसमोर जायला न कचरणारे सचिव बाबासाहेबांनी बोलावल्याचे समजले की अस्वस्थ होत, इतका आदरयुक्त दरारा त्यांच्याविषयी प्रशासनात होता. विभागाच्या चार ओळींच्या नोटवर सचिवांपर्यंत स्वाक्षरी होऊन आल्यानंतरही त्यावर सोळा पानांची नोट लिहीणारा अभ्यासू मंत्री म्हणजे केवळ डॉ. आंबेडकरच होते. आजच्या केवळ कोंबडा उठविणाऱ्या मंत्र्यांच्या जमान्यात असं उदाहरण चुकूनही सापडण्याची शक्यता नाही.
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वीजनिर्मिती, सिंचन सुविधांचा विकास, अन्नधान्य उत्पादनाची वृद्धी आणि दळणवळणाच्या साधनांची, विशेषतः जलवाहतुकीचा विकास व विस्तार या सर्व बाबी परस्परांशी निगडित व अवलंबून असून त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची सूचना बाबासाहेबांनी 1942 साली केली होती, हे त्यांचे द्रष्टेपण होते.
1942 साली आंबेडकरांनी सन 2000 मध्ये भारतीयांना किती पाण्याची आवश्यकता असेल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी काय करावे लागेल, याचा आराखडा तयार करण्याची सूचना विभागाला केली होती. त्याचप्रमाणं 25 ऑक्टोबर 1943 रोजी ऊर्जा विभागाच्या संदर्भात त्यांनी केलेल्या भाषणामध्ये 'भारतातल्या लोकांना स्वस्त वीज मिळता कामा नये; तर जगातली सर्वात स्वस्त वीज मिळाली पाहिजे,' असे म्हटले होते. ज्या माणसाच्या पूर्वीच्या कित्येक पिढ्या थेंब थेंब पाण्यासाठी आक्रोशल्या होत्या आणि ज्याच्या कित्येक पिढ्यांनी केवळ अंधारच पाहिला होता, तो माणूस या देशाच्या पुढच्या साठ  वर्षांच्या पाण्याचे आणि ऊर्जेचे नियोजन करत होता, सर्वंकष पायाभूत सुविधा विकासाची जबाबदारी उचलत होता, हा एक प्रकारे नियतीवर त्यांनी उगवलेला वेगळ्या प्रकारचा 'सूड'च होता. 5 सप्टेंबर 1943 रोजी कटक येथील भाषणात बाबासाहेबांनी जलसाक्षरता आणि ऊर्जासाक्षरतेची गरज प्रतिपादित केली होती. एकविसाव्या शतकात अलीकडे या संज्ञांचा वापर होऊ लागला असताना 1943मध्ये त्यांचं सूतोवाच करणं, हे बाबासाहेबांच्या द्रष्टेपणाचं आणखी एक उदाहरण आहे.
प्रो. हर्ट या अमेरिकन अभ्यासकानं त्याच्या पुस्तकात भारतात पाटबंधारे विकास आणि व्यवस्थापनाची राजकीय इच्छाशक्ती डॉ. आंबेडकर या मंत्र्यांनी दाखविली नसती तर पुढची 25-30 वर्षे भारतात या क्षेत्राचा विकास खुरटला असता, असे म्हटले आहे. नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाही देशात सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनींच सन 1942मध्ये मांडली होती, जिच्या उपयुक्ततेवर नुकतेच सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं.
दि. 27 जानेवारी 1919 रोजी साऊथबरो कमिशनसमोर साक्ष देत असताना केवळ दलित-आदिवासींनाच नव्हे, तर तमाम भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, असे ठासून सांगणारे बाबासाहेब हे पहिले भारतीय होते. त्यानंतर पुढं दहा वर्षांनी काँग्रेसनं सन 1929मध्ये तसा ठराव केला. म्हणजे बाबासाहेब त्यांच्याही 10 वर्षं पुढंच होते.
