Thursday 23 October 2014

शरद पवार नावाचे व्यावसायिक रसायन


पवार हे उघडेनागडे सत्तावादी आणि पैसावादी आहेत.ते एक व्यापारी आहेत. व्यापार्‍याला विचारधारा, बांधिलकी, तत्वं, ध्येयवाद असलं काहीही  परवडत नाही. त्यांना कळतो रोकडा व्यवहार.
.................................................
महाराष्ट्रावर पवारांचे गारूड आहे. त्यांचे अमाप चाहते आहेत. भक्त नी लाभार्थी तर असंख्य आहेत.  सेक्युलर शरद पवारांनी आपली फसवणूक केली अशी तक्रार करणार्‍या या मंडळींचे दु:ख आपण समजून घेतले पाहिजे. मराठा नेते  शरद पवारांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. तो त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पुरोगामी, समाजवादी, फुले - आंबेडकरवादी, अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक यांचे शरद पवार हे अनेक वर्षे हिरो आहेत किंवा आता होते म्हणायचे.

विशेषत: त्यांच्यावर प्रेम करणार्‍या मराठा पत्रकार, लेखक, विचारवंत मंडळींना या धक्क्यातून आठवडा झाला तरी सावरता आलेले नाही.कात्रजचा घाट, गनिमी कावा म्हणुन एकीकडे कौतुकही करायचे आणि फसवले म्हणून तक्रारही करायची हे काही उचित नाही.
मी गेली काही वर्षे शरद पवारांच्या राजकारणाचा  अभ्यास करीत आहे. मी त्यांच्यासोबत वावरलो आहे. मी त्यांचा कट्टर समर्थकही होतो. त्याकाळात मी त्यांना जवळून पाहिले आहे. राष्ट्रवादीचा मी सक्रीय सभासद होतो. गेली १४ वर्षे  मी राष्ट्रवादीचा सदस्य नाही. नी त्यांचा समर्थकही  नाही.

पवारांच्या राजकीय प्रवासाचे प्रमुख असे चार टप्पे आहेत.

१. १९६७ ते १९७७ च्या काळातील ध्येयवादी शरद पवार,
२. १९७७ ते १९९४ च्या काळातील ध्येय आणि व्यवहार यांचा मेळ घालणारे पवार,
३.१९९४ ते २००४ संधीसाधू, सत्तासाधू पवार,
४. आणि २००४ नंतरचे निखळ व्यापारी, जातीयवादी, नफाखोर शरद पवार..

यशवंतरावांनी शरद पवारांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि पवार झपाट्याने प्रगती करू लागले.आईचा शेकाप चा वारसा आणि आजूबाजूला दलित प्यांथर,युक्रांद, एक गाव एक पाणवठा, मुस्लीम सत्यशोधक चळवळ यांनी आसमंत ढवळून काढलेला होता. पवार त्याकाळात पुरोगामी होते. हमीद दलवाईंना मदत करणारे, पाणवठा चळवळीत भाग घेणारे पवार युवक होते. परिवर्तनाची त्यांना गरज वाटत होती.

वसंतदादा नी यशवंतरावांना सोडून त्यांनी पुलोद बनवले, एस.एम. नी समाजवादी ताकद यांच्या आग्रहामुळे पवारांनी नामांतराची घोषणा केली. वसंत दादांच्या मंडळींनी रातोरात मराठवाडा पेटवला. राजकीय बुमर्‍यांग झाले. उत्स्फुर्तपणे जातीय दंगलींचा आगडोंब उसळल्याचे चित्र निर्माण केले गेले. प्रत्यक्षात मराठा जातीयवादाचा तो उद्रेक होता.

पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर विशेषत: १९८० च्या दशकात पवार आरपार बदलले. संपूर्ण व्यवहारवादी झाले. सत्तेतून पैसा आणि पैशाचा सांभाळ करण्यासाठी सत्ता अशा चक्रात ते रूतले.१९८० ते १९८६ ते विरोधी पक्षात बसले. त्यांनी निवडून आणलेल्या ५४ आमदारांपैकी ५० सत्ताधारी पक्षात गेले. अवघे चार सोबत उरले.

