Monday 8 October 2012

आम्ही दिलगीर आहोत. - संपादक, ‘लोकसत्ता

PrintE-mail
सोमवार, ८ ऑक्टोबर  २०१२
विधायक दृष्टीचा अभाव
‘भाषा कूस बदलते आहे’ या प्रशांत असलेकर यांच्या लेखातील (लोकसत्ता, लोकरंग २३ सप्टेंबर) महात्मा फुले यांच्याबद्दलची म्हण आमच्यातरी ऐकण्यात नाही. कदाचित चारदोन ठिकाणी असे कुणी म्हणत असेल, तर ते चूक आहे, यात वादच नाही. संपूर्ण भारतात स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी सारे आयुष्य वेचणाऱ्या एका महापुरुषाबद्दल लेखकास यत्किंचितही माहिती नाही, असाच याचा अर्थ होतो. महात्मा फुले यांनी त्या काळातील सनातन समाजाच्या विरोधात जाऊन एका नव्या चळवळीचा प्रारंभ केला म्हणूनच आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला जे कर्तृत्व गाजवू शकत आहेत, याची जाणीव प्रत्येक पुरुषानेही ठेवणे आवश्यक आहे. ऊठसूट कोणत्याही महापुरुषाबद्दल समाजात असलेल्या आदराला हादरा देण्याची ही वृत्ती निश्चितच विधायक नाही. राजा राममोहन रॉय यांनी देशातील सतीची चाल बंद व्हावी यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच आंदोलन छेडले होते. स्त्रियांना शिक्षण देण्याची चळवळ घरापासूनच सुरू करणाऱ्या महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीलाच प्रथम शिक्षित केले आणि तिच्याकडेच विद्यादानाची जबाबदारीही सोपवली, त्यामुळेच १८४८ मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. पुरोगामी राज्य असे बिरुद देशभर मिरवणाऱ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला याबद्दलचा इतिहास ज्ञात असणे आवश्यक आहे. प्रशांत असलेकर यांना तो माहीत नसावा असे दिसते. महात्मा फुले यांच्याबद्दल असे काही लिहिण्यापेक्षा त्यांनी अधिक विधायक दृष्टी अंगीकारणेच श्रेयस्कर आहे.
- सुरेश माळोदे

क्षमस्व
२२ सप्टेंबर रोजी ‘लोकरंग’ पुरवणीत माझा ‘भाषा कूस बदलते आहे’ हा लेख प्रसिद्ध झाला होता. त्या लेखात अनवधानाने महात्मा फुले यांच्याबद्दल काही उल्लेख होता. त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी त्यांची माफी मागतो.
तरुणाईच्या तोंडी हल्ली रुजलेल्या (पण, अभिजात भाषाप्रेमींना न पटणाऱ्या) शब्दांच्या यादीत तो उल्लेख होता आणि भाषेने घेतलेले हे वळण योग्य नाही, असाच लेखाचा एकूण सूर होता. तसेच, हे थोपवता येत नसल्याबद्दल लेखात खंतही व्यक्त केली होती.
महात्मा जोतीबा फुले यांच्याविषयी मला नितांत आदर आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या पायाभरणीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. मी स्वत:सुद्धा त्याच पायावर उभा आहे व त्यांचाच अनुयायी आहे, त्यांचा अनादर मी कसा करू शकेन?
पुनश्च एकवार क्षमस्व.
- प्रशांत असलेकर

महाराष्ट्राला ‘महा’राष्ट्र करणाऱ्यांत थोर समाजसुधारक महात्मा जोतीबा फुले यांचे नाव कायमच अग्रणी आहे, असे ‘लोकसत्ता’ मानते. प्रशांत असलेकर यांच्या लेखात, त्यांच्याबद्दल  चुकीचा आणि अपमानकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
- संपादक

Sunday 7 October 2012

देशाचा अजेंडा बदलणारे खासदार : समीर भुजबळ

  by: Prof. Hari Narke

     

९ आक्टोबर हा नाशिकचे लोकप्रिय आणि तरुण,तडफदार खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ यांचा वाढदिवस.नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणारे खासदार समीरभाऊ यांची झेप फार मोठी आहे. त्यांच्या कामाचे अनेक पैलू आहेत.वाढदिवसाच्या निमित्ताने विचारवंत प्रा. हरी नरके यांनी त्यांच्या ओबीसीविषयक ऎतिहासिक योगदानावर टाकलेला एक प्रकाशझोत.....


देशातील सर्वात मोठा लोकसमुह हा  ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गियांचा आहे.मंडल आयोगानुसार या समुदायाची देशभरात एकुण ५२% लोकसंख्या आहे.या प्रवर्गात राज्यात एकुण ३४६ जाती आहेत तर देशपातळीवर ही जातींची संख्या २०६३ एव्हढी आहे.आजघडीला देशात या जातींची लोकसंख्या म्हटले तर ६० कोटींच्या पुढे जाईल. एव्हढ्या प्रचंड लोकसंख्येच्या सर्वांगीण विकासासाठी सरकारतर्फे अंदाजपत्रकात फार तुटपुंजी रक्कम ठेवली जाते. याचे कारण काय? असा प्रश्न विचारला की उत्तर मिळते, या लोकांची नेमकी लोकसंख्या सरकारला माहित नसल्याने तरतुद कशी करणार?ओबीसींना सरकारने १९९० साली मंडल आयोगानुसार केंद्रात २७% आरक्षण दिले तेव्हा इंद्र साहनी आणि इतर ८० जण त्याविरुध्द न्यायालयात गेले. न्यायालयाने सरकारला ओबीसींची संख्या विचारली तर सरकार म्हणाले माहित नाही. २००६ साली उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण आले, अशोककुमार ठाकुर आणि इतर लोक कोर्टात गेले. पुन्हा तोच प्रश्न.पुन्हा तेच उत्तर.
ओबीसी विद्यार्थ्यांना गेली काही वर्षे शिष्यवृत्त्या मिळालेल्या नाहीत.त्यामुळे लाखो मुलामुलींचे भवितव्य अंधारात आहे.असे का तर बजेट नाही. लाखो बेरोजगार ओबीसींना रोजगार धंदा करायचा आहे, पण त्यासाठी ओबीसी महामंडळाकडे कर्ज मागितले तरी मिळत नाही कारण महामंडळाला निधी नाही.रस्ते,वीज.पाणी,घरे,दवाखाणे हवेत पण पैसे नाहीत.सरकार म्हणते आम्हाला ओबीसींची नेमकी लोकसंख्या माहित नसल्याने आर्थिक तरतुद करता येत नाही.धोरणे ठरवता येत नाहीत.देशाचा नियोजन आयोग देशाच्या पंचवार्षिक योजनेची आखणी करतो.अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालात आयोगाने छापील कबुली दिली की आम्ही ओबीसींची जातवार जनगणना नसल्याने लोकसंख्येच्या व इतर माहितीच्या अभावी धोरणे आखु शकत नाही.१९५५ साली कालेलकर आयोग,१९८० साली मंडल आयोग,२००८साली रेणके आयोग या सर्वांनी जनगणनेची मागणी केलेली होती.खरे तर पहिल्यांदा ही मागणी केली होती १९४६ साली भारतरत्न डा.बाबासाहेब आंबेडकरांनी.पण ल्क्षात कोण घेतो?
सुमित्रा महाजन ह्यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या संसदीय स्थायी समितीने आपल्या अहवालात सरकारला एकमुखाने ओबीसींची माहिती मिळावी यासाठी त्यांची जनगणना करण्याची शिफारस केली. महात्मा फुले समता परिषदेने गेली २०वर्षे ही मागणी लावुन धरलेली होती.समता परिषद त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातही गेली होती.
बाहेर रस्त्यावर वातावरण तापत होते. अश्यावेळी संसदेत ६मे २०१० रोजी प्रथमच या विषयावर एक आवाज गुंजला.सा-या लोकसभेला त्याची दखल घ्यावी लागली.तो आवाज होता नाशिकचे खासदार श्री.समीरभाऊ भुजबळ यांचा.त्यांनी ओबीसींच्या स्वतंत्र जनगणनेची लोकसभेत मागणी केली.त्याला खासदार गोपीनाथ मुंडे, शरद यादव, लालुप्रसाद,मुलायम सिंग, नारायण सामी, विराप्पा मोईली,अजित सिंग अश्या अनेक दिग्गजांनी पाठिंबा दिला. सरकार तयार नव्हते. खासदार अडुन बसले.सरकार नमले.१९३१ नंतर तब्बल ८० वर्षांनी अशी जनगणना करण्याची घोषणा सरकारने केली.सरकार का नमले? कारण यामागणीमागे समीरभाऊंनी फार मोठी नैतिक आणि घटनात्मक ताकद उभी केली होती. घटनेच्या कलम ३४०नुसार सरकारची ही जबाबदारी असल्याची जाणीव सरकारला प्रथमच करुन देण्यात आली.
लालू,मुलायम,शरद हे तिन्ही यादव अनेक वेळा केंद्रात मंत्री होते. पण त्यांच्या डोक्यात हा अजेंडाच नव्हता.तो त्यांच्या डोक्यात भरवला खासदार समीरभाऊंनी.वयाने सगळ्यात लहान असलेले भाऊ हे करु शकले ते मा.नेते छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनामुळे.आज भाऊंच्या आग्रहामुळे सरकारने प्रथमच ओबीसी कल्याणासाठी खासदारांची संसदीय स्थायी समिती स्थापन केली आहे.समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक मताने समीरभाऊ निवडले गेले.गेली दोन वर्षे ओबीसींसाठी सरकारने दरडोयी दररोज निधीची केलेली व्यवस्था होती अनुक्रमे आधी एक पैसा आणि आता दोन पैसे.हीच रक्कम अनुसुचित जाती आणि जमातींसाठी असते उपघटक योजनेनुसार दरडोयी दरवर्षी सुमारे रुपये सहा हजार! आणि ओबीसींसाठी मात्र अवघी साडेचार रुपये आणि नऊ रुपये.
समीरभाऊंच्यामुळे २ आक्टोबर २०११ रोजी ऎतिहासिक जातवार जनगणना सुरु झालेली आहे. सरकारचे हे काम वर्ष झाले तरी धिम्या गतीने चालु आहे.हा रडीचा डाव आहे. हे काम सरकारने लौकर पुर्ण करावे यासाठी भाऊ प्रयत्नशील आहेत. हे काम झाले की ओबीसींच्या विकासाचे पुढचे २५ वर्षांचे चक्र गतिमान होईल.
ओबीसींना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळावे, ओबीसी महिलांना विधानसभा व लोकसभेत महिला आरक्षणांतर्गत आरक्षण मिळावे,ओबीसी उपघटक योजना सुरु करुन लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात वाटा मिळावा, ओबीसी कायदा व्हावा अश्या आणि ईतर अनेक गोष्टींसाठी भाऊ प्रयत्नशील आहेत.त्यांच्या प्रयत्नांना जनतेची आणि सरकारची साथ मिळो आणि ओबीसींच्या अजेंड्याचे नवे संकल्पचित्र देशाला मिळो हीच शुभेच्छा!नाशिकचा आणि ओबीसींचा सर्वांगीण विकास त्यांचा श्वास आहे.त्याला सुयश लाभो!
...........................................................................................................................................................
प्रा.हरी नरके/ विभागप्रमुख-महात्मा फुले अध्यासन,पुणे विद्यापिठ,पुणे ७











महात्मा फुल्यांची बदनामी करणारा हाच तो लेख

{सौजन्य:लोकसत्ता,लोकरंग,रविवार दि.२३ सप्टें.२०१२}
भाषा कूस बदलते आहे..
Bookmark and SharePrintE-mail
प्रशांत असलेकर , रविवार, २३ सप्टेंबर २०१२
lokrang@expressindia.com
alt
आमच्या लहानपणी मध्यमवर्गीय जीवनशैलीतले जे अनेक शब्द आम्ही वापरत होतो, ते शब्द आजच्या मुलांना समजत नाहीत. काही शब्द अस्तंगत झालेत. नव्या जीवनशैलीत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. तर काही जुन्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलीय. पण त्यातली जुनी खुमारी मात्र पार निघून गेलीय..
परवा दिवशीची गोष्ट! माझ्या मुलीला तिच्या काही मैत्रिणी बोलवायला आल्या. तिला घेऊन त्यांना कुठेतरी बाहेर जायचे होते. माझी मुलगी तेव्हा अगदी घरगुती अवतारात होती. तिचे केस विस्कटलेले होते. मैत्रिणी आल्या म्हणून आणि बाहेर जायचंय म्हणूनसुद्धा तिला खूप आनंद झाला. तिची धांदल उडाली. तिने पटापट कसातरी स्वत:चा अवतार आवरला. केसांवर फक्त हात फिरवून चाप लावला आणि ती गडबडीने बाहेर जायला निघाली. तिचा तो अवतार बघून मी तिला म्हणालो, ‘‘अगं, अशी कशी बाहेर जातेस? जरा सरसं कर!’’ माझी मुलगी गोंधळली, ‘सरसं कर’ हा शब्द तिला समजला नाही. तिच्या मैत्रिणींनाही तो शब्द कळला नाही. नीट समजावून सांगितल्यावर तिच्या भाषेत ‘हेअरस्टाईल’ ठीकठाक करून ती निघून गेली.
हल्ली असं वारंवार घडतंय. आमच्या लहानपणी मध्यमवर्गीय जीवनशैलीतले जे अनेक शब्द आम्ही वापरत होतो, ते शब्द आजच्या मुलांना समजत नाहीत. काही शब्द अस्तंगत झालेत. नव्या जीवनशैलीत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. तर काही जुन्या शब्दांची जागा नवीन शब्दांनी घेतलीय, पण त्यातली जुनी खुमारी मात्र पार निघून गेलीय.
या ठिकाणी १९५० वगैरेचे नॉस्टेल्जिक काळ अभिप्रेत नाही, तर अगदी अलीकडचा- गेल्या २५-३० वर्षांचा काळ अभिप्रेत आहे. वाढते शहरीकरण, इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव, बदलती जीवनशैली, समाजजीवन यामुळे आपल्या बोलीभाषेत कळत-नकळत बदल घडताहेत. मराठी भाषेत यापुढे अनेक शब्द असे उरतील, की ते संदर्भ, वाक्प्रचार म्हणून वापरले जातील; पण त्यांचा अर्थ कळण्यासाठी भावी पिढय़ांना शब्दकोश चाळावे लागतील.
सीमेंट-काँक्रीटच्या आजच्या चेहराहीन जगात ‘घर सारवणे’, ‘भिंती लिंपून घेणे’, ‘अंगणात सडा घालणे’ वगैरे गोष्टी कालबाह्य़ झाल्यात. त्यामुळे या क्रियांशी संबंधित जे वाक्प्रचार आहेत ते पुढच्या पिढीला सहजपणे कळणार नाहीत. चुकांसाठी सबबी सांगणे, कारणे देणे याला आपण ‘सारवासारवी’ म्हणतो. प्राजक्ताच्या फुलांचा सकाळी जमिनीवर जो खच पडतो त्याला आपण ‘फुलांचा सडा’ म्हणतो. एखाद्या कामातल्या चुका दुरुस्त करण्याला मराठी व हिंदीत ‘लिपापोती’ म्हणतात. भिंती जशा सारवून घेतल्या जायच्या, तसं चुलींना चिखलात फडकं भिजवून ‘पोतेरं’ केलं जायचं. त्या फडक्याची अवस्था दयनीय व्हायची. म्हणून एखाद्याचा खूप अपमान केला की, ‘त्याचं पोतेरं केलं’ असं म्हटलं जायचं. यापुढे मराठी भाषेत ‘सारवासारवी’, ‘सडा पडणे’, ‘लिपापोती’, ‘पोतेरं केलं’ हे शब्द राहतील; पण त्यांचा अर्थ सहजासहजी कळणार नाही. कारण हे शब्द ज्या क्रियांमधून उद्भवतात त्या गोष्टीच जीवनशैलीतून बाद झालेल्या आहेत.
काही जुन्या शब्दांची जागा नव्या इंग्रजी शब्दांनी घेतलीय. पण त्यातली खुमारी मात्र निघून गेलीय. ‘साबण मोरीत ठेवलाय’ असं सांगितलं की मुलांना समजत नाही. जुन्या सवयीनुसार मी कधी ‘मोरी’ हा शब्द वापरला की माझी मुलं बुचकळ्यात पडतात. बाथरूम म्हटलं की त्यांच्या लगेच लक्षात येतं. (कार्टी जशी काही इंग्लंडलाच जन्माला आलीत!) लहानपणीची अंधारी, थंडगार, नरक चतुर्दशीला आणि केस कापल्यावर आईने खसाखसा घातलेल्या आंघोळीची आठवण करून देणारी ‘मोरी’ चाळीबरोबरच पाडली गेली आणि कायमची हरपली. ‘स्वयंपाकघर’ हा फोडणीच्या वासाची, ठसक्याची, खकाण्याची आठवण करून देणारा अगडबंब, पण वैशिष्टय़पूर्ण शब्दही असाच लयाला गेलाय. त्याची जागा कुठलाच चेहरामोहरा नसलेल्या ‘किचन’ने घेतलीय. स्वयंपाकघर म्हटलं की जिभेला पाणी सुटायचं. किचन म्हटलं की कुठलेच भाव मनात उमटत नाहीत. मी कधी चुकून ‘स्वयंपाकघर’ हा शब्द उच्चारला तर माझी मुलं, ‘हा कोण भोटमामा आम्हाला बाप म्हणून नशिबी आलाय?’ अशा नजरेने माझ्याकडे बघतात.
‘पन्नास पान सहज उठेल’ अशा परिमाणात जिचं क्षेत्रफळ सांगितलं जायचं ती ‘बैठकीची खोली’ ही अशीच अंतर्धान पावली आहे. ताईचं लग्न ठरलं तेव्हा तिने दाजींकडे टाकलेले चोरटे कटाक्ष ज्या बैठकीच्या खोलीने अनुभवले ती आता ‘हॉल’ झाली आणि तिच्यातली गंमतच निघून गेली. आजीच्या उबदार गोधडीची आठवण करून देणारी ‘आतली खोली’ आता ‘बेडरूम’ झालीय. नावातूनच ती फक्त झोपण्याशी नातं सांगते. शेणानं सारवलेल्या अंधाऱ्या ‘आतल्या खोलीत’ एक अंगभूत थंडावा असायचा. तिथे आजीच्या कुशीत शिरलं की पटकन् झोप लागायची. तिचं बेडरूम झाल्यापासून एसी लावूनसुद्धा फॉल्स सीलिंगवरचे रेडियमचे चंद्रतारे झोप आणत नाहीत. लहानपणी आजोबा व्हरांडय़ात आरामखुर्चीत बसून पेपर वाचायचे. व्हरांडा हे आजोबांचं साम्राज्य होतं. ‘व्हरांडा’ हा शब्द उच्चारताच आजोबांच्या धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा भास व्हायचा. त्याची सर चवळीच्या शेंगेसारख्या ‘गॅलरी’ला कुठली? तिचा उपयोग फक्त वॉशिंग मशीन ठेवण्यापुरताच!
नववधू म्हणे उंबऱ्यावरचं धान्याचं माप लवंडून घरात प्रवेश करते. त्यातलं ‘धान्याचं माप’ पन्नास-पाऊणशे वर्षांपूर्वीच मोडीत निघालं. हल्लीच्या नववधूंना धान्य भरलेला ग्लास ओलांडायला तरी ‘उंबरा’ कुठेय? उंबरा हे काय प्रकरण असायचं ते येणाऱ्या पिढीला समजावून सांगावं लागेल. हीच गोष्ट ‘मांडणी’, ‘कोनाडे’, ‘फडताळं’, ‘खुंटाळे’, ‘ताटाळे’ वगैरे शब्दांबाबत. मॉडय़ुलर किचनच्या जमान्यातल्या मुलांना हे शब्द समजणारच नाहीत. नव्या गृहरचनेत त्यांना काही स्थानच उरलेलं नाही. पाणी पिण्याची भांडी रचून ठेवण्यासाठी पूर्वी ‘घडवंची’ असायची. कांदे ठेवायचं ‘शिंकाळं’ असायचं. चटणी वाटायला ‘पाटा-वरवंटा’, शेंगदाणे कुटायला ‘खलबत्ता’ असायचा. आजोबांचा ‘बटवा’, तर आजीची ‘चंची’ असायची. आजोबा अंगात बिनबाह्य़ाचा सदरा घालायचे त्याला ‘कोपरी’ म्हणायचे. आजीच्या नऊवारी साडीच्या काष्टय़ाच्या फुलोऱ्याला ‘कमळ’ म्हणायचे. आजोबा कोपरीच्या आतल्या खिशात व आजी कमळात पैसे ठेवायची. चुलीला ‘वैल’ असायचा. भाकरीला ‘पातोडा’ असायचा. घराला ‘आढं’ असायचं. उरलेलं अन्न काढून ठेवायला ‘शकुंतला भांडं’ असायचं. तुपासाठी ‘सतेलं’ असायचं. तेलाची ‘बुधली’, माठ ठेवण्यासाठी ‘तिपाई’, लहान बाळांना पाणी पाजायला ‘बुडकुलं’, मोठय़ांसाठी ‘फुलपात्रं’ असायचं. उभा तो ‘गंज’ आणि पसरट तो ‘कुंडा’ असयाचा. फुलांची ‘परडी’ असायची. दुपारी पडायला ‘बारदान’, ‘गोणपाट’, ‘चटई’ वापरायचे. स्टोव्हमध्ये रॉकेल भरण्यासाठी ‘नरसाळं’ व स्टोव्ह पेटवण्यासाठी ‘काकडा’ असायचा. तीच गोष्ट ‘अंबाडा’, ‘गंगावन’, ‘खोपा’, ‘केसांची जाळी’ वगैरे गोष्टींबाबत. आजच्या मुलींना ‘गंगावन’ हा शब्द कितपत कळेल याबद्दल शंकाच वाटते. पैसा मुबलक झाल्यामुळे कपडे फाटेपर्यंत वापरले जात नाहीत, त्यामुळे ‘ठिगळ’, ‘रफू’ हे शब्दही विरून गेलेत.
घरांची रचना, पोशाखपद्धती, राहणीमान आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हे सारे शब्द आता लोप पावले आहेत. एकीकडे हे शब्द लयाला गेलेत, तर काही नवीन शब्द उदयालाही येत आहेत.
ग्रॅन्ड फिनाले (स्पर्धेची अंतिम फेरी), फॅसेड (दर्शनी भाग), ग्रोमो (ट्रेलरचा नवा अवतार), अब्रा-का-डब्रा (कुठल्याही विषयातलं प्राथमिक ज्ञान), आरएसव्हीपी (समारंभाला किती माणसे उपस्थित राहणार, हे आगाऊ कळवणे), पसरी खाणे (दिलेला शब्द फिरवणे), डबल ढोलकी (दोन्ही बाजूने बोलणारा माणूस), चवल्या वारणे (खोटं बोलणे), कॅलेन्डर छापणे (गरोदर होणे), चमकेश (समारंभात मिरवणारे लोक), वंटास हो (चल निघ), चिरीमिरी (लाच), मांडवली/ तोडपाणी (समेट), शानपत्ती (शहाणपणा), फाटय़ावर मारणे (किंमत न देणे), किक् बसणे (नशा चढणे), वन टू का फोर (नाहीसे होणे), मकडीछाप, लपूट (बावळट मनुष्य), डाव- छावी- आयटेम  (जिच्यावर प्रेम करतो ती मुलगी), जीपीएल (हिचा अर्थ सर्वश्रुत आहे), आडेतीर (चुकीची औषध उपाययोजना), चमाट (चापट), हड्डीकट (लो-वेस्ट जीन्स) असे काही नवीन शब्द जन्माला आले आहेत.
भाषेच्या वापराबाबतही काही नव्या समजुती रूढ होत आहेत. ‘मी तुमचं धन्यवाद करतो’ (आभार मानतो) यात कुणाला फारसं गैर वाटेनासं झालंय. ‘मिळणे’ या अर्थाने ‘भेटणे’ हे क्रियापद तर इतकं सर्वमान्य झालंय, की (पाचवी गाडी ‘भेटली’, नव्वद टक्के मार्क ‘भेटले’, अ‍ॅडमिशन ‘भेटली’, चान्स ‘भेटला’ वगैरे) ‘मिळणे’ हे शुद्ध क्रियापद वापरणारा आता बावळट ठरू लागलाय. सुशिक्षित लोकांच्या तोंडीही ‘मिळणे’ अशा अर्थाने ‘भेटणे’ हे क्रियापद रुळलंय. त्यात कुणाला गैरही वाटेनासं झालंय. त्याचप्रमाणे ‘रिकामा/ रिकामी’ या शब्दासाठी ‘खाली’ हा शब्दही सर्वमान्य झालाय. उदा. आज गाडी ‘खाली’ होती. रस्ता ‘खाली’ होता. कुशल कामगारांसाठी ‘कारागीर’ हा शब्द रूढ झालाय. गियर बदलताना अ‍ॅक्सेलेटर बंद करावा लागतो त्याबाबत ‘मोसम’ हा शब्द वेग, त्वरण या अर्थाने रूढ झालाय. गाडीने ‘मोसम’ पकडला, गियर टाकताना गाडीचा ‘मोसम’ तुटला, ही भाषा रूढ झालीये. ‘काम लागतंजुगतं झालं की येतो’ याऐवजी ‘कामाला चाल भेटली की येतो’ असं म्हटलं तरी कुणाला त्यात वावगं वाटत नाही.
एसेमेस, चॅटिंगची स्वत:ची अशी एक वेगळी लघुभाषा तर निर्माण झालीच आहे. प्रत्येक व्यवसायाची वेगळी परिभाषा असते. तीही बदलतेय. शिवाय भाषेची काही वैशिष्टय़े शहरांपुरतीही असतात. ठाणे जिल्ह्य़ात ‘ठाण्याला नेलं पाहिजे’ म्हणजे (तिथे मेंटल हॉस्पिटल असल्यामुळे) वेडय़ाच्या इस्पितळात भरती केलं पाहिजे असा अर्थ समजला जातो. नागपुरात ‘फजूल फोके’ म्हणजे पोकळ बढाया, तर पुण्यात ‘निघतो’ अशा अर्थाने ‘सुटतो’ हा शब्द वापरतात. (खूप उशीर झाला, मी आता ‘सुटतो’.) मुंबईच्या पश्चिम उपनगरात ‘बस आली’ यासाठी ‘माझी लैला आली’ म्हणतात. भाषेची ही प्रादेशिक वैशिष्टय़ं बदलत नसतील कशावरून? सगळ्यात जास्त नवल वाटतं ते दोन शब्दांचं! ‘मला बावळट समजतोस का?’ अशा अर्थाने ‘मी काय अलिबागहून आलेलो आहे का?’ असं विचारतात, ते का? आणि खूप बोलणाऱ्या माणसासाठी सर्रास ‘बोलबच्चन’ हा शब्द वापरला जातो, तो कसा? ‘अलिबागवरून येणे’ व ‘बोलबच्चन’ हे दोन्ही शब्द पंधरा वर्षांपूर्वी नव्हते. त्यांचा उगम कसा झाला? १२ मैलांवर भाषा बदलते म्हणतात तशी दर १२ वर्षांनंतरही भाषा बदलत जाते का? ही कोडी कधीच उलगडणारी नाहीयेत.
जे आज नवं आहे, रुचत नाहीये, तेसुद्धा उद्या जुनं होणार आहे. उद्या तेही विलयाला जाणार आहे. शेवटी खंत तरी कशाची बाळगायची? ज्ञानेश्वरीतील मराठी कळत नाही म्हणून आम्ही तक्रार करायचो. लोकहितवादींची, आगरकरांची, ‘काळ’कर्ते शिवरामपंत पराजपेंची मराठी आम्हाला अवघड वाटायची. हे लोक असं अवघड का लिहायचे, असा प्रश्न तरुणपणी पडायचा. गेल्या २५-३० वर्षांत मराठी भाषेनं घेतलेलं वळण बघितल्यावर वाटू लागलंय की, आज आपण जे लिहितोय तेही काही काळाने दुर्गम्यच होणार आहे. आपल्या कळत-नकळत भाषा कूस बदलते आहे. ते थोपवणंही आपल्या हातात नाही.
.........................................................................................................
टिप:....
"हले डुले महात्मा फुले" अशी नवी म्हण मध्यमवर्गियांमध्ये वापरली जात  असल्याची माहिती असलेकारांनी दिलेली आहे.या म्हणीचा अरथ "खिळखिळीत निसटती वस्तु"असा त्यांनी दिलेला आहे.
सदर मजकुर छापील लेखात आहे.मात्र वाद निर्माण झाल्यानंतर हातचलाखीने तो नेटवरुन उडविण्यात आला आहे....


..............................................................................................................