पाकिस्तान आणि भारत हे दोन्ही देश एकाच दिवशी स्वतंत्र झाले असले तरी आंबेडकरांच्या राज्यघटनेमुळं इथली लोकशाही सार्वभौम आणि सुदृढ झाली, आणि पाकिस्तानात मात्र ती लष्कराच्या ताब्यात गेली. पाकिस्तानात एका व्याख्यानाच्या निमित्तानं गेलो असताना तिथल्या लोकांनी 'हमें भी एक डॉ. आंबेडकर चाहिए होते।' अशा शब्दांत खंत व्यक्त केली. नेपाळच्या संसदेला संबोधित करण्यासाठी गेलो असता तिथल्या लोकांनीही आज डॉ. आंबेडकर असते, तर त्यांनी नेपाळची राज्यघटना कशी लिहीली असती, या विषयावर मत मांडण्यास सांगितलं, यापेक्षा आणखी मोठी पोचपावती त्यांच्या कार्याला दुसरी कोणती असू शकेल?
भारतीय राज्यघटनेची सुरवातच 'आम्ही भारताचे लोक..' अशी करून लोकशाहीमध्ये जनतेचं सर्वोच्च स्थान त्यांनी अधोरेखित केलं. 1946मध्ये घटना परिषदेमध्ये 'देव विरुद्ध लोक' असा प्रस्ताव मतास टाकण्यात आला आणि तिथं लोकांचा विजय झाला. हा केवळ बाबासाहेबांचा नव्हे, तर भारताच्या लोकशाहीचा विजय होता. परंपरा आणि परिवर्तनाचं महासूत्र राज्यघटनेत ओवण्याचं महाकठीण काम बाबासाहेबांनी अथक परिश्रमांनी साकार केलं. इथल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देऊन जणू त्यांनी या प्रत्येक नागरिकाची देशाच्या सातबाऱ्यावर नोंदच केली. 1918 साली लिहीलेल्या 'स्मॉल होल्डींग्ज इन इंडिया ॲन्ड देअर रिमेडीज्' या शोधप्रबंधात देशाच्या शेती क्षेत्रासमोरील आव्हानांचा सांगोपांग आढावा त्यांनी घेतला होता. शेती क्षेत्राचं योग्य व्यवस्थापन वेळीच केलं नाही, तर इथल्या शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी देऊन ठेवला होता. आपण त्यांचं ऐकलं नाही आणि आज खरोखरीच ती वेळ इथल्या शेतकऱ्यावर आली आहे.
कुटुंब नियोजनाच्या संदर्भात सुद्धा जन्मदरापेक्षा पोषण दर महत्त्वाचा आणि जास्त मुलं जन्माला घालणं हा कायद्यानं गुन्हा करण्याची मागणी केली होती. तसा कायदा करण्यासाठी ते आग्रही होते. पण त्याला साथ मिळाली नाही. भारताचा जन्मदर असाच राहिला तर सन 2000 साली भारताची लोकसंख्या शंभर कोटींवर जाईल, आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या गरजा, राहणीमान सांभाळणं अवघड होऊन बसेल, असा इशारा त्यांनी सन 1938 साली दिला होता. पाकिस्तान आणि बांग्लादेश वेगळा होऊनही सन 2001 साली भारताची लोकसंख्या 120 कोटींवर गेली, हे सुद्धा आंबेडकरांच्या दूरदृष्टीचं प्रतीक होतं. बाबासाहेबांनी दिलेल्या स्त्री-पुरूष समानता, संसाधनांचे फेरवाटप, सक्तीचे, मोफत व सार्वत्रिक शिक्षण, जातिनिर्मूलन व आंतराजातीय विवाह आणि धर्मचिकित्सा या पंचसूत्रीच्या सहाय्यानंच आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख आपल्याला उंचावता येणार आहे. बाबासाहेब हे भारतीय सामाजिक न्यायाचे प्रतीक तर निश्चितपणानं आहेतच, पण त्याचबरोबर राज्यघटनेमध्ये 'आम्ही भारताचे लोक…' असं म्हणून इथल्या प्रत्येक नागरिकाला सार्वभौम ओळख प्रदान करणारे बाबासाहेब हे खरे 'आम्हा भारतीयांचे डॉ. आंबेडकर' होते. पण त्यांची ही ओळख अजूनही आपण पटवून घ्यायला तयार नाही आहोत, हे खरं दुखणं आहे.

Saturday, 20 April 2013

आंबेडकरवाद विरुद्ध स्युडो आंबेडकरवाद




    किशोर जामदार, चंद्रपूर.

Published: Sunday, March 17, 2013
१० मार्चच्या 'लोकसत्ता'मध्ये  मधु कांबळे यांनी लिहिलेला 'आंबेडकर विरुद्ध मूलनिवासी' या लेखातील मुद्दे मूलगामी व स्युडो आंबेडकरवाद्यांचे पितळ उघडे पाडणारे आहेत. बाबासाहेबांचे नाव घेऊन त्यांच्याच विचारांना फाटा देणारे बुद्धिजीवी, आंबेडकरवादाला कोणत्या दिशेने नेत आहेत, हे अचूकपणे दाखवण्याचे कार्य श्री. मधू कांबळे यांनी या लेखातून केलेले आहेत. हे करत असताना या स्युडो आंबेडकरवाद्यांच्या वर्गीय चरित्राचेही सटीक विश्लेषण कांबळेंनी केलेले आहे.
जातिव्यवस्थेविषयी बाबासाहेबांनी केलेल्या विश्लेषणासंदर्भात कांबळे यांनी 'शूद्र पूर्वी कोण होते?' आणि 'अस्पृश्य मूळचे कोण होते?' या दोन शोधप्रबंधांचे दाखले दिले आहेत. त्याव्यतिरिक्त बाबासाहेबांच्या ज्या दोन शोधप्रबंधांना आंबेडकरवादाचे मूलस्रोत म्हटले जाते, त्या 'भारतातील जाती' आणि 'जाती निर्मूलन' या शोधप्रबंधांमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत सखोल, वैज्ञानिक तरीही सर्वसामान्यांना सहज समजेल अशा पद्धतीने जातींची निर्मिती कशी झाली? त्यांचे निर्मूलन करण्याचा मार्ग कोणता? या विषयी मांडणी केलेली आहे. आणि जातींच्या निर्मितीची प्रक्रिया बाबासाहेबांच्या हजारो वर्षे आधीच पूर्ण झाली होती. तेव्हा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर, काळानुरूप त्यात काही बदल झाला असेही म्हणता येणार नाही. याचाच अर्थ ती मांडणी नाकारून भलतेच काहीतरी मांडणाऱ्यांना एकतर बाबासाहेबांची मांडणी मान्य नाही किंवा ती त्यांना समजली नाही. म्हणूनच त्या मांडणीकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून 'मूलनिवासी' ही संकल्पना निर्माण करणाऱ्या विचारवंतांना स्युडो आंबेडकरवादी म्हणावे लागते.
जातींच्या उत्पत्ती संदर्भात बाबासाहेब लिहितात, ''भारतातील लोकसंख्या आर्य, द्रविड, मंगोलियन आणि शिथिअन या वंशाच्या मिश्रणाने बनलेली आहे. हे लोकसमूह वेगवेगळ्या दिशांनी भिन्न भिन्न संस्कृतींसह शेकडो वर्षांपूर्वी भारतात आले, त्या वेळी त्यांची राहणी भटकी होती. यापकी प्रत्येक टोळी भारतात क्रमश: घुसली आणि तेथील लोकांशी लढाई करून तेथे तिने आपला जम बसविला. त्यानंतर मात्र ते शेजाऱ्याप्रमाणे शांततेने राहू लागले. नित्य संबंध आणि पारस्पारिक व्यवहारामुळे त्यांच्यात एका संस्कृतीचा उदय झाला, आणि तीत त्यांच्या भिन्न संस्कृतीचा लोप झाला. भारतात आलेल्या या विभिन्न वंशातील लोकांचे पूर्णत: एकत्रीकरण झालेले नाही, ही गोष्ट मान्य करावीच लागते. कारण,
भारताच्या सीमांमध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे व दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशाला शरीररचनाच नव्हे, तर लोकांच्या वर्णामध्येसुद्धा लक्षात येण्याजोगा फरक आढळतो. तथापि एखाद्या लोकसमूहाच्या एकत्वासाठी केवळ वेगवेगळ्या वंशाच्या लोकांचे पूर्णत: एकत्रीकरण होणे, हा मुद्दा पुरेसा होऊ शकत नाही. वंशशास्त्रदृष्टय़ा या सर्व लोकसमूहांच्या एकत्वासाठी केवळ सांस्कृतिक ऐक्य हेच त्यांच्या एकत्वाचे गमक असते. हे विधान मान्य झाल्यास मी असे धाडसी विधान करू इच्छितो, की लोकांच्या सांस्कृतिक एकतेच्या बाबतीत दुसरा कोणताही देश भारताची बरोबरी करू शकत नाही. भारत केवळ भौगोलिकदृष्टय़ाच एक आहे, असे नव्हे, तर एकतेच्या इतर कोणत्याही गमकापेक्षा भारतात अधिक मूलभूत असलेली सांस्कृतिक एकता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आढळून येते. परंतु या एकतेमुळेच जातिसमस्येचे स्पष्टीकरण करणे अधिकच बिकट होते. भारतीय समाज हा जर केवळ परस्परापासून भिन्न अशा जातींचा समूह असता, तर हा विषय अतिशय सोपा झाला असता. परंतु आधीच एकसंध असलेल्या समाजाचा जात हा एक तुकडा आहे, म्हणूनच जातींच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण बिकट ठरते. पुढे बाबासाहेब असेही म्हणतात की, 'वस्तुत: भारतातील जातिव्यवस्था वेगवेगळ्या वंशातील रक्त आणि संस्कृती यांचे मिश्रण झाल्यानंतर अस्तित्वात आली. जातिभेद म्हणजे वंशभेद होय असे समजणे, आणि वेगवेगळ्या जाती म्हणजे वेगवेगळे वंश होय, असे मानणे वस्तुस्थितीचा आडमुठा विपर्यास करणे होय. मद्रासच्या आणि पंजाबच्या ब्राह्मणांमध्ये असे कोणते वांशीय सादृश्य आहे? मद्रासच्या आणि बंगालच्या अस्पृश्यांमध्ये असे कोणते वंशीय सादृश्य आहे? पंजाबचा ब्राह्मण आणि पंजाबच्या चांभारामध्ये असा कोणता वंशीय भेद आहे? मद्रासचा ब्राह्मण आणि मद्रासचा परिया यामध्ये अशी कोणती वंशीय भिन्नता आहे? पंजाबचा ब्राह्मण पंजाबचा चांभार ज्या घराण्यातला आहे, त्याचाच एक वंशज आहे. आणि ज्या घराण्यातील मद्रासचा परिया आहे, त्याच घराण्याचा वंशज मद्रासचा ब्राह्मण आहे. जातिव्यवस्था वंशभेदाची परिसीमा दर्शवीत नाही. जातिभेद हे एकाच वंशाच्या लोकांचे पाडलेले सामाजिक विभाग होत.'
जाती निर्मूलनाच्या मार्गाविषयीही या लोकांच्या मांडणीचा बाबासाहेबांनी अखंड परिश्रमातून शोधून काढलेल्या मार्गाशी सुतराम संबंध नाही. बाबासाहेब आपल्या 'जाती निर्मूलन' या ग्रंथात म्हणतात, 'मला तुमच्या मनावर एक गोष्ट िबबवायची आहे, ती म्हणजे मनूने हा जातीचा कायदा तयार केला नसून, तो तसे करूही शकला नसता. अस्तित्वात असलेले जातीचे नियम संकलित करण्यात व जातिधर्माचा उपदेश करण्यातच त्याचे कार्य संपुष्टात आले. जातीचा प्रसार व वाढ करण्याचे काम इतके अवाढव्य आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या किंवा वर्गाच्या सामथ्र्य व धूर्तपणापलीकडचे आहे. ब्राह्मणांनी जाती निर्माण केल्या, या विचारसरणीतही असाच युक्तिवाद करण्यात येतो. मनूच्या बाबतीत मी जे सांगितले आहे, त्यानंतर वैचारिकदृष्टय़ा ही विचारसरणी चुकीची असून उद्देश्यत: द्वेषमूलक आहे; एवढे सांगितले म्हणजे आणखी काही विशेष सांगण्याची गरज नाही.'' व्यक्तींचा किंवा समूहाचा द्वेष करून जाती संपणार नाहीत, तर त्यांचा आधार असलेल्या धर्मशास्त्रांचे फोलपण लोकांसमोर उघडे करून ते शक्य होईल. पण आज बहुजन समाज हा ब्राह्मणांच्या विरोधात जरी एकत्र येतो आहे असे भासत असले. तरी तो हिंदू धर्मशास्त्रांकडे अधिकाधिक आकृष्ट होताना दिसतो आहे. नित्यनवीन बाबांच्या मागे तो लागताना दिसतो आहे. म्हणजे ब्राह्मणांना सत्तेपासून दूर करून त्यांच्या जागी कोणताही समूह आला आणि समाजाचा आधार मात्र त्याच धर्मशास्त्रांचा राहिला तर काय फरक पडणार. आणि मधू कांबळे म्हणतात त्याप्रमाणे या स्युडो आंबेडकरवाद्यांना जाती मोडायच्या आहेत? की केवळ जोडायच्या आहेत? यातील फरकाने काय फरक पडू शकतो हे आपण धर्माच्या संदर्भात अनुभवतच आहोत. आमचे संविधान धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना मांडते. पण आम्ही 'धर्मनिरपेक्षते'ऐवजी 'सर्वधर्मसमभाव' अंगीकारला, आणि त्याची फळे गेली साठ वर्षे भोगत आहोत. धर्मनिरपेक्षतेप्रमाणे राज्यव्यवस्था, शिक्षण आणि नीतिमूल्ये या बाबतीत कुठल्याही धर्माची ढवळाढवळ नसावी. पण सर्वधर्मसमभावामुळे या तीनही बाबतींत सर्व धर्माना समान ढवळाढवळ करण्याचा अधिकार मिळतो. पण बहुसंख्येच्या बळावर कुठलाही धर्म आपले वर्चस्व गाजवू शकतो हा जगाचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे जाती केवळ जोडण्याचा प्रयत्न झाला, तर त्याच जन्माधारित अधिकारांच्या शास्त्रांप्रमाणे त्यांच्यात ऐक्य कधीच होऊ शकणार नाही. आणि हेच नेमके आजच्या सत्ताधारी वर्गाना हवे आहे.


Friday, 1 March 2013

समृद्ध आणि शाश्वत मराठी भाषा



FRIDAY, MARCH 1, 2013.....

by prof.Hari Narke......



{दिव्य मराठी, दि.२६ फ़ेब्रुवारी २०१३}

अमृतातेही पैजा जिंकणार्‍या आणि भाषामाजी भाषा साजरी असणार्‍या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट स्थापन केला आहे. आजवर तामिळ, तेलगू, कन्नड व संस्कृत या चार भाषांना केंद्र शासनाने हा दर्जा दिलेला आहे. भाषेच्या अभिजातपणासंबंधीचे केंद्र सरकारचे निकष पुढीलप्रमाणे आहेत - भाषेची प्राचीनता, भाषेची मौलिकता आणि सलगता, भाषिक आणि वाड्मयीन परंपरेचे स्वयंभूपण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणार्‍या खंडासह जोडलेले/असलेले नाते. या चारही मुद्यांच्या अनुषंगाने विचार करता मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, हे सबळ पुराव्यानिशी सिद्ध करता येते. मराठी भाषा अभिजात ठरण्यासाठी काही पूर्वग्रह आणि खोलवर रुजलेल्या गैरसमजुती यांचा अडथळा आहे. मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे आणि तिचे वय एक हजार वर्षांपेक्षा कमी आहे, अशी लोकसमजूत करून देण्यात आली आहे.

प्राचीन महारठ्ठी भाषा, मरहठ्ठी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा मराठीचा प्रवास झाला आहे. या वेगवेगळ्या भाषा नसून, ती मराठी या एकाच भाषेची तीन रूपे आहेत, असे ल. रा. पांगारकर यांनी सोदाहरण दाखवून दिले आहे. 'लीळाचरित्र', 'ज्ञानेश्वरी', 'विवेकसिंधू' हे मराठीतले आद्यग्रंथ नाहीत, तर ते मराठी प्रगल्भ व र्शीमंत झाल्यानंतरचे र्शेष्ठ ग्रंथ आहेत. हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले ती त्याच्या आधी बारा-पंधराशे वष्रे अत्यंत समृद्ध भाषा होती याचे शिलालेख, ताम्रपट, पोथ्या आणि हस्तलिखित ग्रांथिक पुरावे आज उपलब्ध झाले आहेत. मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ सुमारे दोन हजार वष्रे जुना असून, त्याचे नाव 'गाथासप्तशती' असे आहे. संस्कृतवाणी देवे केली, मग प्राकृत काय चोरापासून झाली, असा संतप्त सवाल संत एकनाथांनी विचारला होता. एकनाथांची भाषा आजची मराठी भाषा असूनही ते तिला प्राकृत म्हणतात. यावरून या दोन वेगळ्या भाषा नाहीत हेच स्पष्ट होते. ज्ञानेश्वरांनी मराठीला देशी भाषा म्हटलेले आहे. हेमचंद्रांचे 'देशी नाममाला' हे या भाषेचे व्याकरण प्रसिद्ध आहे. पाणिनीच्या समकालीन वररुची (कात्यायन) याने लिहिलेला 'प्राकृत प्रकाश' हा व्याकरण ग्रंथ ख्यातनाम आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेकडे सुमारे 30 हजार प्राचीन पोथ्या उपलब्ध असून त्यातील दीड ते दोन हजार वर्षे जुन्या असलेल्या सुमारे 80 ग्रंथांमध्ये मराठी भाषा - त्यात प्रामुख्याने कालिदासाचे शाकुंतल (चौथे शतक), शुद्रकाचे मृच्छकटिक (सहावे शतक), प्रवरसेनाचे सेतुबंध (पाचवे शतक), भद्रबाहूचे आवश्यक नियुक्ती (तिसरे शतक), विमलसुरीचे पौमचरिया (पहिले ते तिसरे शतक) यांचा समावेश आहे.

रामायण, महाभारतातही शेकडो मराठी शब्द सापडतात. दोन हजार वर्षांपूर्वी 'बृहत्कथा' हा पैशाची भाषेतील ग्रंथ गुणाढय़ या मराठी लेखकाने लिहिलेला आहे. 'विनयपिटक', 'दीपवंश', 'महावंश' या बौद्ध ग्रंथांमध्ये पाली व सिंहली भाषेत महाराष्ट्राचा उल्लेख आलेला आहे. मोगलिपुत्तातिष्य याने काही 'थेर' म्हणजे र्शेष्ठ धर्मोपदेशक निरनिराळ्या देशांना पाठवल्याचा उल्लेख आहे. पैकी 'महारठ्ठ' देशात थेरोमहाधम्मरखिता यास पाठवले, असे त्यात म्हटले आहे. 'रक्खितथेरं वनवासि योनक धम्मरक्खित थेरं अपरंकतं महाधम्मरक्खित थेरं महारठ्ठ.' मराठी ही मुख्यत: महाराष्ट्राची भाषा असून वेदपूर्वकाळापासून चालत आलेल्या लोकभाषांमधून ती तयार झाली आहे. अशाच दुसर्‍या एका लोकभाषेतून संस्कृत जन्माला आलेली आहे. आजपर्यंत मराठीवर आर्यांची बोलभाषा, वैदिक, संस्कृत व विविध प्राकृत तसेच द्रविडी भाषा यांचा परिणाम झाला आहे. मराठीत तत्सम, तद्भव व देश्य यात तीनही प्रकारचे शब्द आढळतात. महाराष्ट्री म्हणून जी प्राकृत भाषेतील विशेष प्रौढ व वाड्मयीन भाषा तीच मराठी होय. मराठी भाषेतील पहिला शिलालेख 2220 वर्षांपूर्वीचा आहे. तो ब्राह्यी लिपीतील असून, तो पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळच्या नाणेघाटातील आहे. या शिलालेखात 'महारठिनो' लोकांचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉ. वा. वि. मिराशी यांनी आपल्या al145सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख' या ग्रंथात हा शिलालेख प्रकाशित केला आहे. (''..व महरठिनो अंगियकुलवधनस सगरगिरिवलयाय पथविय पथमवीरस वस.. य महतो मह.. '' अनुवाद- ''..महारठी अंगिय कुलोत्पन्न गिरिसमुद्रवलयांकित पृथ्वीवरील वीर्शेष्ठ.. महान अशा पुरुषांत र्शेष्ठ अशा..'') ज्या महारठी भाषेत हा शिलालेख लिहिला गेला आहे ती त्याआधी किमान 200 ते 300 वष्रे अस्तित्वात असली पाहिजे.

महारठ्ठी-मरहठ्ठी- र्म‍हाटी-मराठी असा उच्चारभ्रमाचा प्रवास 'महाराष्ट्री हे महारठ्ठी'चे नामकरण संस्कृत भाषेने, तिच्यातल्या पंडितांनी केले. संस्कृत भाषेला संस्कृत हे नाव मिळण्याआधी महाराष्ट्री भाषा अस्तित्वात होती. एवढेच नाही तर ती प्रगल्भ झालेली होती. हाल सातवाहनाची 'सत्तसई', जयवल्लभाचा 'वज्जालग्ग' हा सुभाषित कोश, प्रवरसेन वाकाटकाचे 'रावणवहो', वाक्पतीराजाचे 'गऊडवहो' ही महाकाव्ये हे महाराष्ट्री प्राकृतातील मुख्य ग्रंथ. पैकी 'सत्तसई' व 'रावणवहो' नि:संशय महाराष्ट्रात लिहिले गेले. 'महाराष्ट्रार्शया भाषां प्रकृष्ट प्राकृतं विदु:।' असे महाकवी दंडी म्हणतो. म्हणूनच महाराष्ट्री प्राकृत हा महाराष्ट्रीयांचा अभिमानविषय आहे. मूलत: ही भाषा महाराष्ट्राचीच, हे नि:संशय. शिवाय प्रचलित मराठीशी महाराष्ट्रीचे निकटचे नाते व साम्य आहे, हे अनेक उदाहरणांवरून व व्युत्पत्त्यांवरून सिद्ध होते. महाकवी बाणभट्ट (सातव्या शतकाचा प्रथमार्ध) याने हर्षचरिताच्या प्रास्ताविकात गाथा कोशाचा उल्लेख केला आहे. अपभ्रंशापासून मराठी निघाली, हे डॉ. वि. भि. कोलते यांनी वाड्मयीन पुराव्याने सिद्ध केले आहे. ज्ञानेश्वरीत मराठी भाषेला 'र्म‍हाठी' या शब्दाबरोबरच 'देशी' हा शब्दही वापरलेला आहे. किंबहुना मराठीचे 'देशी' हेच नाव अधिक रूढ होते. अपभ्रंश भाषेचे साहित्यांतर्गत नाव 'देसी' असेच आहे, अपभ्रंश नव्हे. या देसीचा विकास होऊन जी भाषा निर्माण झाली ती देशी किंवा मराठी. ती अपभ्रंशाच्या 'नागर' या प्रकारापासून निघाली.

पुढे वराहमिहिराने 'बृहत्संहिते'त महाराष्ट्रीयांविषयी 'भाग्ये रसविक्रयिग: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्र': असे म्हटले आहे. (बृहत्संहिता 10.8) ऐहोळे शिलालेखात (इ.स. 634) सत्तयार्शय पुलकेशी (चालुक्य) हा तिन्ही महाराष्ट्राचा सार्वभौम राजा झाल्याचा उल्लेख आढळतो. (एपि. इं. 6.4). प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यु-एन-त्संग (इ. स. 629 ते 645) महाराष्ट्रास 'मोहोलाश' असे संबोधून त्याविषयी विस्ताराने लिहितो. वात्स्यायन, वररुची व दंडी यांनी केलेले महाराष्ट्राचे उल्लेख प्रसिद्धच आहेत. राजशेखर स्वत:ला 'महाराष्ट्र चुडामणी' म्हणवून घेतो. शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखित पोथ्या, प्रकाशित ग्रंथ या सार्‍यांच्या संशोधनातून मराठीबाबत एक 'प्रमाणक परिवर्तन' (पॅराडाइम शिफ्ट) होणार आहे.

(साभार - लोकराज्य,फ़ेब्रुवारी२०१३)