 पवारांनी ध्येयवाद, सेक्युलरवाद आणि पुरोगामित्व यांचा फक्त वापर  करून घ्यायचे ठरवले. त्या भांडवलावर पवारांनी पुढची आजवरची वाटचाल केली. पवारांनी शंकररावांना मुख्यमंत्रीपदावरून घालवण्यासाठी रिडल्स वाद माधव गडकरींना हाताशी धरून पेटवला. शिवसेना वाढतेय हे चित्र निर्माण करण्यासाठी आपले कार्यकर्ते सेनेत घुसवले. सुधाकररावांना मुख्यमंत्रीपदी  त्यांनीच बसवले. पण हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानी प्रकरणात त्यांचे दोघांचे बिनसले. त्यांना घालवण्यासाठी मुंबईतील १९९३ च्या दंगलींना पवारांनी इंधन पुरवले. त्या आगीच्या ज्वाळांवर पवार परत मुख्यमंत्री झाले.रिपब्लीकन राजकारणाचा झालेला फायदा लक्षात घेऊन त्यांनी नामांतर केले. महिला धोरण आणले. मंडल आयोग लागू केला.पण राजीव काळातील पवारविरोधी बंड आणि दिल्लीची नरसिंहरावांची तिरकी चाल बघून हे आपल्याला मुख्यमंत्री करणार नाहीत हे ओळखून पवारांनी १९९५ साली आपले हस्तक  बंडखोर म्हणून उभे केले. या बंडखोर अपक्षांना सेना-भाजपामागे उभे करून मनोहर जोशींचे सरकार आणले. त्यांच्याकडून एनरो‘न, गुन्हेगारांशी संबंध अशा सार्‍या प्रकरणात क्लीन चीट मिळवली.राष्ट्रवादीची स्थापनाच मुळी भाजपाच्या राजकारणाला ताकद पुरवण्यासाठी करण्यात आली होती. सोनिया गांधीचे परकीय असणे याचा गाजावाजा करून पवारांनी संघ परिवाराला केलेली मदत, सत्तेवर आल्यावर १९९२-९३च्या जातीय दंगलीतील  दोषींवर कारवाई न करणॆ, {न्या. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी न करणे }, रमाबाई नगर दलित हत्याकांडातील मराठा आरोपी मनोहर कदम याला संरक्षण  पुरवणे, ही सारी १९९९ ला पवारांची को‘न्ग्रेस बरोबर सत्तेवर आल्यानंतरची वाटचाल.

 संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, छावा, शिवसंग्राम आदी मराठा जातीयवादी संघटनांना हाताशी धरून मराठा आरक्षण, भांडारकरवर हल्ला, कुमार केतकरांच्या घरावर हल्ला हे सारे कोणी घडवले?
आयपीएल, लव्हासा, अमेनोरा, हे सारे पैशाच्या हव्यासातून घडत गेले. पवारांनी सत्ता, अधिक सत्ता, फक्त सत्ता, कसेही करून कोणाशीही हातमिळवणी करून सत्ता एव्हढेच एकमेव इप्सित बनवले.

पवारांनी युती तोडायला लावली, सत्तेसाठी पवार भाजपासोबत जातील असे राज नी उद्धव ठाकरे सांगत होते तेव्हा पवारांनी त्यांची खिल्ली उडवली आणि मतमोजणी पूर्णही झाली नव्हती तोवर भाजपाला पाठींबा देऊन मोकळे झाले.
पवारांच्या प्रमोद महाजन, नितीन गडकरी, नरेंद्र मोदींशी असलेल्या दोस्तीचा अर्थ ज्यांना कळला नाही, ज्यांना १९८०नंतरचे पवार उमगले नाहीत, विशेषत: १९९४ नंतरचे पवार हे उघडेनागडे सत्तावादी आणि पैसावादी व्यापारी आहेत. व्यापार्‍याला विचारधारा, बांधिलकी, तत्वं, ध्येयवाद असलं काहीही परवडत नाही. त्यांना कळतो फक्त रोकडा व्यवहार.

पवारांची एनसीपी नावाची ही पेढी तगते की बुडते ते आगामी काळात समजेलच.
दरम्यान ज्या ज्या मराठा पत्रकार, लेखक, विश्लेषकांचा पवारांमुळे भ्रमनिराश झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
........................................................

1 comment: