Sunday 26 October 2014

-- "दोन गुरु"- नाना पाटेकर....


"अप्रतिम लेख by नाना पाटेकर"
वयाच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.
3सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.
खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती.
गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले.
डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते. आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती.
माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.
भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव.
हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा.
त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही.
खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं.
रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम.
मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम.
या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क.
माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला.
(भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)
अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ-संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले.
‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी. एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्यालासुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली.
प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला.
अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला.
उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं.
उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान.
आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय.
ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर.
आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय.
अजून पुढचा तीर असेल कदाचित.
आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.

Saturday 25 October 2014

मराठी बुडाली तर बुडू द्या ना!

बुडाली तर बुडू द्या ना!----मुरलीधर खैरनार


एक…. 

आज जगाच्या पाठीवर मराठी भाषा बोलणार्‍यांची संख्या आठ कोटींच्या घरात आहे. जगात सध्या बोलल्या जाणार्‍या सात हजार भाषांमध्ये मराठीचा क्रम म्हणे एकोणिसावा लागतो. म्हणजे पहिल्या पंचवीसातच. त्यामुळे अणुयुद्धासारखा एखादा अपघात झाला नाही तर मराठी भाषा आणखी हजारेक वर्षे तरी मरायची काही शक्यता नाही.

जगातल्या एकूण भाषांपैकी अडीच टक्के भाषा सध्या दरवर्षी नाहीशा (एक्सटिंट) होतात, असे एक आकडेवारी सांगते. ही गणिती टक्केवारी यापुढेही तशीच राहील असं गृहित धरलं तरी अडीच टक्के दराने आज एकोणिसाव्या नंबरवर असलेल्या या भाषेला मरायला अजून चारसाडेचारशे वर्षे नक्कीच वेळ आहे. आणि आपल्या आधीच कन्नड, गुजराती, तमिळ, तेलुगु ओडिया, मल्याळी अशा ६९८१ भाषांचे मरण्यासाठी नंबर लागलेले असतील ते वेगळंच.

तेंव्हा काळजी करायची ती कशाची?

हां आता मराठी भाषेचं येऊ घातलेलं मिंग्लीशचं नवं रुप आपण मराठी या नावानं स्विकारलं नाही, तर जुनी मराठी हद्दपार होऊन त्याजागी मिंग्लीश भाषा नक्कीच येत्या पंचवीस तीस वर्षात स्थानापन्न होणार आहे आणि ही बाब कमी स्वागतार्ह असली तरी स्वागतार्हच आहे असा माझा विश्वास आहे.


 दोन… 

दोनशे वर्षांपूर्वी मराठीत पुस्तके छापायला सुरुवात झाली तेंव्हा संस्कृतच्या टायपाचे साचे आयते मिळत होते या एकाच कारणासाठी पहिलं मराठी पुस्तक कलकत्त्यात देवनागरी लिपीत छापण्यात आलं. मराठीची त्यावेळची प्रचलित लिपी मोडी असली तरी मोडीचे साचे तयार करण्याचा महाराष्ट्री वैज्ञानिकांना कंटाळा असल्याने मराठी पुस्तके देवनागरीत छापायची प्रथा पडू लागली. मुळात पुस्तके-बिस्तके हा धंदा अभिजनांपुरताच मर्यादित असल्याने अन्य कुणी तिकडे लक्षच दिले नाही. कारण उरलेल्या ९८ टक्के सामान्य मराठी समाजाचे अन्य व्यवहार तेंव्हाही मोडी लिपीतच निर्वेध चालू होते.

ज्यांना काव्य-नाट्यरचना करायची अशी काही थोडेच अभिजन देवनागरी वापरीत. पण बाकी सामान्यजन आपले व्यवहार मोडी लिपीतच लिहीत. हे सारे १९५० सालापर्यंत निर्वेध सुरु होते. पण १९५० साली स्थापन झालेल्या नव्या महाराष्ट्र या राज्यातल्या मराठी भाषेच्या गोणपाट पुढार्‍यांनी सरकारला हाताशी धरुन बिगर-अभिजन लोक वापरीत असलेली मोडी लिपीच कायमची मोडीत काढली! १९५० साली सरकारने हुकूम काढून (सॉरी, अध्यादेश) मराठी भाषा देवनागरी लिपीतच लिहिण्याचा हट्ट प्रत्यक्षात आणला. आणि तोवर मोडीत मराठी व्यवहार करणारा सारा जनसामान्य समाज एका फटक्यात बेवारशी ठरवून टाकला.

त्याचीच परतफेड आता विशी-तिशीतली तरुण पिढी करते आहे. मोठ्या हौसेने देवनागरी लिपीचा हट्ट पुरवून घेणार्‍या या अ(ति)संस्कृत लोकांची पोरेबाळे मराठी लिहिण्यासाठी रोमन लिपीचा मुक्त वापर मोबाईल, इंटरनेट आणि फेसबुकवर करीत आहेत. थोडा धीर धरा. आजची विशीतली ही पोरे तीस वर्षांनी पन्नाशीत पोचतील तेंव्हा सरकारला हाताशी धरुन देवनागरी लिपी मोडीत काढल्याचा फतवा (पुन्हा सॉरी, Adhyadesh ) काढल्याशिवाय राहणार नाहीत.


तीन….

मराठीची परिस्थिती फार वाईट आहे, आपली भाषा मरायला टेकली आहे, असा गळा आपल्याकडे नेहमी काढला जातो. अगदी १८५० साली दादोबा पांडुरंग (यांना मराठीचे पाणिनी म्हणण्याचा शौक त्यांच्या भक्तगणांना होता) यांनी तेंव्हाच्या मुंबई सरकारला उद्देशून लिहिलेल्या लेखात ‘सांप्रत मराठी भाषेची स्थिती फार शोचनीय असून सरकारी पातळीवर मराठीच्या उद्धारासाठी काही केले नाही तर येत्या काही दशकात ही भाषा नामशेष होईल.’ असा स्पष्ट उल्लेख आहे.

वेल, त्यानंतर आजतागायत सोळा दशके उलटली तरी मराठी भाषा शाबूत आहे. नुसती शाबूत नाही तर १८७१ च्या जनगणनेत मराठी बोलणारांची एकूण संख्या दीड कोटी होती, ती पाचपट वाढून आठ कोटीच्या पुढे गेली आहे.

‘मराठीची स्थिती गंभीर आहे’, ‘मराठी वाचवा’ असा कांगावा मी मला कळत असल्यापासून पन्नास वर्षे ऐकतो आहे. पण खरं सांगायचं तर मला डोळ्यांना कधी असे काही दिसले नाही. कानांना कधी जाणवले नाही.

आणि तरीही महाराष्ट्रातले बुद्धिमंत हा ओरडा करीत असतील तर त्यामागे एकतर राजकीय कारण असेल किंवा आर्थिक. ज्यांचे राजकारण मराठी भाषेवर चालते किंवा ज्यांचा नोकरी व्यवसाय मराठी भाषेवर अवलंबून आहे अशी माणसेच मोठ्या अहमहमिकेने भाषा वाचवण्याच्या बोंबा मारतात.

मग मला प्रश्न पडतो की, ज्या मराठीवर त्यांचे पोट किंवा पुढारपण चालते तीच मराठी मरायला टेकली अशी आवई ही माणसे का उठवितात बरे?

मग याचे कारण शोधतांना मराठीतलीच एक म्हण आठवते. ‘चोराच्या उलट्या बोंबा.’


 चार…

भाषा वाढायची म्हणजे त्या भाषेत बोलणारांची, दळणवळण करणारांची, व्यवहार-व्यापार करणारांची संख्या वाढली पाहिजे असा जगातल्या सार्‍या भाषात आढळून येणारा संकेत आहे. तर या बाबतीत मराठीवर निरतिशय प्रेम असण्याचा कांगावा करणारे हे सर्व लोक -(म्हंजेच भाषेचे पुढारी--म्हणजे राजकीय नेते, विद्यापिठीय प्राध्यापक, मराठीचे लेखक-पत्रकार-शिक्षक, आणि साहित्य, कला, संस्कृती वा तत्सम महामंडळांचे पदाधिकारी)- काय करतात?

या प्रश्नाचे उत्तर आहे- ‘‘काहीही करीत नाहीत.’’

उलट मराठी बोलणारांची, मराठीतून व्यवहार करु पहाणारांची संख्या वाढू नये यासाठी आपल्या भाषेचे पुढारी दिवसरात्र झटतात. १९५० साली मराठी देवनागरीतूनच लिहायचा हट्ट पुरवून घेणारे हेच. ते नुसती ती लिपी स्विकारुन थांबते तर कदाचित ठीक होतं. पण ही अवघड लिपी स्विकारल्यानंतर व्याकरण, शुद्ध भाषा, पदनामकोश आणि पारिभाषिक शब्द या सगळ्या व्याघातांचं इतकं अवडंबर माजवलं की खुद्द महाराष्ट्र सरकारनंही आपल्या बहुतेक व्यवहारातून मराठी वापरणं बंद करुन टाकलं!

मग बाकी सामान्य लोकांचा तर प्रश्नच नाही.

विद्यापीठातल्या आणि शिक्षण समितीतल्या पुढार्‍यांनी या भाषिक प्रांतावरचा आपला वतनदारी हक्क कायम ठेवण्यासाठी भाषेच्या ‘एक्सक्ल्युझिव्हिटी’चा इतका टोकाचा आग्रह धरला की इंग्रजी वा अन्य भाषातून येणार्‍या नव्या शब्दांना मूर्खासारखा सतत विरोधच झाला. (आता ‘एक्सक्ल्युझिव्हिटी’ किंवा ‘एक्सटिंट’ साठी मराठी पारिभाषिक शब्द मला माहीत नाहीत असं समजू नका. मी मुद्दामच ते भिकेचे वांझोटे शब्द वापरले नाहीत.)


 पाच……

आजच सकाळी लॅपटॉप उघडल्यावर फेसबुकचं एक नोटिफिकेशन दिसलं, ‘तुम्ही नेहमी मराठीतून लिहिता. आमच्या मराठी आवृत्तीतली भाषा सुधारण्यासाठी आम्हाला मदत करा.’ मग सोबत काही इंग्रजी वाक्ये आणि त्याचे वेगवेगळे मराठी गद्यावतार. प्रतिक्रिया वा पर्याय देण्याच्या सोप्या सोयी. गंमत वाटली म्हणून त्यातली काही वाक्ये बदलायला मी मदत केली. जे गुगल ट्रान्सलिटरेटरचं मराठी वापरतात त्यांना चांगलं माहीत आहे की गुगलवाल्यांचं मराठी गेल्या दोन वर्षात कितीतरी समृद्ध झालं आहे.

फेसबुकवरचं मराठी सुधारावं म्हणून तिकडे कॅलिफोर्नियात बसलेल्या मार्क झुकरबर्गनं गेल्या तीन वर्षात जेवढे कष्ट घेतले आहेत, त्याच्या दहा टक्के कष्ट तरी मराठी साहित्य महामंडळाच्या किंवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी गेल्या तीस वर्षात घेतले असतील तर मला दाखवा रे कुणीतरी.

