Showing posts with label व्यक्तीचित्रे. Show all posts
Showing posts with label व्यक्तीचित्रे. Show all posts

Saturday, 30 August 2014

कॉम्रेड शरद् पाटील

सौजन्य: एक रेघ

http://ekregh.blogspot.in/

SATURDAY, MAY 10, 2014

कॉम्रेड शरद् पाटील : अलविदा (राहुल सरवटे यांचा लेख)

भारतीय इतिहासासंबंधी प्रचंड उत्खनन केलेले, डाव्या विचारांच्या चळवळीचे कार्यकर्ते राहिलेले कॉम्रेड शरद् पाटील यांचं १२ एप्रिल रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. अपवाद सोडता, बहुतेक मराठी वर्तमानपत्रांनी एक कॉलम, फारतर दोन कॉलम अशा बातम्यांमधे पाटलांचं प्रकरण संपवलं. एखाद्-दोन ठिकाणी इकडून तिकडून माहिती जमवून लिहून टाकल्यासारखे अग्रलेख आले, बाकी चळवळीतल्या मंडळींचे काही लेखही आले- ते बरेचसे कंटाळवाणे हळवे सूर उगाळणारे आणि पाटलांच्या मूळ कामाचा तोकडा उल्लेख करून संपलेले. पाटलांच्या कामाबद्दल फारच कमी उल्लेख होणं, हे प्रचंड निराशाजनक आहे. इंग्रजी वर्तमानपत्रांमधे साध्या बातम्याही नाहीत, पण तिथं आशेला जागाही नव्हती. पाटील जिवंत असतानाच त्यांच्या कामाबद्दल आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांपर्यंत ते काम तुलनेनं सुलभ पद्धतीनं पोचवण्याचं काम माध्यमांनी करायला हवं होतं. मासिकं, साप्ताहिकं, वर्तमानपत्रं, अशी काही रचना टप्प्याटप्प्यानं असं करू शकते. पण आपल्याकडं असली काही रचना नाहीच. मासिकं-साप्ताहिकं कशाला काढतात काय माहीत! आणि- मग्रुरी, आकस, सॉफ्ट टार्गेटांवर सोईनं शेरेबाजी नि जिथं गरजेचं आहे तिथं नांगी टाकून वांगी खाण्याची वृत्ती एवढाच वर्तमानपत्रांचा अवतार राह्यलाय. त्यामुळं पाटील गेल्यावर गोंधळ होणार होताच, तो झालाच. वृत्तवाहिन्यांबद्दल बोलूया का? नकोच. वास्तविक पाटील गेल्यावर तरी त्यांच्या कामाबद्दल खोलवर बोलण्याची भीषण संधी साधायला काय हरकत होती.

असं सगळं असताना ह्या बारक्या कुवतीच्या 'रेघे'वर आपण काय करू शकणारोत? शिवाय पाटलांच्या कामाचा विषय हा आपल्या किमान वाचनाचाच विषय राहिलेला, त्यामुळं पाटलांना अखेरचा सलाम आपण करणार कसा? शिवाय पाटलांच्या कामावर विद्यापीठीय वर्तुळांबाहेर बोलायचं तर कसं बोलायचं? विद्यापीठीय माणूस शोधून 'रेघे'च्या वाचकांपर्यंत त्याचा मजकूर कसा न्यायचा? मुळात एवढं असं करायचंच कशाला? असेही प्रश्न विचारता येतील. ह्या प्रश्नांचं थोडक्यात उत्तर असं : शरद् पाटील यांनी जे काही काम केलं, ते जसं कसं केलं असेल, त्या सगळ्या मागं त्यांचे अपार कष्ट स्पष्ट दिसतात, शिवाय कामावरची निष्ठा नि प्रामाणिकपणा पण त्यांच्या लिखाणात आहे. (दास-शूद्रांची गुलामगिरी हा त्यांचा ग्रंथ ह्या दृष्टीनं खरोखरच झटापट करण्यासारखा आहे). तर, अशा मूल्यांसकट साधारण नव्वद वर्षं आपल्या परिसरात जगलेला माणूस आपल्यातून गेला, तर त्याची किमान बूज ठेवणं, एवढं तरी काम पत्रकारितेकडून अपेक्षित आहेच ना. अनेक माणसं जातात, त्यांची बूज आपण 'रेघे'वर प्रत्येक वेळी ठेवू शकतोच असं नाही. पण प्रयत्न करतो. पाटलांच्या बाबतीतला प्रयत्न महिनाभर केल्यानंतर निराशेतच संपणार होता, पण तेवढ्यात एक मजकूर सापडला.

हा मजकूर राहुल सरवटे यांचा आहे. राहुल हे न्यूयॉर्कमधे कोलंबिया विद्यापीठात '१८४८ ते १९२० ह्या काळातल्या मराठी वैचारिक परंपरेच्या विकासाचा जातिव्यवस्था विषयक आकलनाच्या विशेष संदर्भात अभ्यास' करतायंत. आणि दिल्लीतल्या नवयान प्रकाशनासाठी शरद् पाटलांच्या 'मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद' या पुस्तकाचा इंग्रजी अनुवादही करतायंत. ह्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाटलांबद्दल लिहिणं योग्य वाटलं. त्यांनी 'नवयान'च्या संकेतस्थळावर यासंबंधी इंग्रजीतून टिपण लिहिलेलं आहेच. शिवाय मराठीतून 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावर त्यांनी काही मजकूर लिहिलेला आहे. या दोन्ही मजकुरांमधून, शिवाय 'ऐसी अक्षरे'वरच्या त्यांच्याच प्रतिक्रियांची भर टाकत एक एकसंध मजकूर राहुल यांच्या परवानगीनं आपण 'रेघे'साठी तयार केला, त्यांनी पडताळल्यानंतर तो आता रेघेवर प्रसिद्ध होतो आहे. राहुल यांचे आभार.

आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकांना पाटलांच्या म्हणण्याचा काहीएक प्राथमिक अंदाज यावा, हा रेघेवरच्या या नोंदीचा मुख्य हेतू. या म्हणण्याचं समर्थन, त्यावरची टीका, असा मजकूरही वास्तविक तज्ज्ञ व्यक्तींकडून उभा करायला हवा. आपल्याला रेघेवर सध्या तसं करणं शक्य नाही. शरद् पाटलांना डिबेट घडवायची आस आयुष्यभर राहिली, पण मराठीतल्या अशा डिबेटसाठीच्या जागा खंगून खंगून कधीच मरून गेल्यात. तरीही- वाचूया हा एक लेख.

शरद् पाटील (१७ सप्टेंबर १९२५ - १२ एप्रिल २०१४)
[फोटो : 'नवयान'च्या संकेतस्थळावरून]

शरद् पाटील : महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेचा शेवटचा आवाज
राहुल सरवटे (rahul.sarwate@gmail.com)

डॉ. आंबेडकरोत्तर काळातील कदाचित सर्वश्रेष्ठ जाती-विरोधी विचारवंत/कार्यकर्ता, शरद् पाटील यांचे गेल्या १२ एप्रिल रोजी धुळे मुक्कामी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. कार्ल मार्क्सच्या 'दास कापितल' ह्या महाग्रंथातले चुकलेले बीजगणित उलगडून दाखवणारा; बुद्ध आणि मार्क्स ह्या महा-दर्शनिकांचा समन्वय करणारा; जात निर्मूलनासाठी नवे चर्चाविश्व निर्माण करणारा, अवैतनिक जीवनदायी कार्यकर्ता-विचारवंत... शरद् पाटील हे महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर ह्याच ओळीत घेता येणारे नाव आहे. महाराष्ट्राची पुरोगामी परंपरा प्रबोधनाचा (Enlightenment) वारसा सांगते. ह्यात अनेक ब्राह्मणी - नेमस्त, जहाल, सुधारणावादी, पुनरुज्जीवनवादी आणि अब्राह्मणी, भक्ती मार्गी, अवैदिक, बौद्ध - असे अनेक विचारवंत येतात. त्यांच्या परस्पर झगड्यातून, विमर्शातून मराठी वैचारिक परंपरा घडली. कॉम्रेड पाटील हे ह्या परंपरेला समृद्ध करणारे, तिचा पाया तात्विक दृष्टीने दृढ करणारे कदाचित शेवटचे विचारवंत. आपला आजचा परिवर्तनवाद (मार्क्सवाद/आंबेडकरवाद) प्रबोधन काळातली जाती-निर्मूलनाची भाषा साफ विसरलाय. कॉ. पाटलांचा मृत्यू ह्या अर्थाने एका काळाचा शेवट आहे.

मावळाई प्रकाशन, दुसरी आवृत्ती - २००८
फुले-आंबेडकरांच्या जातिविरोधी विचारांचा मार्क्सवादाशी समन्वय करून मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादाचे तत्त्वज्ञान शरद् पाटलांनी स्थापित केले. ह्या 'मा-फु-आ'वादाने महाराष्ट्रात सत्तरीच्या दशकात बरेच वादळ निर्माण केले. हा वाद मे. पुं. रेगे संपादित 'नवभारत' ह्या नियतकालिकातून सुरू झाला (फेब्रुवारी १९८०), आणि त्यात भारतीय इतिहास, वर्ग आणि जाती ह्यांचा ऐतिहासिक विकास आणि परस्पर संबंध, ब्राह्मणी आणि अब्राह्मणी वैचारिक परंपरा अशा अनेक विषयांवर विमर्श झाला. पाटलांचे ह्या विषयावरील लेख मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पुस्तकात एकत्र सापडतात (सुगावा प्रकाशन, १९९३. आता अनुपलब्ध). भारतीय कम्युनिस्ट वर्तुळात आणि जातिविरोधी वर्तुळात ह्या सिद्धांताची बरीच चर्चा झाली.

पाटलांचे आर्ग्युमेन्ट रोचक आहे : त्यांच्या मते, भारतीय मार्क्सवाद ब्राह्मणवादी परंपरेच्या प्रभावाखाली विकसित झाला (इथे ते कॉम्रेड डांग्यावर असलेला इतिहासकार वि. का. राजवाडे आणि लोकमान्य टिळकांचा प्रभाव नोंदवतात. पाटलांच्या दृष्टीने, डांगे यांचा मार्क्सवाद हा वैदिक नेणीव आणि वर्गवादी जाणीव अश्या दोन पातळ्यांवर वावरतो आणि पर्यायाने, जाती विषयक निर्णायक भूमिका घेत नाही). पाटलांच्याच शब्दांत सांगायचे तर - "भारतीय भांडवलदार वर्ग मुख्यतः हिंदू बनिया जातींमधून विकसित झाला तर त्याचा राष्ट्रवादी बुद्धिजीवी ब्राह्मण जातींमधून. दोघांचेही हितसंबंध जातिव्यवस्था अबाधित ठेवण्यात असल्याने व्यक्तिस्वतंत्राधिष्ठित पाश्चात्त्य लोकशाही विचारसरणीचा त्यांनी अव्हेर करणे अपरिहार्य होते. त्यांच्या विरोधात शूद्र जातीय समाजसुधारकांनी ह्या विचारसरणीचा परखड पाठपुरावा करणेही अपरिहार्य होते. पण हा वैचारिक संघर्ष पाश्चात्त्य लोकशाही विचारसरणी अव्हेरणे अथवा स्वीकारणे येथपर्यंत मर्यादित राहू शकत नव्हता. उच्चजातीय विचारवंतांनी वर्णजातिव्यवस्थेचे अधिकृत तत्वज्ञान असलेला वेदान्त राष्ट्रीय चळवळीचे अधिकृत तत्वज्ञान बनवले, तर त्याच्या प्रतिवादार्थ शूद्र जातीय विचारवंतांनी वर्णजातिव्यवस्था विरोधी सांख्य, बौद्ध इत्यादी अब्राह्मणी तत्वज्ञानांचा पुरस्कार केला... टिळकांच्या जातिव्यवस्था समर्थक वेदान्ती राष्ट्रवादी परंपरेत वाढलेल्या उच्चजातीय तरुणांनी भारतीय कम्युनिस्ट चळवळीची उभारणी केली... भारतीय तत्वज्ञान, इतिहास, संस्कृती याकडे ब्राह्मणी दृष्टिकोनातून पाहणारे कम्युनिस्ट नेते व मार्क्सवादी प्राच्यविद्या पंडित मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद भारताला लावण्यात पोथिनिष्ठ राहणे अपरिहार्य होते" (पाटील, १९९३: ११-१२). 

मावळाई प्रकाशन, चौथी आवृत्ती- २०१०
पाटलांची 'ब्राह्मण-अब्राह्मण' विभागणी महात्मा फुल्यांच्या चळवळीत अनुस्यूत 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' विभागणीपेक्षा किंचित वेगळी अहे. ही विभागणी ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य विरुद्ध शूद्र अशी आहे. मुद्दा असा की, एकोणिसाव्या शतकात विकसित झालेला भारतीय राष्ट्रवाद जातिव्यवस्थाविरोधी मूलभूत भूमिका घेत नाही, जी आंबेडकरांनी 'अॅनिहिलेशन ऑफ कास्ट'मध्ये घेतली. इतिहासकार राजवाडे 'राधामाधव विलास चम्पू'च्या विख्यात प्रस्तावनेत लिहितात : "चातुर्वण्याचा इतिहास म्हणजे त्यातील स्त्रिया आणि शूद्र ह्यांचा इतिहास प्रमुख्ये करून आहे. ह्या प्रचंड ऐतिहासिक नाटकात ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ही पात्रे एका बाजूला आपली आसने सदैव स्थिर करण्यात गुंतलेली दिसतात आणि ती आसने डळमळविण्याचा भगीरथ प्रयत्न करणारे शूद्र हे पात्र जिवापाड मेहनत घेताना आढळते. ह्या सगळ्यात विजयश्री कधी ब्राह्मणादींच्या गळ्यात माळ घालते व कधी शूद्रावर फिदा होते आणि शेवटी दोन्ही पक्ष हार न खाता, तिसरे पात्र जे स्त्री, त्याच्या द्वारा तडजोडीने भांडण मिटवताना दृष्टीस पडतात.. त्यातील ब्राह्मण हे पात्र सर्वांत प्रधान समजावे. बाकीची दोन्ही पात्रे ब्राह्मणाच्या अनुषंगाने वागणारी होत.." (राजवाडे, राधामाधव विलास चम्पू: १३९). ह्या अर्थाने, पाटील सांगतात की भारतीय राष्ट्रवाद व भारताचा भांडवलदारी वर्ग हे एकमेकांना पूरक भूमिका घेत होते.

ह्या ब्राह्मणी नेणिवेच्या प्रभावातून भारतीय मार्क्सवाद मुक्त करण्यासाठी त्याचा शूद्र तत्त्वज्ञानांशी समन्वय पाटील आवश्यक मानतात. ह्या समन्वयाचे त्यांचे सूत्र आहे - "मार्क्सचे ऐतिहासिक भौतिकवादाचे सूत्र आहे - शोषणशासनाधारित समाजाच्या उदयापासूनचा मानवसमाजाचा इतिहास शोषकशासक व शोषितशासित यांच्या मधील लढ्यांचा आहे; तर भारतीय इतिहासाचे फुल्यांनी दिलेले सूत्र आहे - बळीराजाच्या अंतापासूनचा भारतीय समाजाचा इतिहास आर्य द्विज आणि अनार्य शूद्र यांच्यामधील वर्णजाती लढ्यांचा आहे. ह्या दोन्ही सूत्रांचे विधायक नकारकरण आपल्याला मा-फु-आच्या सूत्राकड़े नेते : शोषणाधारित समाजाच्या उदयापासून वसाहतिक समाजापर्यंतचा भारतीय इतिहास हा वर्ण-जाती-जमाती ह्यांच्यातील संघर्षाचा इतिहास आहे तर वसाहतिक काळापासूनचा भारतीय इतिहास हा वर्ग-जाती-जमातींच्या लढ्याचा इतिहास आहे" (पाटील १९९३: १५). नकारकरण हा शब्द पाटील sublimationसाठी प्रतिशब्द म्हणून वापरतात. ह्याचा अर्थ 'नकार देणे' असा नसून, ह्या प्रवाहांना 'नव्या रुपात परिवर्तित करणे' असा आहे.

पाटलांच्या चिकित्सक चौकटीत भारतीय इतिहास हा अश्या प्रकारे ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विचारधारांच्या सततच्या संघर्षाचा इतिहास आहे. पुन्हा एकदा त्यांच्याच शब्दांत - "सिंधूसंस्कृतीच्या अंतापासून भारतात अविछिन्नपणे परस्परविरोधात आणि परस्परसमन्वयात वाहत आलेल्या ब्राह्मणी आणि अब्राह्मणी प्रवाहांनी भारतीय इतिहास, तत्वज्ञान, विज्ञान, संस्कृती, साहित्य, कला, इ. सर्व क्षेत्रात जी साधक-बाधक योगदाने केलेली आहेत त्यांचे विधायक नकारकरण केवळ मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादानेच होऊ शकते" (पाटील, १९९३: १६). मा-फु-आ हे अशा प्रकारे नव्या वर्ग-वर्ण-जाती निर्मूलनाचे क्रांतिशास्त्र बनले. (पाटलांच्या खोल आणि व्यापक वाचनाचा पडताळा सतत त्यांच्या लिखाणात दिसतो. उदाहरणार्थ, पतंजलीने केलेल्या पाणिनीवरील टीकेचा संदर्भ देऊन पाटील ही ब्राह्मणी आणि अब्राह्मणी विभागणी भारतीय दर्शनशास्त्रातसुद्धा किती मूलभूत भूमिका बजावते ते दाखवतात. नाटकांचे प्रेक्षक कुठल्या भूमिकांना कसा प्रतिसाद देतात ह्यावरून, पाणिनीच्या १. ४. १. ह्या सूत्रावर भाष्य करताना पतंजली भारतीय भूगोलाची ब्राह्मणी देश (अव्रुशलको देशः) आणि अब्राह्मणी देश (अब्रह्मणाको देशः) अशी विभागणी करतो.)

सुगावा प्रकाशन, पहिली आवृत्ती- २००३
परंतु, १९९६ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व' ह्या पुस्तकात त्यांनी ह्या भूमिकेपासून एक नवीन वळण घेतले. पाटलांची समन्वयवादी दृष्टी आता अधिक व्यापक तात्त्विक पातळीवर (epistemological) भारतीय मार्क्सवादाची बौद्ध तत्वज्ञानाच्या सौत्रान्तिक पद्धतीशी नाळ जोडण्याचा प्रयत्न करताना दिसते. इ. स. पूर्व पाचव्या शतकातला बौद्ध दार्शनिक दिग्नाग ह्याने विकसित केलेल्या नेणिवेच्या सिद्धांताची पाटील मार्क्सवादाच्या परिवर्तनवादाशी सांगड घालतात. पाटलांच्या मते मार्क्सचा जो जग बदलण्याचा आग्रह आहे, त्यासाठी आधी हे जग नेणिवेच्या पातळीवर कसे पाहिले जाते हे समजून घेणे आवश्यक आहे. दिग्नागाच्या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राने कालिदासाच्या ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचा पराभव करण्यासाठी निर्मिलेला नेणिवेचा सिद्धांत पाटील मार्क्सवादाशी जोडून एक नवीन ज्ञानशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. १९८८ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या 'अब्राह्मणी साहित्यांचे सौंदर्यशास्त्र' ह्या पुस्तकात ह्या नव्या सौंदर्यशास्त्राची सविस्तर चर्चा आलेली आहे (सुगावा प्रकाशन, आता अनुपलब्ध). ह्याच पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या 'उत्सव' सिनेमाचे परीक्षण वाचून त्या सिनेमाचे दिग्दर्शक गिरीश कर्नाड पाटलांना भेटायला स्वतःहून धुळ्याला आले होते. त्यांच्या सविस्तर चर्चेचा संदर्भ कर्नाडांच्या काही मुलाखतींमध्ये येतो.

पाटलांचा जन्म १९२५ साली धुळ्यात एका सत्यशोधक कुटुंबात झाला. १९४५ साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना त्यांनी शिक्षणाला राम राम ठोकून विद्यार्थी संपात उडी घेतली आणि पुढे आयुष्यभर मार्क्सवादी चळवळीत काम केले. १९२५ साली स्थापना झालेल्या 'भारतीय कम्युनिस्ट पक्षा'ची १९६४ साली 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष' आणि 'भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)' अशी दोन पक्षांमध्ये विभागणी झाल्यावर पाटील मार्क्सवादी पक्षात गेले. तिथेही जातीचा अजेंडा काही पक्ष कार्यक्रमात अग्रक्रम मिळवू न शकल्याने, पाटील अखेर १९७८ साली पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली त्याला नाव दिले: 'सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष'. आपल्या नवीन मा-फु-आवादी भूमिकेतून त्यांनी पारंपरिक मार्क्सवाद्यांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या अनेक ज्ञानशास्त्रीय आणि ऐतिहासिक गृहितकांवर टीका केली. पारंपरिक मार्क्सवादी दृष्टीकोनाविरोधात, त्यांनी असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की वर्ग (class) ही संस्था वसाहतवादातून जन्माला आलेली असून, त्या आधी ती भारतीय इतिहासात एक कोटी (category) म्हणून वावरत नाही. दुसऱ्या बाजूला जातीचा ऐतिहासिक विकासक्रम उलगडून दाखवताना, पाटील सांगतात की, जात तिच्या उगमाच्या वेळी एक नवीन प्रगतिशील सामाजिक संस्था होती त्यामुळे, गौतम बुद्धाने त्याच्या हयातीत जातिव्यवस्थेला अनुकूल भूमिका घेतली होती. ह्या भूमिकेत डॉ. आंबेडकरांच्या जातीच्या उगमाविषयक संकल्पनेची टीका आहे आणि त्यामुळे पाटलांच्या ह्या भूमिकेचा दलित चळवळीत बराच प्रतिवाद झाला. पाटलांचा दलित आणि बहुजनवादी राजकारणावरचा मुख्य आक्षेप हा राहिला की, ह्या चळवळी जातिसंस्थेचा उच्छेद ह्या मूळ सूत्राशी प्रामाणिक राहिल्या नाहीत.

मावळाई प्रकाशन, पहिली आवृत्ती- २०१२
कुठल्याही अकॅडमिक ट्रेनिंगशिवाय पाटलांनी इतिहासकार, प्राच्च्यविद्या पंडित, व्याकरणकार, आणि तत्वज्ञानी अश्या अनेक भूमिकांतून भरपूर लिखाण केले. ह्याशिवाय १९४७ ते १९४९ मध्ये धुळे ट्रेड युनिअन मध्ये, १९५१ ते १९५६ शेतकरी संघर्षात आणि १९५७ पासून शेवटपर्यंत आदिवासी मुक्ती लढ्यांत ते कार्यरत होते. अंतोनिओ ग्राम्शी हा इतालिअन मार्क्सवादी ज्याला 'ऑरगॅनिक विचारवंत' म्हणतो, त्याचे पाटील प्रामाणिक प्रतिनिधी आहेत.

एक छोटासा किस्सा नोंदवून हा लेख आटोपता घेतो: 'जात्यन्तक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी पूर्ती' (२००३) ह्या पुस्तकात कॉम्रेड पाटलांनी एक प्रसंग सांगितलाय (हा किस्सा इंग्रजी भाषांतरात मात्र नाहीये!): धुळे जिल्ह्यातल्या वाटोदा नावाच्या गावी एका व्याख्यानानंतर तिथल्या शेतकऱ्यांशी कॉम्रेड पाटील बोलत होते. त्यापैकी काही जण चीनमधील शेतीचे प्रयोग पाहण्यासाठी भारत सरकारतर्फे नुकतेच जाऊन आले होते. तिथे त्यांना एक मराठी जाणणारा चिनी दुभाषा मदतनीस म्हणून सोबत दिला होता. त्या दुभाष्याशी ह्या मंडळींची मैत्री झाल्यावर, त्याने विचारले : 'शरद् पाटलांचे कसे काय चालले आहे?' ही मंडळी चाट झाली.

हा प्रसंग अनेक अर्थाने वैशिष्ठ्यपूर्ण आहे..

वैचारिक इतिहासाचे प्रवाह कुठून कुठे वाहत असतात? पाटील ह्या चिनी दुभाष्यापर्यंत कसे पोहोचले? आणि आपल्या मराठी मुख्य धारेतल्या लिखाणात ते का पोहोचले नाहीत? त्यांच्या मृत्यूनंतर देखील भारतीय पातळीवर त्यांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा उच्चारलं गेलेलं नाही. पाटील त्यांच्या भाषणात आणि लिखाणातही सांगत की त्यांचा बऱ्याच भाषांमध्ये अभ्यास केला जातोय… त्यात भारतीय इंग्रजी का नसावी?
***

वर उल्लेख आलेल्या पुस्तकांपैकी एका पुस्तकातून शरद् पाटील यांच्याबद्दलची थोडक्यात सनावळी-

१९२५ : १७ सप्टेंबर रोजी धुळे येथे सत्यशोधकी शेतकरी कुटुंबात जन्म.
१९४२ : धुळे येथेच मॅट्रिक्युलेशन.
१९४३ : बडोद्याच्या कलाभवनात पेंटिंग कोर्सला प्रवेश.
१९४४ : मुंबईत जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधे दाखल.
१९४५ : पहिल्या देशव्यापी विद्यार्थी संपात सहभागी.
१९४६ : शिक्षण सोडून जीवनदानी कार्यकर्ते. कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतल्या मुख्यालयात चित्रकार.
१९४७ : धुळे येथे ट्रेड युनियन आघाडीवर.
१९४९ : हद्दपारी.
१९५१ : शेतकरी आघाडीवर.
१९५६ : पासून मृत्यूपर्यंत आदिवासी चळवळीत कार्यरत.
१९६४ : कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल.
१९६६ : दोन तुरुंगवास भोगून सुटल्यानंतर बडोद्यात संशोधनासाठी व संस्कृत (पाणिनी) व्याकरण शिकण्यासाठी वास्तव्य.
१९७८ : (२७ जुलै) जातिव्यवस्थेविरुद्ध लढायला मा.क.प.ने नकार दिल्याने पक्षाचा राजीनामा.
१९७८ : (१५ ऑक्टोबर) मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादी तत्त्वावर आधारलेला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष स्थापन.
१९८२ : (ते १९९३) 'सत्यशोधक मार्क्सवादी' मासिकाचे संपादन.
१९८७ : दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त महासभेतर्पे साक्री येथे आंदोलन.
***

पाटलांचं पुस्तक रूपात प्रकाशित साहित्य - 

खंड १ : भाग १ व २ : दास-शूद्रांची गुलामगिरी
खंड १ : भाग ३ : रामायण महाभारतातील वर्णसंघर्ष
खंड २ : भाग १ : जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व
खंड २ : भाग २ : शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण - महंमदी की ब्राह्मणी?
खंत ३ : जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पूर्ती
खंड ४ : प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद
इतर : अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र  मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवाद  भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत  बुद्ध : भारतीय इतिहासातील लोकशाही  स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्त्रोत  पश्चिम भारतातील स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका  स्त्री-शूद्रांच्या स्वराज्याचा राजा (नाट्यसंहिता)  शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा की जात्यंतक समतेचा? । नामांतर- औरंगाबाद आणि पुण्याचे.
***

शरद् पाटील यांचं इंटरनेटवर उपलब्ध काही लिखाण-

मराठी :

इंग्रजी :
प्रॉब्लेम ऑफ स्लेव्हरी इन एन्शन्ट इंडिया (सोशल सायन्टिस्ट, जून १९७३)
ऑन अ सर्व्हे ऑफ फेमिन कन्डिशन्स इन साक्री तालुका ऑफ महाराष्ट्र (सोशल सायन्टिस्ट, ऑगस्ट१९७३)
अर्थ मदर (सोशल सायन्टिस्ट, एप्रिल १९७४)
ए मार्क्सिस्ट एक्स्पोझिशन ऑफ इस्लाम (सोशल सायन्टिस्ट, मे १९७६)
***
शरद् पाटील व लोक
('परिवर्तनाचा वाटसरू' पाक्षिकाच्या १६ जुलै २०१३च्या शरद् पाटील विशेषांकातला फोटो.)

Tuesday, 22 July 2014

निखिल वागळे



निखिल वागळे यांचा राजीनामा
आयबीएन लोकमत या वाहिनीला फार मोठी लोकप्रियता मिळवून देण्यात संपादक निखिल वागळे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या आक्रमक पत्रकारितेवर बेहद्द खुश असलेला जसा फार मोठा वर्ग होता तसाच त्यांच्यावर चिडलेलाही. आणि त्यांचे वाभाडे काढणारीही बरीच मंडळी होती. अफाट समर्थक आणि मज्बूत विरोधक लाभलेले बलदंड संपादक हीच त्यांची  खरी ओळख आहे.राहील. भुमिका घ्यायची म्हटली की कोणालाही अजातशत्रू राहताच येत नाही. संपुर्ण लोकानुनय आणि गोलगोल-गोडगोड पत्रकारिता करणारे बरेच जण आहेत. त्यांची स्वत:ची ओळख काय?बोटचेपे आणि शरणागत हीच.
याचा अर्थ वागळे सर्वगुणसंपन्न पत्रकार होते किंवा आदर्श संपादक होते असाही नाही. ते रोखठोक होते. बेधडक नी बिन्धास होते पण तरिही बरेचसे पक्षपाती होते हे खरेच आहे. अनेकदा ते समोरच्याला बोलूच देत नसत.त्यांच्या लाडक्या मतांवर ते निहायत खूष असायचे. त्यालाही दुसरी बाजू असू शकते हेच त्यांना मंजूर नसते. दुसर्‍यालाही भले त्याचे म्हणणे चुकीचे असेल पण ते मांडू दिले पाहिजे असे ज्यांना वाटत नाही आणि समोरच्याचे शांतपणे ऎकून घेण्याची सहिष्णुता ज्यांच्याकडे नसते ते आक्रमकतेमुळे कितीही लोकप्रिय झाले तरी श्रेष्ठ पत्रकार किंवा संपादक होऊ शकत नाहीत. "बघा फक्त आयबीएन लोकमत" ही त्यांची घोषणा तर हास्यास्पदच होती. आहे.
वागळे बहुश्रुत होते. प्रागतिक होते. उत्तम वक्ते होते, पण तरिही नको इतके स्वत:वर खुष होते.डूख धरणे हा त्यांचा स्वभाव होता. स्वत:च्या च्यानेलचे ढोल पिटणे यात ते वाकबगार होते. अनेकदा अनाकलनीयरित्या ते घुमजावही करायचे.विश्वासार्हतेपेक्षा लोकप्रियता आणि बेदरकारवृत्ती यासाठी ते अधिक दक्ष असल्याचे जाणवायचे. त्यांच्या प्रागतिक विचारांमुळे एका विशिष्ट छावणीतली मंडळी त्यांच्यावर फार खुन्नस धरून होती/आहेत. याउलट त्यांच्या सरधोपट आणि आभासी प्रागतिक मतांचा इतका डांगोरा पिटला गेला होता की वागळे पुरोगाम्यांचे भलतेच लाडके बणून गेले होते.  अनेक नव्या मुलामुलींना विशेषत: विविध सामाजिक थरातील मुलामुलींना मोठी संधी दिली. वागळेंचे अनेक कार्यक्रम गाजले. काही गाजवलेही गेले.
वागळे आणि अत्रे यांच्यात एक साम्य होते.आहे. दोघेही अफाट, पण हा वरवरचा वर्ख झाला. खोलखोल आत हे दोघेही गुणवान परंतु अत्यंत मिजासखोर आणि बेमुर्वत. अंगी गुणवत्ता बरीच मोठी असूनही,  आपली वैगुण्ये दागिन्यांसारखे आवर्जून सांभाळणारे. अशांना फक्त स्तुतीपाठक आवडतात.टिकाकार नकोसे असतात.
वागळॆंसारखे  लोक आपणही एक नोकर आहोत हे विसरून अमरपट्टा घेऊन आल्यासारखे मालकाच्या थाटात वागतात आणि स्वत:वर ही वेळ ओढवून घेतात.
वागळे लवकरच दुसर्‍या च्यानेलवर जातील. कदाचित स्वत:चे च्यानेलही काढतील. ते स्वस्थ बसणारे नाहीत. त्यांनी स्वस्थ बसूही नये. त्यांची रसवंती नक्कीच बरसेल. त्यांच्याशिवाय आयबीएन पुचाट अगदी मचूळ वाटेल. वागळे म्हणजे आयबीएन, आणि आयबीएन म्हणजे वागळे अशी सवय लागलेले लोक वैतागतील. वागळॆंना पुढील प्रवासासाठी सर्व शुभेच्छा. ते गेले म्हणून हर्षवायू झालेल्यांना कानाखाली वाजवायला वागळे लवकरच प्रगटतील...आम्ही त्यांच्या सगळ्या गुणदोषांसह त्यांची वाट बघत राहू..प्रतिक्षेत...

Monday, 7 April 2014

नात्यांमधल्या जिव्हाळय़ाचे वाजले सूप'

http://www.epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=12&eddate=04%2f05%2f2014...
नात्यांमधल्या जिव्हाळय़ाचे वाजले सूप'...विनायक पात्रूडकर, लोकमत, दि. ५एप्रिल, २०१४
काही मित्रांनी ब्लॉगवर सूप' वाजले, या शब्दाचा नव्याने अर्थ कळल्याचे लिहिले आणि दिवसभर चिकन सूप आणि तेलकट बटाटेवडा याचीच चर्चा सुरू होती. राज ठाकरे यांनी डोंबिवलीच्या सभेत वैयक्तिक टीकेची जी पातळी गाठली, त्यावरून संवेदनशील आणि सुसंस्कृत मराठी मनाला नक्कीच वेदना झाल्या.
एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हाताला कळता कामा नये, अशी आपली संस्कृती सांगते. इकडे निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जो शिमगा सुरू आहे तो पाहता ठाकर्‍यांची भाऊबंदकी आणखी कोणती पातळी गाठणार, हाच प्रश्न शिल्लक राहिला आहे. म्हातारपणाची सेवा हे कर्तव्यच मानले जाते. प्रत्येकजण आपल्या घरातील ज्येष्ठांसाठी काही ना काही करत असतोच; पण त्याची वाच्यता जाहीरपणे करणे हे कृतघ्नपणाचे लक्षण मानले जाते. राज ठाकरेंनी वक्तृत्वशैलीचा गैरवापर करून बाळासाहेबांना दिलेले अन्न बाहेर काढले. त्यातून त्यांना काय संदेश द्यावयाचा होता? उद्धव ठाकरे बाळासाहेबांची नीट काळजी घेत नव्हते? त्यांची हेळसांड होत होती? की माझ्या पाठविलेल्या चिकन सूपमुळे ते ठणठणीत होते? राजकीय व्यासपीठावर या वैयक्तिक स्वरूपाच्या गोष्टींना किती महत्त्व द्यायला पाहिजे? मराठी जनता जेव्हा या गोष्टी ऐकते तेव्हा त्यांना या सूपात किंवा बटाटेवड्यात रस नसतो. विकासाच्या कोणत्या मुद्यांना हात घालता, याविषयी उत्सुकता असते. राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसात जी मदत केली ती त्यांच्यातल्या रक्ताच्या नात्यामुळे. मनसेप्रमुख म्हणून ते चिकन सूप' पाठवत नव्हते. उद्धव ठाकरे यांना 'लीलावती'तून गाडी चालवत घरी आणले ते त्यांचा सख्खा चुलत भाऊ म्हणून.. मनसेप्रमुख म्हणून नव्हे, आणि बाळासाहेबांनीही राज ठाकरेंना फोन केला ते पुतण्या आणि घरातला कर्ता पुरुष म्हणून. तिथे राजकीय मुद्दा येतोच कुठे? ठाकरे कुटुंबातील वाद असे रस्त्यावरील चर्चेचा विषय होणे, हे मराठी माणसाला वेदनादायी आहेत. ठाकरे कुटुंबाकडे महाराष्ट्र आदराने पाहतो. त्यांच्या कर्तृत्वाची झालर सार्‍या मराठी मनावर कोरलेली आहे. त्यांच्या नातेसंबंधांचे असे धिंडवडे उडालेले पाहण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे, तेही केवळ निवडणुकीतील मताधिक्य खेचण्यासाठी. बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसातले असे खाणे-पिणे बाहेर काढणे, तेही जाहीर सभेत, हा किळसवाणाच प्रकार म्हटला पाहिजे. शिवाय मी हा सवाल-जवाब सुरू ठेवणार, असे सांगत राज ठाकरेंनी आणखी खाणं-पिणं बाहेर काढणार, याचे जणू सूतोवाच केले, यामुळे मराठी माणसांपुढे काय प्रतिमा तयार झाली. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची नीट काळजी घेतली नाही की राज ठाकरेंनी अधिक चांगली काळजी घेतली असती? रक्ताची नाती जेव्हा उपकाराची भाषा बोलायला लागतात तेव्हा नात्यातला जिव्हाळा संपलेला असतो, उरलेला असतो तो व्यवहार. राज ठाकरेंना या व्यवहारावर मतांचा बाजार मांडायचा आहे, हेच यातून स्पष्ट होते. राजकीय मतभिन्नता आणि वैयक्तिक नातेसंबंध यांची योग्य सरमिसळ राज ठाकरेंनी घालायला हवी. त्यांच्या वक्तृत्वाचा परिणाम होणारी नवी पिढी मराठी माणसांमध्ये आहे, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारीही अधिक आहे. मतांच्या बाजारात नात्यांचा जिव्हाळा संपायला नको इतकी साधी भावना मराठी माणसांची आहे.
भाऊबंदकीचा इतिहास महाराष्ट्राला नवा नाही. तरीही नव्या विचारांच्या संवेदनशील तरुण पिढीला या वैयक्तिक हेवेदाव्यात, अहंकारात अजिबात रस नाही. त्यांना विकासाची दिशा देणारे नवे नेतृत्व हवे आहे. ठाकरे बंधूंकडे ते याच नजरेने पाहतात, याची जाणीव ठेवली तरी पुरे. 
विनायक पात्रुडकर
निवासी संपादक
लोकमत मुंबई

Sunday, 23 March 2014

पी. सी. जोशी नावाचा मृद्गंध

मुख्यपान » सप्तरंग » बातम्या
 
0
 
0
 
पी. सी. जोशी नावाचा मृद्गंध ! (उदय प्रकाश)
- उदय प्रकाश
रविवार, 23 मार्च 2014 - 01:00 AM IST
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4938590056682933952&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20140323&Provider=%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6&NewsTitle=%E0%A4%AA%E0%A5%80.%20%E0%A4%B8%E0%A5%80.%20%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7%20!%20(%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6)
...
"भारतातल्या टीव्हीमाध्यमाला भारतीय मातीचाच सुगंध यायला हवा,' अशी आग्रही भूमिका विख्यात माध्यमतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ पी. सी. जोशी यांची होती. ही भूमिका त्यांनी अधिकाधिक प्रखर करत नेली. भारतीय मातीचं माहात्म्य जाणून असणारे जोशी यांचं अलीकडंच दिल्लीत निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी कुठल्या टीव्हीवाहिनीवरही झळकली नाही, की वृत्तपत्रांनाही त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. जोशी यांचा सहवास लाभलेले ज्येष्ठ संपादक आणि साहित्यिक उदय प्रकाश यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी... 

"तो' विख्यात समाजशास्त्रज्ञ, माध्यमतज्ज्ञ, ग्रामीण अर्थव्यवस्थेवर करडी नजर ठेवणारा अर्थशास्त्रज्ञ, तसंच साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रांतल्या बदलांच्या एकेका वळणाची सर्वांगीण माहिती असणारा बुद्धिवंत...राजधानी दिल्लीतल्या "पश्‍चिमविहार'मधल्या आपल्या फ्लॅटमध्ये दोन मार्च रोजी "त्या'नं या जगाचा गुपचूप निरोप घेतला...हिंदी वृत्तपत्रांत आणि टीव्ही वाहिन्यांवर त्या दिवशी केवळ निवडणुकीच्या सनसनाटी बातम्या वाजत-गाजत राहिल्या...त्या बातम्यांमध्ये "त्या'च्या जाण्याची बातमी कुठंच नव्हती. 

दिल्लीत 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर जेव्हा दंगे भडकले होते, तेव्हा राजीव गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्याला अलीकडं 
जणू काही एखाद्या म्हणीचं स्वरूप प्राप्त झालंय. राजीव यांचं हे वक्तव्य दाखल्यापोटी वारंवार सांगितलं जातं. ते वक्तव्य होतं ः "जेव्हा एखादं मोठं झाड कोसळतं, तेव्हा धरणीकंप होतो...जमीन हादरते' (जब कोई बडा पेड गिरता है तो धरती हिलती है). 

मात्र, असं वाटून जातं, की ही "मोठी झाडं' केवळ राजकारणाच्याच मैदानात उगवत असावीत आणि कोसळत असावीत! राजकारणापलीकडच्या क्षेत्रात, म्हणजे ज्ञान-विज्ञान, कला-संस्कृती, अर्थ, समाजशास्त्र आदी क्षेत्रांत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या व्यक्ती या काही आता अशी "मोठी झाडं' बनू शकणार नाहीत... या क्षेत्रांतली अशी "मोठी झाडं' कोसळल्यानं जमीनच काय; पण प्रसारमाध्यमं, गेलाबाजार एखादं ढिम्म वर्तमानपत्रंही, जरासुद्धा हलणार नाही, असंही वाटून जातं. अशी माणसं सध्याच्या काळात आपोआप उगवून येणाऱ्या खुरट्या, जंगली रोपांसारखीच झाली आहेत जणू. ही रोपं, या वनस्पती आपापल्या उगवतात आणि निसर्गाच्या भरोशावर जगत-वाढत राहतात... अशा माणसांचं असणं ही काही बातमी होऊ शकत नाही आणि त्यांचं जाणं हासुद्धा बातमीचा विषय होऊ शकत नाही! कारण, अशा माणसांच्या बातमीमुळं कुण्या वाहिनीचा टीआरपी वाढत नाही, शेअर बाजाराचा निर्देशांक उसळी मारत नाही, की कुठलं सरकार स्थापन होत नाही वा गडगडतही नाही! 

विख्यात समाजशास्त्रज्ञ आणि माध्यमतज्ज्ञ पी. सी. जोशी (पूर्णचंद्र जोशी) यांच्याविषयी मी बोलत आहे...भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी महासचिव पी. सी. जोशी यांचं नाव आज बहुतकरून अनेकांना माहीत असतं; मात्र मी ज्या पी. सी. जोशी यांच्याविषयी बोलत आहे, त्यांचं महत्त्व ठाऊक असणारे फार कमी लोक असतील. फुटण्यापूर्वीच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते पी. सी. जोशी यांची कामगिरी तर महत्त्वाची आहेच आहे; पण त्या जोशींपेक्षा सुमारे वीस वर्षांहून लहान असणारे समाजशास्त्रज्ञ, माध्यमतज्ज्ञ पी. सी. जोशी यांनी त्यांच्या क्षेत्रात बजावलेली कामगिरीही तितकीच तोलामोलाची आहे. जोशी यांच्याशी गप्पा मारण्याचा, त्यांच्या मुलाखतीचा योग मला काही वर्षांपूर्वी आला होता, त्या वेळी त्यांनी जे विचार मांडले होते, ते मला इथं द्यावेसे वाटतात. "मेरे साक्षात्कार' या त्यांच्या पुस्तकात ते समाविष्ट आहेत. त्यांचे हे विचार आजही किती कालोचित आहेत, ते तुमचं तुम्हालाच वाचताना जाणवेल. जोशी यांच्याविषयी मी अधिक काही सांगण्यापूर्वी नजर टाका त्यांच्या या विचारांवर... 

"प्रत्येक धर्माची चापलुसी (लिप-सर्व्हिस) करणं म्हणजे "धर्मनिरपेक्षता नव्हे. प्रत्येक धर्माची अंधभक्ती करणं किंवा नास्तिकता म्हणजेही धर्मनिरपेक्षता नव्हे. "काळ वेगानं बदलत आहे, तुम्हीसुद्धा आता बदलायला हवं, पुढं जायला हवं, जुन्या-पुराण्या विचारांना, जुन्या-पुराण्या पुस्तकांना, जुन्याच रूढींना चिकटून बसाल, तर मागं पडाल,' असं आता प्रत्येक धार्मिक संघटनेला, संप्रदायाला सांगण्याची वेळ आलेली आहे. आमच्या सगळ्या दळणवळणाच्या, संवादाच्या माध्यमांचा उपयोग याच कामासाठी व्हायला हवा. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान अमक्‍या मंदिरात गेले, तमक्‍या मशिदीत गेले, अमक्‍या गुरुद्वारात गेले, तमक्‍या चर्चमध्ये गेले आणि ते तिथं नतमस्तक झाले...त्यांनी तिथं पूजा-अर्चा केली, हे असलं काहीही टीव्हीवर कधीही दाखवलं जाता कामा नये, असंही माझं म्हणणं आहे आणि असं काही दाखवलं जात असेल, तर ऑडिटर जनरलनं त्याविषयी जोरदार हरकत घ्यायला हवी, तीव्र नापसंती व्यक्त करायला हवी. कुणाला असं काही (मंदिर-मशीद-गुरुद्वारा-चर्चमध्ये जाणं इत्यादी...) आपल्या व्यक्तिगत श्रद्धेपोटी करायचं असेल, तर त्यांनी ते खुशाल करावं; परंतु त्यासाठी सरकारी वाहन, सरकारी सुरक्षायंत्रणा, राजकीय विशेषाधिकार यांचा वापर संबंधितांनी करता कामा नये आणि आपल्या प्रचारासाठी माध्यमांचाही असा वापर संबंधितांनी करायला नको. आज राजकारणाचं सांप्रदायिकीकरण ज्या पद्धतीनं झालं आहे, ते पाहता अशा वातावरणात अशा प्रकारांनी वेगवेगळ्या समुदायांमध्ये एकता निर्माण होण्याऐवजी त्यांची विभागणी होऊन त्यांत फूटच पाडत असते. 

कुठल्याही धर्माला सत्तेच्या कुबड्याही मिळायला नकोत. संतांनी-पीरांनी म्हटलं आहे, की धर्म आणि सत्ता यांच्यात नेहमीच वितुष्ट राहिलेलं आहे. ज्यांचे डोळे सदोदित सत्तेकडंच लागलेले असतात, ते असले कसले धर्म सध्या आपल्याकडं निर्माण झाले आहेत? जो धर्म सत्तांचा आधार घेतो किंवा सत्तालोलुप असतो, तो धर्म अनैतिक होय. त्याला सत्तेत राहण्याचा कुठलाही अधिकार नाही. '' 

देशात स्वतंत्रपणे काम करणारं आणि सामाजिक जबाबदारी असणारं माध्यमविषयक धोरण सुचवण्यासाठी 1982 मध्ये जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्याच जोशी यांचे हे विचार आहेत. त्या वेळी टीव्ही हे माध्यम "आकाशवाणी'च्या रेडिओ केंद्रापासून स्वतंत्र आणि स्वायत्त होऊ घातलं होतं. हे माध्यम दिल्लीच्या आसपासच्याच भागापुरतं सीमित न राहता, देशाच्या दूरदूरच्या भागात पोचण्यासाठी सज्ज होत होतं... टीव्ही तेव्हा रंगीतही होऊ घातला होता. त्याच काळात राजीव गांधी यांच्या नेतृत्वांतर्गत दिल्लीत आशियाई क्रीडास्पर्धाही आयोजिल्या गेल्या होत्या आणि दिल्लीच्या रस्त्यांवरून "मारुती-800' ही मोटार प्रथमच धावत होती. तो काळ म्हणजे मारुती-800 या मोटारीनं जुन्या ऍम्बॅसिडर आणि फियाट मोटारींना स्पर्धेतून बाहेर फेकण्याचा काळ होता. त्या वेळी "वॉकी टॉकी' हातात बाळगणं हे प्रतिष्ठेचं लक्षण बनलं होतं. अशा त्या सगळ्या काळात जोशी यांची दृष्टी तंत्रज्ञानातला हा सगळा बदल निरखत-न्याहाळत होती आणि समग्र भारतीय समाजावर त्याचा जो काही परिणाम होणार होता, त्याबद्दल चिंताग्रस्त होती. वर उल्लेखिल्याप्रमाणे त्यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या "पी. सी. जोशी समिती'नं तिचा अहवाल 1984 मध्ये पूर्ण केला आणि सरकारला सोपवला. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कुण्या मंत्र्यानं किंवा कुण्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं या अहवालाची पानं केवळ उलटून-पालटून जरी पाहिली असती, तरी खूप बरं झालं असतं. या मंत्र्यांनी-अधिकाऱ्यांनी असं केलं असतं तर काय झालं असतं? आज टीव्ही अर्थात इलेक्‍ट्रॉनिक माध्यमात ज्या पद्धतीची धंदेवाईकता बोकाळली आहे, ज्या पद्धतीनं टीव्हीद्वारे केवळ माहितीच नव्हे; तर वाहिन्याच्या वाहिन्या विकल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं व्यापारी घराण्यांशी आणि राजकीय पक्षांशी लाखो-कोट्यवधी रुपयांची "डीलबाजी' करणाऱ्या पत्रकारांचे प्रताप उघड होत आहेत, त्या सगळ्या प्रकारांना अंकुश लावता आला असता. माध्यमं (मीडिया) भलेही खूप शक्तिशाली असतील, त्यांना "लोकशाहीचा चौथा स्तंभ' असं भलेही म्हटलं जात असेल, मात्र "जनता' नावाचा आणखीही एक "विराट' आणि अदृश्‍य राहणारा "स्तंभ' असतो. जनता नावाच्या या विराट स्तभांपेक्षा माध्यमांना मोठं आणि शक्तिशाली होऊ दिलं जाता नये. 

"पी. सी. जोशी समिती'मध्ये विख्यात चित्रपट-दिग्दर्शक मृणाल सेन, सई परांजपे, "दादासाहेब फाळके पुरस्कार'विजेते संगीतकार भूपेन हजारिका 
आदी मातब्बर मंडळी होती. कला-माहिती-संदेश-संवाद आणि समाज यांच्यातल्या संबंधांचं गांभीर्य आणि परिणाम यांची चांगलीच जाण या मंडळींना होती. म्हणूनच युरोपातल्या टीव्हीमाध्यमापेक्षा किंवा अमेरिकेसारख्या आधुनिक, औद्योगिक, समृद्ध आणि विकसित झालेल्या देशातल्या टीव्हीमाध्यमापेक्षा वेगळं टीव्हीमाध्यम या मंडळींना अपेक्षित होतं. भारतासारख्या मागासलेल्या, गरीब, निरक्षर आणि असंख्य प्रकारच्या रूढी-परंपरांनी बजबजलेल्या समाजासाठी एक वेगळ्या प्रकारचं टीव्हीमाध्यम असायला हवं, असं या मंडळींना वाटत होतं. या टीव्हीमाध्यमाला भारतीय मातीचाच सुगंध यायला हवा. त्याचा चेहरा आणि आत्मा याच मातीनं दरवळायला हवा, अशी या समितीची अपेक्षा होती. 

या समितीनं सरकारला जो अहवाल सादर केला होता, त्याचं शीर्षकही हीच अपेक्षा व्यक्त करणारं होतं. ते शीर्षक असं होतं ः "ऍन इंडियन पर्सनॅलिटी फॉर टीव्ही'. मात्र, सरकारनं हा अहवाल घेतला व फडताळात ठेवून दिला आणि आता आपण सध्या पाहतच आहोत 200 वाहिन्यांची "इंडियन पर्सनॅलिटी'...! आपण पाहतच आहोत "भारतीय मातीचा दरवळणारा सुगंध...'! 

मी दिल्लीतल्या मिरांडा महाविद्यालयात एका कार्यक्रमासाठी गेलो असता, त्या कार्यक्रमात जोशी यांच्या निधनाची बातमी मला कळली. त्यांच्या मृत्यूनंतर सहा दिवसांनी. ही बातमी उशिरा कळल्यामुळं मला म्हणूनच आश्‍चर्य वाटलं नाही; पण तीव्र दुःख मात्र जरूर झालं. जोशी यांच्या निधनाची माहिती तोवर कुठंच नव्हती, याचं दुःख केवळ मलाच झालं असेल, असं नाही. शास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कला-संस्कृती या क्षेत्रांत काम करणारे मान्यवर, इतिहास संशोधक, पुरातत्त्वज्ञ अशी आपापल्या क्षेत्राला वाहून घेतलेली आपल्या देशातली जी काही मंडळी आहेत, ती कोणत्याही गुन्हेगारापेक्षा, भ्रष्ट नेत्यापेक्षा किंवा बॉलिवूडमधल्या मनोरंजनाच्या कारखान्यात एका ठुमक्‍यावर कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या नट-नट्यांपेक्षा, हिंसाचाराच्या दृश्‍यांचा आणि अंगप्रदर्शनाचा आधार घेत "बॉक्‍स ऑफिस सुपरहिट' सिनेमे निर्माण करणाऱ्यांपेक्षा नक्कीच मौल्यवान आणि अनमोल आहेत, असं टीव्ही पाहणाऱ्या, टीव्ही संच घरी असणाऱ्या या देशातल्या लाखो-कोट्यवधी प्रेक्षकांना वाटत असेल. मला जसं वाटतं तसंच. 

पी. सी. जोशी हे दिल्ली विद्यापीठातल्या "इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ' या संस्थेचे संचालकही होते. "कल्चरल डायनॅमिक्‍स ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ'सारखं नावाजलेलं पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. 
जोशी यांनी काही काळापूर्वी इशारा दिला होता ः 

""आपल्या संवादमाध्यमांचा, दळणवळणाच्या माध्यमांच्या अमर्याद क्षमतांचा भीतिदायक दुरुपयोग होत आहे, ही वस्तुस्थिती आहे. येणारी माहिती आणि प्रसारित होणाऱ्या बातम्या यांच्याकडं गांभीर्यानं पाहील, असा कुणी "थिंकटॅक' त्यांच्याकडं नाहीय. सत्यजित रे, भूपेन हजारिका आणि मृणाल सेन यांच्याशी माझं यासंदर्भात बोलणंही झालं होतं. मी या सगळ्या मान्यवरांना म्हटलं होतं ः "टीव्हीमाध्यमाचा दुरुपयोग होत असताना पाहून तुम्ही मंडळी त्याच्याकडं पाठ फिरवू नका. त्यात सहभागी होऊन या माध्यमाचं स्वरूप तुम्ही बदला. नाहीतर हा इलेक्‍ट्रॉनिक मीडिया प्रेक्षकांची अभिरुची इतकी विकृत आणि प्रदूषित करून टाकेल, की प्रेक्षकवर्ग मग तुमच्यासारख्या मंडळींच्या चित्रपटांचा आनंद लुटायला लायकच राहणार नाही.' '' 
दुर्दैवानं असंच घडलं आहे! 

जोशी यांना भारतीय साहित्याविषयीही खूप जिव्हाळा होता. हिंदीतले कथासम्राट मुन्शी प्रेमचंद यांच्या कादंबऱ्यांवर त्यांनी एक सुदीर्घ लेख लिहिलेला आहे. प्रेमचंद यांच्या "गोदान' आणि अन्य कादंबऱ्या आणि भारताची ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्यातल्या आंतरिक संबंधांकडं पाहण्याची वेगळीच दृष्टी हा लेख देतो. जोशी यांनी अतिशय मूलगामी पद्धतीनं हे बंध उलगडून दाखवले आहेत. 

जोशी यांचं हे अशा पद्धतीनं जगाचा निरोप घेणं ही माझ्यासारख्यांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. मग भलेही या बातमीला कुण्या व्यावसायिक टीव्हीवाहिनीनं किंवा वृत्तपत्रानं स्थान दिलेलं नसेना का ! 

पी. सी. जोशी यांना माझी विनम्र श्रद्धांजली...

Friday, 20 September 2013

संगमनेरी! (रंगनाथ पठारे)

रंगनाथ पठारे rangnathpathare@gmail.com
रविवार, 1 सप्टेंबर 2013 - 02:00 AM IST

माणसाचं जन्मगावाशी तर जिव्हाळ्याचं नातं असतंच; पण तो कर्मभूमीशीही अनोख्या ऋणानुबंधानं बांधला जातो...कदाचित जन्मगावापेक्षाही जास्त! कर्मभूमीतली माणसं, तिथला निसर्ग, तिथला परिसर, तिथलं वातावरण हे सगळं जगण्यात असं काही मिसळून जातं, की या गावाशिवाय स्वतःच्या अस्तित्वाची कल्पनाही करवत नाही...ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे आणि नगर जिल्ह्यातलं संगमनेर हे "अद्वैत' असंच आहे, त्याविषयी.. 

संगमनेरशी आज असलेलं माझं नातं कदाचित माझ्या जन्माच्या आधी ठरून गेलेलं असेल. माझे आई-वडील पुण्याजवळ कोथरूड (आता त्याला पुण्यातलं कोथरूड म्हणावं लागेल) या गावी राहत असताना मी माझ्या आईच्या पोटात होतो. दुसऱ्या महायुद्धात लढून आलेले माझे वडील तेव्हा ट्रक चालवत असत. माझा जन्म मात्र आमच्या जवळे या गावीच झाला. वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत मी गावी राहिलो. तिथंच मॅट्रिक झालो. नंतर शिक्षणासाठी चार वर्षं नगरला, तीन वर्षं पुण्यात आणि उरलेली 40 वर्षं संगमनेरात असा माझ्या आजवरच्या एकूण 63 वर्षांच्या आयुष्याचा सर्वसाधारण हिशेब आहे. उरलेल्या आयुष्यात मी आणखी कुठं कुठं थोडा फार राहीनही; पण माझी मुख्य छावणी संगमनेरातून हलण्याची शक्‍यता मला दिसत नाहीय. यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे, मी या गावाच्या, या परिसराच्या निरंतर प्रेमात अडकलेलो आहे. माझा स्वभाव आणि माझ्या गरजा लक्षात घेता वरवर खरंतर तसं काही कारण नाही. वृत्तीतल्या अंगभूत अंतर्मुखतेमुळं मी कोणत्याही गावात राहिलो असतो, तरी जास्तीत जास्त काळ स्वतःच्या आतच राहिलो असतो. गाव आणि परिसराकडून माझ्या ज्या किमान अपेक्षा असतात, त्या कुठंही सहज पुऱ्या झाल्या असत्या; तरीही प्रेमात पडून मी ह्याच गावात राहिलो. कारण, हे गाव माझ्या स्वभावाशी अत्यंत जुळणारं आहे. "सौ शहरी और एक संगमनेरी' असं म्हणतात. त्यात एक गुर्मी, एक ताठा, एक अभिमान असतो आणि त्याच वेळी हे गाव आणि हा परिसर यांच्यात एक अनवट सुसंस्कृतपण आहे. आव्हान झेलण्याची खुमखुमी आहे. मूल्यांच्या जपणुकीसाठी कोणत्याही थराला जाण्याची जिद्द आहे. या बाकीच्या गोष्टी माझ्या ठायी कदाचित नसतीलही; पण एक प्रकारची गुर्मी आणि काहीएक सुसंस्कृतपण माझ्या ठायी आहे, असं मला वाटतं. माझ्यासारख्या बारक्‍या माणसातल्या अंगभूत गुर्मीला या शहरानं सांभाळून घेतलं, हे मला फार श्रेष्ठ वाटतं. इथल्या लोकांमधल्या लढाऊ जिद्दीचा मला अभिमान वाटतो. चारी दिशांनी कुठूनही संगमनेरच्या जवळ येऊ लागलो, की आपण आपल्या लोकांमध्ये चाललो आहोत, अशी भावना मनात उगवते. हे असं आणखी कुठंही जाताना होत नाही. दुनियेतल्या कोणत्याही जागी मला इतकं निवांत वाटत नाही. वाराणशीला गंगेच्या घाटावर गेलो, मन अनेक भावनांनी उचंबळून आलं; पण ते तात्कालिक होतं. संगमनेरातल्या प्रवरा नदीकाठच्या घाटावर इतक्‍या वेळा बसलो, तरी तिथं जाण्याची माझी तहान अजूनही मिटलेली नाही. (या घाटालाही इथं "गंगामाईचा घाट'च म्हणतात). नदी वाहत असताना रात्रीच्या निवांत-एकांतवेळी या घाटावर बसून स्वतःशी संवाद करण्यात जे सुख आहे, त्याला अक्षरशः तोड नाही.देव-धर्म, पूजा-अर्चा यांना माझ्या जगण्यात जागा नाही. संगमनेरची त्याविषयी तक्रार नाही. इथं आत्यंतिक श्रद्धाळूंपासून अगदी अश्रद्ध माणसं एकमेकांच्या धारणांचा आदर बाळगत सुखानं नांदतात. ही माणसं वृत्तीनं फार उत्कट आहेत. प्रसंगी कोणत्याही टोकाला जाण्याची क्षमता ते बाळगून असतात; पण तिथं ती फार काळ टिकत नाहीत. अल्प काळातच सहिष्णुतेच्या निरंतर कोमल गोफात परततात. आपण संगमनेरी आहोत, याचा त्यांना फार अभिमान असतो.

मी इतकी वर्षं या शहरात राहत असलो, तरी मला इथं फार लोक ओळखत नाहीत आणि ही मला फार सुंदर गोष्ट वाटते. मला माझं खासगीपण, अनामिकपण इथं सहज जपता आलं. अर्थात हल्ली नावानं बरेच लोक ओळखतात. माझा धाकटा मुलगा डॉ.अनिरुद्ध 2008 पासून इथं नेत्रशल्यचिकित्सक म्हणून प्रॅक्‍टिस करतो. हल्ली "त्याचे वडील' ही माझी ओळख असते. माझ्या लेखक असण्याचं पुष्कळांना तितकं माहीत नसतं. तेही मला छान वाटतं. ज्यांना माहीत असतं, ते ती माहिती स्वतःजवळ ठेवतात. कामाखेरीज तुम्हाला निष्कारण ताप देण्याचा या लोकांचा स्वभाव नाही. मी या शहरात राहतो, हे पुष्कळांना अभिमानाचं वाटतं. आजच्या काळात या शहराला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर मानानं उभं करण्यात आपला सहभाग आहे, हे मला सुखद वाटतं. के. बी. दादा देशमुख, दत्ता देशमुख, नानासाहेब दुर्वे, भाऊसाहेब थोरात यांच्यासारखी उत्तुंग माणसं या भूमीत जन्मली. त्यातल्या काहींना मला पाहता आलं, काहींशी संवाद करता आला, ही माझ्यासाठी श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. इथल्या गोरगरिबांमध्ये, आदिवासींमध्ये शिक्षण पेरणाऱ्या प्राचार्य वि. म. कौंडिण्यांसारख्या माणसाच्या नेतृत्वाखाली मला 20 वर्षं काम करता आलं, ही मला माझ्या आयुष्यातली मोठी मिळकत वाटते. काही वर्षांआधी कुणीतरी (बहुधा मराठा ज्ञातीचे अभिमानी) म्हणाल्याचं ऐकलं ः "पठारे यांच्यात फार मोठी कुवत होती; पण कौंडिण्यांच्या नादी लागून त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं.'

मला अजूनही समजत नाही; माझं काय नुकसान झालं ? आणि झालंच असेल तर असं नुकसान आणखी हजार वेळा करून घ्यायला मी आनंदानं तयार आहे. (कै.) संभाजीराजे थोरात यांचं असाधारण अकृत्रिम मैत्र मला इथंच लाभलं. कुलीन मराठा घराण्यात जन्मलेल्या संभाजीराजे यांचा साहित्याशी दुरान्वयानंही संबंध नव्हता. तरीही आम्ही तासन्‌तास किंवा दिवसच्या दिवस एकमेकांसोबत आनंदानं राहत गप्पा करायचो. माझ्या घरगुती प्रश्‍नांत त्यांचा शब्द अंतिम असे. मला असं वाटतं, की एक वेगळ्या प्रकारची दिलेरी आणि चमत्कारिक भडकूपण हा आमच्यातला कॉमन फॅक्‍टर होता. आज या दुनियेत नसलेले दिलीप धर्म, व्ही. एस. उर्फ प्रकाश कुलकर्णी आणि हयात असलेले सु. रा. चुनेकर, अली मुल्ला खान वकील, रावसाहेब कसबे यांच्यासारखे मित्र मला इथंच मिळाले. यापैकी काहींशी आता माझा संपर्कही उरलेला नाहीय. काहींशी फार क्वचित तो होतो; पण त्यांनी माझं जगणं समृद्ध केल्याची कृतज्ञता माझ्या मनात कायम आहे. या मित्रांसोबत अनेक वैचारिक वाद झाले; किंबहुना अखंड वाद-विवाद, चर्चा हे या परिसराचं वैशिष्ट्यच आहे. इथं आलो तेव्हा मी अगदी रॉ होतो. माझी दुनिया फार सोपी-सरळ होती. "परीक्षेत अतोनात मार्क मिळवणारा तो बुद्धिमान' असा माझा बावळट समज होता. अहंगंड माझ्या ठायी अतोनात होता. त्या साऱ्याचा निचरा या शहरानं केला आणि मला सतत भूमीवर, गोरगरिबांविषयीच्या आस्थेच्या कवेत ठेवलं.

मी 1973 मध्ये संगमनेरात आलो. तेव्हा शहर लहान होतं. माझ्यासाठी खोली बघायला मी आणि दिलीप धर्म हिंडत होतो. त्या काळी बरेच प्राध्यापक चंद्रशेखर चौकाच्या परिसरात राहत असत. तो सामान्यतः ब्राह्मण ज्ञातीच्या वस्तीचा भाग होता. प्राध्यापकही बव्हंशी ब्राह्मणच असत. आम्ही गणपुले यांच्या वाड्यात जागा विचारण्यासाठी गेलो. त्या वाड्यात अत्रे, कुलकर्णी वगैरे आडनावांचे आमचे ज्येष्ठ सहकारी राहत होते. "जागा शिल्लक आहे,' असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. दिलीपनं माझी ओळख करून दिली. गणपुले म्हणाले ः ""पठारे म्हणजे मराठा काय?''
म्हटलं ः ""होय.''
म्हणाले ः ""म्हणजे आपण अभक्षभक्षण करत असालच.''
म्हटलं ः""अगदी रोज नाही; पण मला ते वर्ज्य नाहीय.''
म्हणाले ः ""आपणासाठी आमच्याकडं जागा नाही.''
बाहेर आलो. दिलीप वैतागला. म्हणाला ः ""फारच कर्मठ आहेत हे लोक.''
मी म्हटलं ः ""मला हा माणूस आवडला उलट. त्याचं जे काही आहे, ते त्यानं स्पष्ट आणि स्वच्छ मांडलं.''

आजही मला असं वाटतं, की हा खास संगमनेरी स्वभाव. आत-बाहेर वेगळं नाही. जे असेल ते स्वच्छ. नंतर मला तिथून जवळच वसंतराव ऊर्फ व्ही. आर. देशपांडे यांच्या वाड्यात जागा मिळाली. त्यांच्या घरातलं वातावरण वेगळं होतं. सगळ्या जाती-धर्मांच्या लोकांना तिथं मुक्त प्रवेश होता. ते फारच आनंदी आणि स्वागतशील लोक होते. कर्मठता आणि प्रागतिकता एकमेकींच्या शेजारी गुण्यागोविंदानं नांदण्याचा हा खास संगमनेरी स्वभाव. तिथं मी एक वर्ष राहिलो. नंतर कॉलेजच्या स्टाफ क्वार्टर्समध्ये मला जागा मिळावी म्हणून कसबे यांनी कौंडिण्यांकडं शब्द टाकला. कसबे हे त्यांचे थेट आणि आवडते विद्यार्थी. ही जागा कॉलेजच्या परिसरात असल्यानं अधिक सोयीची होती; म्हणून मी देशपांडे यांचा वाडा सोडला. तो वाडा मुळात पेशवाईतल्या साडेतीन शहाण्यांपैकी एक शहाणे असलेले निजामाचे दिवाण विठ्ठल सुंदर परशरामी यांचा होता.