मोह आवरत नाही म्हणून हा एक जुना दाखला देतो. १८३० सालच्या दरम्यान मेकॉलेनं ब्रिटनच्या धर्तीवर भारतातील शिक्षण पद्धती बदलावी असं सुचवलं. तेंव्हा इंग्लंडमधले दोन मोठे तज्ञ जेम्स मिल आणि जॉन स्टुअर्ट मिल या पितापुत्रानं ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांना पटवलं. ब्रिटनमध्ये आहे तसं शिक्षण भारतात द्यायची गरज नाही. तिथल्या संस्कृत पाठशाळा आणि अरबी मदरसे यांनाच आपण अनुदान वाढवून देऊ. या गोष्टीला भारतातल्या तेंव्हाच्या पुढारी मंडळींचा म्हणजे राजेरजवाड्यांचा आणि धर्ममार्तंडांचाही पाठिंबा होता. कंपनीने तसे हुकूमही काढले. पण मेकॉले आणि भारताचा तेंव्हाचा गव्हर्नर लॉर्ड बेंटिंक हटून बसले म्हणून भारतात इंग्रजी शाळा आणि व्हर्नाक्युलर म्हणजे देशी भाषातून शिक्षण सुरु झालं. आणि आपल्या सगळ्यांना रोज बोलल्या जाणार्‍या भाषातून शिकायला मिळालं, अरबी किंवा संस्कृतसारख्या मेलेल्या भाषातून शिकण्याची आपल्यावर पाळी आलीच नाही.

सहज म्हणून विचार करुन पाहा, १८३५ सालच्या त्या लढाईत मेकॉलेऐवजी मिल विजयी झाला असता तर काय झालं असतं? कदाचित आपण अजूनही पारतंत्र्यात असतो आणि आज ‘मराठी वाचवा’ म्हणून ओरडणारे हे सारे शुंभ ‘परोपकारी’ इंग्रजी अमदानीखालच्या ‘अखंड’ भारताचे गोडवे गात, संस्कृत व अरेबिकच्या रक्षणासाठी कदाचित समस्त मराठी भाषिक गावढ्यांना आफ्रिकेत हुसकायला निघाले असते!


सहा……

भाषा वाढण्याचा दुसरा मार्ग असतो त्या भाषेत निर्माण होणारे आणि इतर भाषिकांवर प्रभाव टाकू शकणारे विज्ञान, कला आणि साहित्य.

मराठी मातीत कोणतेही विज्ञान जन्माला येण्यासाठी हे मराठीचे उपरोल्लेखित पुढारी काय दिवे लावतात यावर काही भाष्य करण्याची गरज आहे, असे मला अजिबात वाटत नाही. अगदी सरकारी शाळेत सातवीत शिकणार्‍या पोरालाही ते चांगले माहीत आहे. 

कलेच्या बाबतीत बोलायचे तर परंपरेच्या नावाखाली अस्सल मराठी कलेला आपण कुंपणात बांधले आहे, बोन्साय करुन तिचे वाढणे कायमचे बंद केले आहे. मग ते संगीत नाटक असो की तमाशा. जलरंगातली चित्रे असोत की खेडोपाडीची लोकगीतं. अशा नसबंदी केलेल्या सामर्थ्यहीन कलेला नवे पाठीराखे मिळणं फारच दूर आहे.

बरं दादा कोंडकेसारख्या एखाद्या कलाकाराने सिनेमाच्या मदतीने मराठी भाषेत नवनवे झेंडे उभारले तर आमचे मराठी अभिजन त्याला नाके मुरडणार. ‘ही कलाच नव्हे’ असा ठणाणा करीत त्यावर उग्रगंधी तामूलतुषार सोडणार. या असल्या भडभुंज्या भोटांमुळे विष्णुबुवा चिपळूणकरासारख्या मद्दड आणि एकांगी माणसाचे अंधगोलांगुल मराठी गेली शंभर वर्षे मराठीच्या पाठ्यपुस्तकात ठाण मांडून आहे. दादा कोंडके आणि त्याच्या मराठीवर एकतरी धडा आजवर कुठे आला आहे का?

लक्षात घ्या, आज भारतभर आणि भारताबाहेरही व्यवहारात जो हिंदीचा मोठा प्रसार झाला आहे त्याला बॉलीवूडचे हिंदी सिनेमे आणि सतराशे साठ चॅनेल्सवरच्या दे-दणादण सिरीयल्स जबाबदार आहेत, सरकारी मलिद्यावर आयुष्य उंडारणार्‍या हिंदी भाषा प्रचार समित्या नव्हेत!


सात…

जी बाब मराठी कलेची, तीच मराठी साहित्याची. हजारो लोकांना मराठी वाचायचा नाद लावणार्‍या हडप, काकोडकर, अर्नाळकर, काशीकर, नाईक, शिरवळकर, कदम यांच्यासारख्या लेखकांना आमचे हे मराठीचे मनसबदार कचर्‍याप्रमाणे लेखणार. त्याऐवजी कुचकामी आणि प्रोथगामी समीक्षेने वाखाणलेले कुठले तरी, शंभर पुस्तकेही खपण्याची औकात नसलेले लेखक विद्यापीठात शिकण्यासाठी कोवळ्या मुलांच्या माथी मारणार.

अशाने भाषा वाढत नाही. भंपक भामट्याची दोंदे तेवढी वाढतात.

जगभरात शंभर कोटी लोक इंग्रजीतून व्यवहार करतात. या शंभर कोटी लोकांसाठी इंग्रजीत दरवर्षी सरासरी पाच लाख पुस्तके छापली जातात. आठ कोटी लोक मराठीतून व्यवहार करतात. इंग्रजीच्या हिशेबाने पाहिले तर मराठीत दरवर्षी चाळीस हजार पुस्तकेे छापली जायला हवीत. पण ही सरासरी चार हजार सोडा, दोन हजारसुद्धा पडत नाही!

आता ही माहिती ज्यांच्यासाठी सोयरी आहे, त्यांनीच सुतक पाळावे असा आमच्या भाषेच्या पुढार्‍यांचा हट्ट असतो. केवढा हा अर्थांतरन्यास!

स्वातंत्र्योत्तर काळात विशेषत: महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीच्या वाढीला खूप मोठी संधी होती. पण त्यावेळी भाषेचे पुढारपण ज्या टोळभैरवांच्या हाती गेले त्यांनी ती संधी कायमची नष्ट करुन टाकली. याच टोळभैरवांच्या पिलावळीच्या हाती अजूनही मराठी भाषेचे पुढारपण असल्याने आजसुद्धा मराठीच्या वाढीची सुतराम शक्यता नाही.

मी म्हणतो बुडायची असेल तर बुडेना का मराठी? तुमच्या बुडाला का बुडबुडे फुटतात? एखादी भाषा संपली म्हणून जगातले लोक काही बोलायचं किंवा लिहायचं थांबणार नाहीत.

आपण मराठीत लिहितो याचा मला मुळीच अभिमान वाटत नाही.

भाषा मेली म्हणून नवे लेखक किंवा नवे साहित्य जन्माला यायचे थोडेच थांबणार आहे?




मुरलीधर खैरनार फोन 9850724131 इमेल: murli2999@gmail.com

Friday 24 October 2014

मराठे : आरक्षण मिळाले, सत्ता गमावली..







खेडेकर, मेटे, अजित पवार, आर.आर. मराठा समाजाचे हितकर्ते की वैरी?
पुरूषोत्तम खेडेकर, अजित पवार, आर.आर. पाटील,मेटे यांनी मराठ्यांना आरक्षण तर मिळवून दिले पण राज्यातली मराठा सत्ता कायमची गमावली.
मराठे जोवर व्होटब्यांक म्हणुन गपचुप काम करीत होते, तोवर ओबीसी बेसावध होते.१५ टक्के मराठे ५५ ते ७० टक्के सत्ता कब्ज्यात ठेवीत होते.
कुणबी मराठा  खेडेकरांनी ब्रिगेड नी मराठा सेवा संघामार्फत मराठा आरक्षणाचे रान पेटवले.
राज्यात आरक्षणाची आग पेटली.
ओबीसींना असुरक्षित वाटू लागले.
ओबीसी मतदार जागा झाला. संघटित होऊ लागला.
मराठा नेते शरद पवार यांना स्वत:ला ओबीसी बनायचे असल्याने त्यांनी मराठा आरक्षण उचलून धरले.
भुजबळांची कोंडी करण्यात आली. विरोधकांना हाताशी धरून महाराष्ट्र सदन प्रकरणात भुजबळांना यथेच्छ बदनाम करण्यात आले.
नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्यात आले.
राणे समितीचा फार्स करण्यात आला. मराठा आरक्षण देण्यात आले.
परिणाम
मराठा आरक्षणाचे म्होरके मेटे, रेखा खेडेकर, पाचपुते, हर्षवर्धन पाटील, मोघे, पुरके, नारायण राणे पराभूत झाले.
पंकज भुजबळ दुसर्‍यांदा निवडून आले. या मतदार संघात गेल्या ६० वर्षात कोणताही आमदार दोनदा निवडून येत नाही. पंकज भुजबळांनी इतिहास घडवला घडवला.ते दुसर्‍यांदा निवडून आले. जातीयवादी प्रचार करणार्‍या मराठा अद्वय हिरेंना त्यांनी चारी मुंड्या चित केले.

मराठे नी जाट: आरक्षण मिळाले, सत्ता गमावली

From : Facebook
Shrawan Deore's Timeline
38 mins · 
क्षत्रिय जमिनदार जैसे जाट, मराठा जातीयों ने अारक्षण की मांग 15 साल से कर रहे थे। मैने उसी वक्त उनको इशारा दिया की,' आप सत्ता मे हो तो, किसी तरह आरक्षण पा लेंगे, मगर Political power हमेशा के लिए खो देंगे।

 (पढो मेरी किताब ''ओबीसी जातींसाठी 42 कलमी कार्यक्रम'' 2003, मराठी) मगर उन्होने मेरी एक नही सुनी। 
आज जाट, मराठा को आरक्षण तो मिल गया मगर परिणामस्वरूप अब उनकी सत्ता हमेशा के लिए चली गयी। उधर हरियाना मे नॉन-जाट खत्तर मुख्यमंत्री हो रहे और इधर महाराष्ट्रा मे ब्राह्मीण फडणवीस। 

हते है जमिनदारों की ताकत घुटने मे रहती है।

... आरक्षण पाकर भी क्या हुआ? ओपन 50 परसेंट मे बहुत कुछ मिल जाता था। 
अब ओपन का रास्ता इन क्षत्रियों के आरक्षण की वजहसे सब बहुजनों (SC,ST, OBC) को हमेशा के लिए बंद हो गया है। 

अब सडो अपने अपने कॅटेगिरि के छोटे तालाब मे।
 आप कितनी भी कोशीश करले... उनके पास निकलने के लिए रास्ते भी है और सत्ता भी। 

क्यों की उनकी ताकत दिमाग मे है। आप के पास क्या है? जो भी है वो तो घुटने मे ही है। तिसरी मंझील तो खाली है!!!
..............................................................

Thursday 23 October 2014

शरद पवार नावाचे व्यावसायिक रसायन


पवार हे उघडेनागडे सत्तावादी आणि पैसावादी आहेत.ते एक व्यापारी आहेत. व्यापार्‍याला विचारधारा, बांधिलकी, तत्वं, ध्येयवाद असलं काहीही  परवडत नाही. त्यांना कळतो रोकडा व्यवहार.
.................................................
महाराष्ट्रावर पवारांचे गारूड आहे. त्यांचे अमाप चाहते आहेत. भक्त नी लाभार्थी तर असंख्य आहेत.  सेक्युलर शरद पवारांनी आपली फसवणूक केली अशी तक्रार करणार्‍या या मंडळींचे दु:ख आपण समजून घेतले पाहिजे. मराठा नेते  शरद पवारांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. तो त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पुरोगामी, समाजवादी, फुले - आंबेडकरवादी, अल्पसंख्याक आणि धर्मनिरपेक्ष विचारांचे लोक यांचे शरद पवार हे अनेक वर्षे हिरो आहेत किंवा आता होते म्हणायचे.

विशेषत: त्यांच्यावर प्रेम करणार्‍या मराठा पत्रकार, लेखक, विचारवंत मंडळींना या धक्क्यातून आठवडा झाला तरी सावरता आलेले नाही.कात्रजचा घाट, गनिमी कावा म्हणुन एकीकडे कौतुकही करायचे आणि फसवले म्हणून तक्रारही करायची हे काही उचित नाही.
मी गेली काही वर्षे शरद पवारांच्या राजकारणाचा  अभ्यास करीत आहे. मी त्यांच्यासोबत वावरलो आहे. मी त्यांचा कट्टर समर्थकही होतो. त्याकाळात मी त्यांना जवळून पाहिले आहे. राष्ट्रवादीचा मी सक्रीय सभासद होतो. गेली १४ वर्षे  मी राष्ट्रवादीचा सदस्य नाही. नी त्यांचा समर्थकही  नाही.

पवारांच्या राजकीय प्रवासाचे प्रमुख असे चार टप्पे आहेत.

१. १९६७ ते १९७७ च्या काळातील ध्येयवादी शरद पवार,
२. १९७७ ते १९९४ च्या काळातील ध्येय आणि व्यवहार यांचा मेळ घालणारे पवार,
३.१९९४ ते २००४ संधीसाधू, सत्तासाधू पवार,
४. आणि २००४ नंतरचे निखळ व्यापारी, जातीयवादी, नफाखोर शरद पवार..

यशवंतरावांनी शरद पवारांच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला आणि पवार झपाट्याने प्रगती करू लागले.आईचा शेकाप चा वारसा आणि आजूबाजूला दलित प्यांथर,युक्रांद, एक गाव एक पाणवठा, मुस्लीम सत्यशोधक चळवळ यांनी आसमंत ढवळून काढलेला होता. पवार त्याकाळात पुरोगामी होते. हमीद दलवाईंना मदत करणारे, पाणवठा चळवळीत भाग घेणारे पवार युवक होते. परिवर्तनाची त्यांना गरज वाटत होती.

वसंतदादा नी यशवंतरावांना सोडून त्यांनी पुलोद बनवले, एस.एम. नी समाजवादी ताकद यांच्या आग्रहामुळे पवारांनी नामांतराची घोषणा केली. वसंत दादांच्या मंडळींनी रातोरात मराठवाडा पेटवला. राजकीय बुमर्‍यांग झाले. उत्स्फुर्तपणे जातीय दंगलींचा आगडोंब उसळल्याचे चित्र निर्माण केले गेले. प्रत्यक्षात मराठा जातीयवादाचा तो उद्रेक होता.

पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर विशेषत: १९८० च्या दशकात पवार आरपार बदलले. संपूर्ण व्यवहारवादी झाले. सत्तेतून पैसा आणि पैशाचा सांभाळ करण्यासाठी सत्ता अशा चक्रात ते रूतले.१९८० ते १९८६ ते विरोधी पक्षात बसले. त्यांनी निवडून आणलेल्या ५४ आमदारांपैकी ५० सत्ताधारी पक्षात गेले. अवघे चार सोबत उरले.

 पवारांनी ध्येयवाद, सेक्युलरवाद आणि पुरोगामित्व यांचा फक्त वापर  करून घ्यायचे ठरवले. त्या भांडवलावर पवारांनी पुढची आजवरची वाटचाल केली. पवारांनी शंकररावांना मुख्यमंत्रीपदावरून घालवण्यासाठी रिडल्स वाद माधव गडकरींना हाताशी धरून पेटवला. शिवसेना वाढतेय हे चित्र निर्माण करण्यासाठी आपले कार्यकर्ते सेनेत घुसवले. सुधाकररावांना मुख्यमंत्रीपदी  त्यांनीच बसवले. पण हितेंद्र ठाकूर, पप्पू कलानी प्रकरणात त्यांचे दोघांचे बिनसले. त्यांना घालवण्यासाठी मुंबईतील १९९३ च्या दंगलींना पवारांनी इंधन पुरवले. त्या आगीच्या ज्वाळांवर पवार परत मुख्यमंत्री झाले.रिपब्लीकन राजकारणाचा झालेला फायदा लक्षात घेऊन त्यांनी नामांतर केले. महिला धोरण आणले. मंडल आयोग लागू केला.पण राजीव काळातील पवारविरोधी बंड आणि दिल्लीची नरसिंहरावांची तिरकी चाल बघून हे आपल्याला मुख्यमंत्री करणार नाहीत हे ओळखून पवारांनी १९९५ साली आपले हस्तक  बंडखोर म्हणून उभे केले. या बंडखोर अपक्षांना सेना-भाजपामागे उभे करून मनोहर जोशींचे सरकार आणले. त्यांच्याकडून एनरो‘न, गुन्हेगारांशी संबंध अशा सार्‍या प्रकरणात क्लीन चीट मिळवली.राष्ट्रवादीची स्थापनाच मुळी भाजपाच्या राजकारणाला ताकद पुरवण्यासाठी करण्यात आली होती. सोनिया गांधीचे परकीय असणे याचा गाजावाजा करून पवारांनी संघ परिवाराला केलेली मदत, सत्तेवर आल्यावर १९९२-९३च्या जातीय दंगलीतील  दोषींवर कारवाई न करणॆ, {न्या. श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी न करणे }, रमाबाई नगर दलित हत्याकांडातील मराठा आरोपी मनोहर कदम याला संरक्षण  पुरवणे, ही सारी १९९९ ला पवारांची को‘न्ग्रेस बरोबर सत्तेवर आल्यानंतरची वाटचाल.

 संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, छावा, शिवसंग्राम आदी मराठा जातीयवादी संघटनांना हाताशी धरून मराठा आरक्षण, भांडारकरवर हल्ला, कुमार केतकरांच्या घरावर हल्ला हे सारे कोणी घडवले?
आयपीएल, लव्हासा, अमेनोरा, हे सारे पैशाच्या हव्यासातून घडत गेले. पवारांनी सत्ता, अधिक सत्ता, फक्त सत्ता, कसेही करून कोणाशीही हातमिळवणी करून सत्ता एव्हढेच एकमेव इप्सित बनवले.

पवारांनी युती तोडायला लावली, सत्तेसाठी पवार भाजपासोबत जातील असे राज नी उद्धव ठाकरे सांगत होते तेव्हा पवारांनी त्यांची खिल्ली उडवली आणि मतमोजणी पूर्णही झाली नव्हती तोवर भाजपाला पाठींबा देऊन मोकळे झाले.
पवारांच्या प्रमोद महाजन, नितीन गडकरी, नरेंद्र मोदींशी असलेल्या दोस्तीचा अर्थ ज्यांना कळला नाही, ज्यांना १९८०नंतरचे पवार उमगले नाहीत, विशेषत: १९९४ नंतरचे पवार हे उघडेनागडे सत्तावादी आणि पैसावादी व्यापारी आहेत. व्यापार्‍याला विचारधारा, बांधिलकी, तत्वं, ध्येयवाद असलं काहीही परवडत नाही. त्यांना कळतो फक्त रोकडा व्यवहार.

पवारांची एनसीपी नावाची ही पेढी तगते की बुडते ते आगामी काळात समजेलच.
दरम्यान ज्या ज्या मराठा पत्रकार, लेखक, विश्लेषकांचा पवारांमुळे भ्रमनिराश झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे.
........................................................

Tuesday 21 October 2014

१००% सत्ताकारणी शरद पवार---




शरद पवारांनी भाजपाला पाठींबा दिल्याचा त्यांच्या चाहत्यांना खूप राग आलाय. आपले राज्य अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात द्यायचे का? राष्ट्रवादी कधीही भाजपाला पाठिंबा देणार नाही असे चार दिवस आधी प्रचारात जोरजोरात सांगणारे पवार कसे बदलले याचा त्यांना धक्का बसलाय.पवारांनी समर्थकांना चक्क फसवले, खासे चकवले असे त्यांना वाटते.

पवार बदललेले नाहीत. त्यांनी तुम्हाला फसवलेलेही नाही. तुम्ही  त्यांना धर्मनिरपेक्ष समजत होतात, संघ-भाजपा विरोधी समजत होतात ही तुमची चुक आहे. तुम्ही त्यांना ओळखू शकला नाही याचा खरं तर तुम्हाला राग आलाय. मान्य करा की, चुक तुमची आहे.

शरद पवार गेली सुमारे ५० वर्षे सतत सत्तेत आहेत. ते सत्ताकारणी आहेत. ते सत्तानिरपेक्ष राजकारणाची कल्पनाही करू शकत नाहीत.ते सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता यासाठी जगले, जगत आहेत.

त्यांचा पक्ष म्हणजे  स्थानिक मनसबदार आणि शक्तीशाली नेत्यांची मोळी आहे. तो एकजिनशी नाही. ती एक खाजगी कंपनी आहे. तिची ९९% भाग भांडवलाची भागपत्रे  ते, सुप्रिया आणि अजित पवार यांच्या नावे आहेत. उरलेल्या १% टक्क्यात भुजबळ, आर.आर. जयंत, दिलीप, तटकरे आदी आहेत.

पवार अपार क्षमता असलेले पण शून्य विश्वासार्हता असलेले उद्योगपती आहेत. त्यांना शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर ही जपमाळ ओढून बहुजनवादाचे ढोल बडवीत सत्ता मिळाली त्यांनी ती उपभोगली. आता ते सत्तेवाचून राहूच शकत नाहीत.

आदतसे मजबूर आहेत ते.

संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, छावा, शिवसंग्राम, मराठा सेवा संघाचे प्रमुख आश्रयदाते आहेत काकापुतणे.
मराठा आरक्षण दिले नी ओबीसी चिडले.

मराठा, मुस्लीम, लिंगायत, कैकाडी, धनगर, कोळी ज्यांनी ज्यांनी पाठिंबा, पत्रे, आरक्षण मागितले त्यातल्या जमेल त्यांना त्यांनी देवून टाकले.नंतर तर मागायलाही कोणी बाहेर राहिले नाहीत.

तत्व, ध्येयवाद, निष्ठा या सार्‍यांची चेष्टा म्हणजे शरद पवार.

सत्ता आणि अधिक सत्ता हाच त्यांचा प्राणवायू आहे.

Monday 20 October 2014

मराठा समाजाला अवघे ३७४ टक्के प्रतिनिधित्व


समाज बांधवांनो आता तरी जागे व्हा.
पेशवाई आल्याची प्रचारमोहीम हाती घ्या.

राज्याच्या विधानसभेत सर्व पक्षांमधून मिळून अवघे १३८ मराठा आमदार झाले आहेत. राज्यातील ५८ मतदार संघ अनु.जाती व जमातींसाठी राखीव असतात. २८८ पैकी २३० जागा सर्वांना उपलब्ध असतात. त्यातील ५९.९७% जागा मराठा समाजाने मिळवल्या आहेत. राज्यात मराठा समाजाची लोकसंख्या १६% असल्याचे राज्य सरकारच्या "महाराष्ट्र : भुमी आणि लोक" या अधिकृत संदर्भ ग्रंथात २००९ साली प्रकाशित करण्यात आलेले आहे.

खुल्या जागांपैकी मराठा समाजाने मिळवलेल्या जागांचा अभ्यास करता १६% समाजाने ३७४% प्रतिनिधित्व मिळवलेले स्पष्ट होते.
मुख्यमंत्री कोणी होवो, सभागृहात बहुमत मराठा जातीचेच असणार आहे.

मात्र १९६० सालापासून मराठा समाजाला मिळालेल्या या सर्वात कमी जागा आहेत.

समाज बांधवांनो आता तरी जागे व्हा.

पेशवाई आल्याची प्रचारमोहीम हाती घ्या.

या सत्तेशिवाय जीव रमत नाही...

Monday, October 20, 2014
http://www.sahyadribana.com/2014/10/blog-post_20.html?m=1
या सत्तेशिवाय जीव रमत नाही...

'या सत्तेत जीव रमत नाही' असं नामदेव ढसाळ म्हणाले होते. परंतु सध्याच्या राजकीय घडामोडी पहाता 'या सत्तेशिवाय जीव रमत नाही' असंच काहीसं चित्र आहे. भाजपची शिवसेनेबरोबर असलेली पंचवीस वर्षांची युती तुटली आणि काही क्षणातच राष्ट्रवादी कोंग्रेसनेही कोंग्रेससोबत असलेली पंधरा वर्षांची आघाडी मोडली. अगदी ठरवून केल्यागत सार्या गोष्टी पार पडल्या. भाजप आणि राष्ट्रवादीच्या या क्रुतीने दुखावलेल्या शिवसेना आणि कोंग्रेसने भाजप-राष्ट्रवादीची छुपी युती असल्याचा आरोप करायला सुरुवात केली. भाजपने हे आरोप फेटाळून लावले. राष्ट्रवादी आणि शरद पवारानी तर संघावर आणि भाजपवर अशा पद्धतीने हल्लबोल केला कि राष्ट्रवादीचे भाजपसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचा संशय कुणाला येणार नाही.


भाजपवर टिका करताना 'अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हातात राज्य देणार का ?' असा सवाल पवार साहेबानी विचारायला सुरुवात केली. भाजप हा जातीयवादी पक्ष आहे, तो जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडणे लावतो अशा प्रकारच्या हाकाट्या पिटायला सुरुवात केली. भाजप सरकार असलेल्या राज्यान्मध्ये चुकीचा इतिहास कसा शिकवला जातो, इतिहासाचे विक्रुतीकरण भाजपवाले कसे करतात हे सांगण्यातच पवार साहेबांचा जास्तीत जास्त वेळ जाऊ लागला. या विधानसभेच्या प्रचारात पवार साहेबानी केलेली भाषणे काळजीपूर्वक पहा. सर्व भाषणांचा मतितार्थ एकच- भाजपसारख्या जातीय, धर्मांध पक्षाच्या हाती सत्ता देऊ नका. शरद पवारांचे सरसेनापती सन्माननीय आर. आर. पाटील यानीही लगेच जेम्स लेनचा मुद्दा उकरुन काढून भाजपविरोधी सूर काढायला सुरुवात केली. जेम्स लेनने शिवाजी महाराजांचा इतिहास बदनाम केला त्याला भाजप आणि उजव्या विचारांच्या लोकांची फूस आहे. त्यामूळे या उजव्या विचारांच्या भाजपच्या हाती सत्ता देऊ नका असे आर. आर. पाटील सांगत होते. आता कुणाच्याही मनात प्रश्न उपस्थित होईल कि यात गैर काय आहे ? आपल्या पक्षाचा प्रचार करणे, त्यासाठी वैचारिक विरोधक असणार्या जातीय पक्षांवर, त्यांच्या ध्येय-धोरणांवर टीका करणे, या विचारांच्या लोकांचा खरा अजेंडा समाजासमोर उघड करणे चुकीचे आहे का ? अजिबात नाही. मग पवार साहेबाना आणि राष्ट्रवादीला दोष का ?