नंतरचा सगळा काळ मी जुन्या शहराच्या गावठाणाबाहेर घुलेवाडी, गुंजाळवाडी अशा भागांत राहिलो. या परिसरानं मला इथं बांधून टाकण्याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं कारण माझे विद्यार्थी होत. सलग 37 वर्षं इथल्या मुला-मुलींशी मी जोडता राहिलो. त्यातल्या बहुतेकांची नावंदेखील मला आता सांगता येणार नाहीत; पण मी फार आनंदानं त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. मी स्वतःला त्यांच्या संगमनेरी स्वभावात पेरत राहिलो आणि त्यांच्यातलं संगमनेर माझ्यात घेत राहिलो. आता त्यांच्यात आणि माझ्यात कोणताही दुजाभाव राहिला आहे, असं मला वाटत नाही. मी लिहिणारा माणूस असल्यानं बाहेर पुष्कळांना वाटायचं, की शिकवण्यात मला खास रस नसेल. फिजिक्‍समध्ये मला तितकं स्वारस्य नसेल. मी कसा शिक्षक होतो, हे माझे विद्यार्थीच सांगू शकतील; पण शिकवणं ही माझी आवड होती, हे मी नक्की सांगेन. फिजिक्‍स वाचल्यामुळं मी दुनिया अधिक नीट समजावून घेऊ शकलो.आधी आधी मला वाटायचं, की आपण इतके बुद्धिमान (तो मूर्खपणा होता. परीक्षेत चांगले मार्क पडणं ही बौद्धिक उंचीची एकमेव कसोटी नव्हे. कारण, विश्‍लेषण करण्याच्या क्षमतेची आपल्या परीक्षापद्धतीत फारशी कसोटी लागतच नाही) आपण विद्यापीठात किंवा पुण्यात असं कुठंतरी असायला हवं. तेवढा लायक मी नक्कीच होतो; पण संगमनेर परिसरानं ते बिनमहत्त्वाचं करून टाकलं. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये मी स्वतःचा चेहरा बघत आलो. ते माझ्यात त्यांचा चेहरा बघत गेले. बाहेर मला "संगमनेरी' म्हणून ओळखलं जातं. ते मला आवडतं. मला त्याचा अभिमान वाटतो..."सौ शहरी और एक संगमनेरी!

Tuesday, 27 August 2013

अकस्मात विझलेला झंझावात...Arun Khore


By  on August 25, 2013
0


feature size
एखादा चिकाटीचा विचारी कार्यकर्ता आणि विलक्षण जिद्दीचा माणूस अचानक निघून गेला तर काय वाटेल? धक्का तर बसेलच, पण त्यापेक्षाही अधिक होतं ते दुःख. मंगळवारची सकाळ आम्हा सर्वांना असा भीषण धक्का घेऊन आली. नरेंद्र हा आमचा चळवळीतला म्होरक्या माथेफिरूच्या गोळ्यांना बळी पडला. महाराष्ट्रातील पुरोगामी विचार परंपरेला बळ देणारा हा उमदा नेता अकस्मात झंझावात विझल्यासारखा निघून गेला, ती हानी कशानेच भरून येणार नाही. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची आणि जागृतीची परंपरा खूप दीर्घ आणि मोठी आहे. त्यामुळेच या वाटेतले धोकेही तितकेच मोठे. एकोणिसाव्या शतकात याच प्रस्थापितांनी काही मारेकरी महात्मा फुले यांना मारण्यासाठी पाठवले होते, त्या मारेकर्यांचं सुदैव असं की त्यांना फुल्यांचं महात्मापण कळालं आणि म्हणून त्यांनी आपल्या हातातल्या कुर्हाडी खाली ठेवल्या. फुले जे काम ज्या वर्गासाठी करत होते, त्यासाठी हे मारेकरी काम करायला तयार झाले, हा इतिहास आहे.
नरेंद्रची हत्या एकविसाव्या शतकात झाली आहे. जेव्हा समाज आणि सरकार सकारात्मक होत आहे, प्रगत होत आहे, त्या काळात अशी हत्या का होते, हा प्रश्न आम्हा सर्वांना पडला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्रातील आणि देशातील तरुण वर्गाचे असे आयकॉन होते की, त्यांच्या कामात सहभागी होण्याचा विचार आणि निर्धार असे हजारो तरुण करत होते. चळवळीमधले सर्वजण त्याला नरेंद्र याच नावाने संबोधायचे. काही जण आपुलकीने नरुभाऊ असाही उल्लेख करायचे. गांधीजी, सानेगुरुजी, एसेम, नानासाहेब, मृणाल गोरे, मधू दंडवते या सगळ्यांच्या संस्कारात वाढलेले दाभोलकर विलक्षण साधे आणि सच्चे होते. साधे कपडे, पायात साध्या चपला आणि खांद्यावर शबनमची पिशवी याच रूपात नरेंद्रला आम्ही गेली तीस वर्षं बघत आलो आहोत. मंगळवारी पुणे शहरातल्या ओंकारेश्वराजवळच्या ज्या पुलावर त्याला गोळ्या मारल्या, तिथे त्याची पडलेली साधी चप्पल वाहिन्यांच्या बातम्यातून बघितल्यावर आम्हा सर्वांनाच चुकल्यासारखं झालं.
अंधश्रद्धांना विरोध करणारी आणि त्यासाठी तरुणांची एक क्रियाशील फळी उभी करणारी अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) ही संघटना नरेंद्रने स्थापन केली. बुवाबाजी, जादूटोणा, जारण-मारणासारख्या काही अघोरी उपायांच्या विरोधात एक हल्लाबोल मोहीम त्याने सुरू केली. राष्ट्रीय पातळीवर तामिळनाडूतील डॉ. अब्राहम कोवूर यांनी हा हल्ला सुरू केला होता. मात्र त्याला तरुणांची शक्ती लाभली, ती अंनिसच्या माध्यमातून. नरेंद्रची भाषणं आणि नंतर लागोपाठ प्रसिद्ध होत जाणारी त्याची पुस्तकं यामुळे महाराष्ट्रातील खेडोपाडी अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि या सगळ्या अंधश्रद्धांचा मुकाबला करायला एकत्र येऊ लागले. पुण्यात १९९२ साली झालेल्या अंनिसच्या राष्ट्रीय परिषदेत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, न्या. व्ही. एम. तारकुंडे, नानासाहेब गोरे, ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी, सकाळचे कार्यकारी संचालक प्रतापराव पवार या मान्यवरांनी विचारमंथन केलं. महाराष्ट्रातून आलेले दीड-दोन हजार तरुण कार्यकर्ते तीन दिवस या विचारमंथनात रमले होते.
नरबळी का जातात? देवीचा कोप म्हणून जटांसारखे केस वाढवायचे का? अंगात का येतं? हातातून अंगठी कशी काढली जाते? मध्यरात्री भुतं कुठून येतात? स्मशानात भुतं असतात का? असे शेकडो प्रश्न डॉ. दाभोलकरांनी आपल्या चळवळीत उपस्थित केले आणि त्यांची खरी उत्तरं समाजासमोर शास्त्रीय निष्कर्षानुसार दिली. हातचलाखीने अंगठी किंवा भस्म हे मोठे मुनी किंवा स्वामी कसे काढतात याची प्रात्यक्षिकं तर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी दाखवायला सुरुवात केली. वणव्यावरून चालत जाणं किंवा हातात एखादा पेटता गोळा घेऊन हातचलाखी करणं या सगळ्यांची शास्त्रीय तपासणी त्यांनी केली.यासाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आणि लोकांच्या शंकांना, प्रश्नांना उत्तरं दिली. ‘लढे अंधश्रद्धेचे’, ‘बुवाबाजीविरुद्धची लढाई’ अशी अनेक पुस्तकं तरुणांसमोर आली आणि चळवळीचं वातावरण बदलून गेलं.
बारामती तालुक्यातल्या एका नरबळी प्रकरणात अंनिसने कार्यकर्त्यांची टीम पाठवली आणि सत्यशोधन केलं. अंनिसचे कार्यकर्ते एकदा मध्यरात्री स्मशानभूमीत गेले आणि भुतखेते नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. ज्योतिष शास्त्राबाबतही त्यांनी आक्षेप घेतले आणि त्यामुळे भल्याभल्या दुकानदार ज्योतिषांची भंबेरी उडाली. याबाबत तर अंनिसने पाच लाखाचं बक्षिस जाहीर केलं होतं. तथापि कोणीही ज्योतिषी त्याला प्रतिवाद करण्यासाठी पुढे आला नाही. अनेक देवदासींच्या आणि त्यांच्या मुलींच्या जटा कापण्याचे कार्यक्रम अंनिसने घेतले. समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असताना अजूनही प्रचलित असलेल्या भीषण अंधश्रद्धा आणि त्यामुळे प्राणावर बेतणारी जोखीम लक्षात घेऊन नव्या कायद्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार अंधश्रद्धाविरोधी अर्थातच जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्याचं ठरवलं होतं. तथापि पुरोगामी महाराष्ट्राच्या सरकारला गेली १७ वर्षं हा कायदा करता आलेला नाही. यातली ३ वर्षं युती सरकारची आहेत आणि उरलेली १४ वर्षं आघाडी सरकारची आहेत.
महाराष्ट्रातल्या सामाजिक बदलाच्या सगळ्या चळवळीत नरेंद्र अग्रभागी होता. त्यानेच अनेक नामवंत कलावंतांना या वाटेवर आणलं. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रिमा लागू, सुहास जोशी असे अनेक ज्येष्ठ कलावंत नरेंद्रच्या शब्दाखातर राज्यभराच्या दौर्याला निघाले. एक लढाऊ सेनानी ज्याप्रमाणे आपली आणखी करतो, त्याप्रमाणे अंधश्रद्धेच्या विरोधातील सगळ्या मंडळींना त्याने आपले मुद्दे आणि उद्दिष्ट्यं यांची एक निखळ अशी मांडणी करून त्यात सहभागी केलं होतं. आज महाराष्ट्रातील या चळवळीला त्याच्या जाण्याने एक पोरकेपण आलं आहे. मात्र पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी विधेयक कायद्यात कसं बदलेल, यासाठी आता पुढाकार घेण्याची गरज आहे…
- अरुण खोरे

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली..Dr Pradeep Patkar



माझा आणि येथील कित्येक जेष्ठ कार्यकर्त्यांचा डॉ. दाभोलकरांशी १९८८ ते २०१३ या काळातला २५ वर्षांचा स्नेहबंध होता. डॉ. दाभोलकर हे आमच्यासाठी समाज कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण होते. प्रचंड उरक, अमाप उत्साह, अपार कष्ट, प्रयत्नवादाचे मूर्तिमंत उदाहरण, सत्शील वर्तन, निष्कलंक चारित्र्य, समाजाची उत्तम जाण, समाजातील पीडितांच्या दुक्खाबाबत कणव, जाणीव, सहवेदना, आयुष्य वाहून टाकणारा निरलस कार्यकर्ता व नेता. विशेषणे अपुरी ठरावित असे जीवन चरित्र.
असे कार्यकर्ते, नेते, महाराष्ट्रात आधीच बोटावर मोजण्या इतपत. ज्या काळात अश्या माणसांची आत्यंतिक गरज त्याच काळात त्यांची निर्घृण हत्या. पुरोगामी महाराष्ट्राचा अणखी एक विचारस्तंभ आता आपल्यापाशी नाही. २०० शाखा आणि तालुका तिथे अनिस हे चित्र महाराष्ट्रात उभे करणारे हे नेतृत्व ! चळवळीपासुन नवा तरुण दूर रहात असल्याचे चित्र इतरत्र, अनिस मध्ये मात्र गेली २० वर्षे सतत तरुण कार्यकर्ते!! कार्यकर्तेहि असे जे पदराला खार लावून घरादारातली टीका सहन करून नोकरी रोजगार सांभाळीत समाजाचे गैरसमज दूर करीत , रोष पत्करीत, विवेकनिष्ठा जोपासत, रुजवीत, कामे करण्यास वेळोवेळी जीव धोक्यात घालून शोषक, गुंड, फसव्या सामाजकंटकांचा पर्दाफाश करीत भोळ्या अंधश्रद्ध भक्तांचे शोषण थांबवण्यासाठी जागोजाग धावणारा. विवेकवाहिनी, विवेकजागर, युवाएल्गार, शोध भुताचा बोध मनाचा, जातीअंताचा लढा, अश्या विविध उपक्रमाद्वारे शिक्षक-विद्यार्थी-महिला-कर्मचारी अशा समाज घटकात विवेक निर्भयता नीती रुजवीत २० वर्षे अविशांत श्रम करणारे असंख्य निरिच्छ सत्शील संयमी कार्यकर्ते आज महाराष्ट्रभर आहेत. ही तरुणाई डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली निरलस काम करीत आली, आणि करीत राहील.
शरीर संपले कि विचार संपतील असे वाटून खून करणारे ना धार्मिक ना नास्तिक. कारण आत्मा अमर आहे हा धार्मिकांचा सिद्धांत ! शरीर नाशवंत, विचार तेवढे अ-क्षर नाश न पावणारे - हे मानणारे विज्ञानवादी असे खून करणार नाहीत. ज्यांना समाजातील शोषणाची दखल घेण्यात जराही रस नाही जे सदा स्वार्थ साधण्यात मग्न. बरेचसे विचारवंत परदोषदर्शनात व्यग्र वा थोडे अध्यात्मात थोडे विज्ञानात, वेळ येताच कुंपणावर उडी मारून स्थिर! हा खून करतात मतीभ्रष्ट धर्मभ्रष्ट पाशवी वृत्तीचे गुन्हेगार ज्यांना ना कळला माणूस ना देव ना संस्कृती ना धर्म ना अध्यात्म!
निशस्त्र, संयमी, नेमस्तवादी वयवर्षे ६८ माणसाला,तो सकाळी फिरत असताना, निर्घृण अमानुषतेने मागून गोळ्या घालणे यात काडीचेही शौर्य दिसत नाही. हा ईश्वराचा न्याय म्हणणाऱ्याना ईश्वर हा इतका कुटील खूनाचा प्लॅन करेल तरी कसा असा प्रश्न पडत नाही. धर्म व ईश्वराविषयीचे गैरसमज, त्याच्या नावाखाली चाललेली शोषक कर्मकांडे, बळी विधी, अघोरी कृत्ये, बळींचा शारीरिक मानसिक छळ, लैंगिक शोषण, हत्या हे सारे थांबविण्यासाठी काम करणारा ईश्वराला प्रिय असेल यात शंका नाही. मग इश्वर या कर्माचे फळ असे कसे देइल अशी जराही शंका या विद्वान साधकाना कशी येत नाही !!
कि संस्कृती संभ्रमाच्या या काळात अनिस विरोधकांनी आपापले मेंदु जराही न वापरण्याचे ठरविले आहे काय ? ज्या विधेयकातील सर्व ११ कलमे कुठेही धर्म - हिंदुधर्म वा इतर कुठलाही- या विषयी बोलत नाहीत. त्यात आहे फक्त फसवणूक,दुखापत, दहशत , अयोग्य मार्गदर्शन/सक्ती, अविवेकी कृत्यांना प्रोत्साहन, मानवी हक्कांची पायमल्ली या व अश्या अनेक मानवी क्रूर कृत्यांचा विरोध ! माणसाचे भावनिक, शारीरिक, लैंगिक शोषण होऊ नये या साठी कायद्याचे संरक्षण त्या व्यक्तीस मिळावे व अशी कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांना सजा मिळावी एवढेच साधणारे हे विधेयक असताना त्या बाबत इतका खोटा प्रचार कशाशाठी ? तो हि विधेयक न वाचता, न समजून घेता ! ना इथे पूजेला, प्रार्थनेला,वारीला,यात्रेला, मिरवणुकीला, उत्सवाला, जपजाप्याला, मंत्राला विरोध. हे सारे करून माणसाना तात्पुरते बरे वाटते.परंतु नंतर त्यानाही प्रयत्नानीच आपापले प्रश्न / अडचणी सोडवाव्या लागतात. देवालये वा ट्रस्ट यांना कसलाही विरोध नाही. आहे तो फक्त देवाधर्माच्या नावाखाली दुःखीतांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, लैंगिक फसवणूक, इजा वा छळ आणि शोषण करण्याला विरोध!
हे विधेयक नसेल तर महाराष्ट्रात जागोजागी अशी दुष्कृत्ये, नरबळी, लैंगिक शोषण, अघोरी प्रथा फसवणूक, आणि अशास्त्रीय घातक उपचार (?) आज प्रमाणेच पुढेही चालू राहतील व कार्यकर्त्यांना व पोलिसांना कायद्याची विशेष मदत होऊ शकणार नाही. आपल्याला समाजात काय हवे आहे ? हे नीट लक्ष्यात घ्या आणि मग हा वटहुकुम - विधेयक – कायदा चांगला कि वाइट हे ठरवा.
आज डॉक्टरांच्या समाजकार्याचा वारसा जागोजागी समर्थपणे पेलू शकणारे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत. समाजाला सोबत घेउन प्रबोधन व संघर्ष दोन्हीचे संतुलन साधीत हे कार्य पुढे चालू राहील. अतिशय समृद्ध वारसा आम्हाला लाभलेला आहे. चार्वाक वादी लोकायत, बुद्धाचा प्रतीत्य समुत्पादाचा सिद्धांत , त्याला जोडून मार्क्सवाद, प्रयोगशीलतेला चिकित्सेला पोषक असे चरक, सुश्रुत, आर्यभट्ट, नागार्जुन, वाग्गभट, जैन गणित शास्त्रज्ञ - महावीराचार्य यांचे विचार, सांख्याचा प्रकृती विचार, कणादांचा परमाणु वाद , महाराष्ट्राची संतमहात्म्याची परंपरा, महात्मा फुले, शाहू महाराज, आगरकर, विठ्ठल रामजी शिंदे, डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे विवेकी समाज निर्मितिचे महान कार्य, साने गुरुजींचा मानवता धर्म, स्वा सावरकर, प्रबोधनकार यांचे प्रखर वैज्ञानिक विचार आपल्यापाशी आहेत. अन्याय शोषण अत्याचार यांचा समर्थ प्रतिकार करण्याची ताकत तर सारी येथेच समाजातच उपलब्ध आहे.
आम्ही सावरू आणि घातक शोषणाला आवरूही, हे निश्चीत समजा.
आपणा सर्वाना बरोबर घेउन आम्ही सारे कार्यकर्ते पुढची वाटचाल करीत राहू. आपली साथ सोबत, वेळोवेळी मार्गदर्शन अपेक्षित आहे.
आमच्या या दुःखद प्रसंगात आमचे सांत्वन करायला आपण सोबत आहात या बद्दल आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे सर्व कार्यकर्ते आपले कृतज्ञ आहोत.

डॉ. प्रदीप प. पाटकर
उपाध्यक्ष म. अनिस
p3patkars@sify.com

Monday, 26 August 2013

महाराष्ट्राच्या विवेकवादाचा आवाज,..Hari Narke, Kalamnaama


By  on August 25, 2013
0
feature size
नरुभाऊंचा स्वभाव अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणं केवळ अशक्य. त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती. आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपलं म्हणणं अत्यंत विनयपूर्वक, युक्तिवादाच्या आधारे मांडत असत. त्यांच्यासारख्या ऋजू स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारं, सुन्न करणारं आहे. फुले, शाहू, आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असं वाटत नाही.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते एक महत्त्वाचे नेते होते. श्याम मानव यांच्यासोबत काही वर्षं काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केलं. गेली १८ वर्षं राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणाविरोधी विधेयक संमत व्हावं म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.
राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रुंनी ही हत्या केली असावी असं वाटतं. गेली अनेक वर्षं ते ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवं कसदार रूप प्राप्त करून दिलं. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फाऊंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.
अंधश्रद्धा निर्मूलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता. ते या चळवळीचे जणू प्रतीकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तकं प्रसिद्ध आहेत. नरुभाऊ हे मुळात सातार्यातील एक नामवंत डॉक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्यात आणून सामाजिक कामात उभं करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. समतावादी चळवळीत सक्रिय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणं त्यांना शक्य झालं नाही.
मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो. १९८२ साली नामांतर आंदोलनात त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला. त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षं काम केलं. मी साधनेत अधूनमधून लिहित असे. ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्याला प्रचंड विरोध झाला. स्वतः नरुभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असं नरुभाऊंनी सुचवलं. अवघ्या दोन दिवसांत हे करायचं होतं. त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नि नाही दिली काय, काय फरक पडतो? असं त्यांचं मत होतं. आज दाभोलकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकित झाले असते. साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. नरुभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केलं. तो साधना उत्तम चालवत आहे.
नरुभाऊ तत्त्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मीडियाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती. अनेक ख्यातनाम व्यक्तिंशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्हा सांभाळण्यात नरुभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असं मात्र त्यांनी कधीही केलं नाही. गेली २५ वर्षं चिकाटीने त्यांनी ‘अंनिस’चं काम लावून धरलं. अनेक बाबा, बुवांचे भांडाफोड केले. आम्ही मात्र त्यांना गंमतीने नरेंद्र महाराज दाभोलकर म्हणत असू. औरंगाबादला त्यांच्यावर आणि डॉ. श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डॉ. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.
नरुभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशेबी. १४ वर्षांपूर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्याच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या काळात भल्याभल्यांना कामाला लावलं होतं. ‘लोकशाही प्रबोधन व्यासपीठ’ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तिंना मतदान करा असं सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरुभाऊ आमचे सारथी होते. डॉ. लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्लॅमरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षं आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहीतच नव्हता. बर्याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावलं याची निळूभाऊंना कुणकुण लागली. डॉक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचं त्यांचं गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.
सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावं या हेतुने ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ जमा करायचं ठरलं. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी ‘लग्नाच्या बेडीचा’ दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भूमिका करत होते. दौर्यात या सर्वांची सोय करणं हे सोपं काम नव्हतं. नरुभाऊच ते काम करू जाणोत. नरुभाऊंनी हा ‘साकृनि’ आजवर सांभाळला.
अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरुभाऊंची मैत्री होती. महाराष्ट्र फाऊंडेशनचे ते गेली काही वर्षं समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऐवजी दोन-तीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रित केलेली होती आणि ती कामं चिकाटीने लावून धरलेली होती. त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर (मुद्रा) अखंड राहील.
नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची, प्रमिला कांबळेची निर्घृण हत्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केलं. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला. नरुभाऊंचं टायमिंग फार अचूक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली. परवा लातूरलाही ‘जातीला मूठमाती द्या’ ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचं गठ्ठा मतदान मिळावं म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असं माझं मत होतं, आहे. नरुभाऊ म्हणाले, ‘हे करण्याएवढे आपण शक्तिशाली नाही. ते करायचं तर ‘पर्यायी राजकारण’ करावं लागणार. आजतरी तसं करणं मला परवडणारं नाही.’
मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्या जातिद्वेष पसरवणार्या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून, जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडेकरांच्या भूमिकेचा पर्दाफाश केला. ते लेख मी साधनाकडे पाठवले. मात्र मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख प्रसिद्ध झाले नाहीत.
सत्यशोधक समाजाचं अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावलं होतं. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपं नाहीत, चोर्या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी ‘चला चोर्या करायला, चला शिंगणापुरला’ अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आलं. आम्ही चिडलो. ‘त्यांनी हीच वेळ का निवडली? अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्या करणं नैतिक कसं?’ यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला. चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भूमिका न घेण्याचं आणि त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचं कौशल्य त्यांना साधलेलं होतं.
व्यक्तिची हत्या करून विचारांची हत्या होत नसते. उलट विचार अधिक मजबूत होतात. शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणं हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.


By  on August 25, 2013