राष्ट्रवादी कोंग्रेस आणि पवार साहेब अशासाठी दोषी आहेत कि त्यानी पुरोगामीत्वाचा आव आणला. ज्या भाजपवर जातीयवादाचा आरोप केला, त्याच भाजपला सत्तास्थापनेसाठी बाहेरुन पाठींबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादी कोंग्रेसने घेतला. निवडणूकीआधी जातीयवादी असणारा भाजप आता राष्ट्रवादीला पुरोगामी वाटायला लागला का ? हा खरा प्रश्न आहे. रामदास आठवले यानी शिवसेनेशी हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यांच्याकडून आठवले यांच्यावर नेहमी टीका होत होती. आठवले यानी आंबेडकरी विचाराशी फारकत केल्याचा आरोप पवार सतत करत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यानी बहुजन समाज संघाच्या दावणीला बांधण्याचे पाप केल्याचा आरोप शरद पवार, आर. आर. पाटील आणि त्यांचा राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष करत राहिला. राष्ट्रवादी हा फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा मानणारा पक्ष असून आपली बांधिलकी बहुजन समाजाशी आहे अशा प्रकारचा प्रचार राष्ट्रवादीकडून नेहमीच होत राहिला. मग आत्ता भाजपला पाठींबा देताना तुमची बांधिलकी कोठे गेली ? कुठे गेला तो पुरोगामी विचार आणि फुले-शाहू-आंबेडकरी विचारसरणी ?

वास्तविक पहाता राष्ट्रवादीने आपण पुरोगामी आहोत असा आवेश दाखवला तरी त्यांचे बेगडी पुरोगामीत्व कधीच लोकांच्या लक्षात आले आहे. राष्ट्रवादी सत्तेत असतानाच खैरलांजी हत्याकांड घडले. सार्या समाजमनाचा थरकाप उडवणारे हत्याकांड घडूनही दोन महिने सरकारी पातळीवर उदासिनता होती. या हत्याकांडाने जेव्हा दलित समाज खडबडून जागा झाला आणि तीव्र आंदोलन केले तेव्हा कुठे सरकारला या प्रकरणाची दखल घ्यावीशी वाटली. दलित समाजाच्या कार्यकर्त्याना नक्षलवादी संबोधण्यापर्यंत आर. आर. पाटलांची मजल गेली. इतकी संवेदनशून्य भूमिका घेण्यात आली. नुकतेच घडलेले खर्डा प्रकरण आणि त्यात राष्ट्रवादी कोंग्रेसच्या मित्र संघटनानी घेतलेली दलितविरोधी भूमिका हेही राष्ट्रवादीचे बेगडी पुरोगामीत्व समोर आणायला पुरेसे होते. राष्ट्रवादीचीच सत्ता असताना डो. नरेंद्र दाभोळकरांची पुण्यात हत्या झाली. पोलीस खातं राष्ट्रवादीच्याच आर. आर. आबांकडे होतं. आज वीस महिने होऊन गेले तरी तुम्हाला साधे आरोपी सापडत नाहीत. दाभोळकरांची हत्या का झाली, कुणी केली याचा थांगपत्ता लागत नाही. दुसर्या बाजूला तूमचेच पोलीस प्लॅंचेट सारखे मूर्ख प्रकार या गंभीर गुन्ह्यात करतात, त्यांच्यावरही कारवाई होत नाही. मग पुरोगामीत्वाचा गजर कशाला करता ? एका पुरोगामी विचारवंताचे हत्यारे तूम्ही पकडू शकत नाही मग फक्त भाषणबाजी काय कामाची ? कि फक्त पुरोगामीत्वाचा जयघोष केल्याने तूमचे पुरोगामीत्व सिद्ध होणार.आहे का ?

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरुन धनगर आणि आदिवासीत भांडण लावून देण्याचे पातकही यांच्याकडूनच घडले. जर धनगर आरक्षणाची मागणीच चूकीची होती आणि तसा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचा दावा होता तर शरद पवारानी 2009 च्या लोकसभेला माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना धनगराना अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेच कसे ? आत्ताही धनगर समाजाचे आंदोलन ऐन भरात असताना याबाबत संदिग्ध भूमिका घेण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत धनगर आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर करायचा नाही आणि बाहेर मात्र पत्रकार परिषद घेऊन धनगराना पाठींबा द्यायचा हे धोरण सातत्याने राबविले. म्हणजे एकिकडे आरक्षणासाठी धनगराना उठवून बसवायचे आणि दुसरीकडे आदिवासी नेत्याना फूस लावून आदिवासीना भडकवायचे असा दुटप्पीपणा म्हणजे तूमचे पुरोगामीत्व का ? या बेगडी पुरोगामीत्वामूळे बहुजन समाजातील दोन उपेक्षित घटकात वितुष्ट निर्माण झाले. अर्थात ती तूमची राजकीय गरज असली तरी त्यामूळे महाराष्ट्राचे समाजिक वातावरण गढूळ झाले.

बहुजन समाजातील कोणत्याही घटकाने कधी भाजप अथवा शिवसेनेसारख्या पक्षाना मदत केली तर त्यानी पुरोगामी विचाराना काळीमा फासल्याची बोंब मारायची, बहुजन समाज त्यानी संघाच्या दावणीला बांधल्याची ओरड करायची आणि यानी मात्र सत्तेसाठी कोणतीही भूमिका घ्यायची, हे कसे योग्य आहे ? पवार साहेबांचे एक आवडते वाक्य आहे; 'राजकारणात कुणीही अस्प्रुश्य नसतं'. मग हीच भूमिका आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यानी घेतली तर बिघडलं कुठे ? कि तूम्ही हवी ती सोयीस्कर भूमिका घ्यायची आणि इतरानी मात्र वैचारिक, नैतिक बांधिलकी जपतच राजकारण करायचे हा अट्टहास कशासाठी ?

मागे शेतकरी संघटनेचे आंदोलन चालू असताना राजू शेट्टी यांची 'जात' काढून पवार साहेबांचे पुरोगामीत्व सिद्ध झाले. मतदानानंतर बोटाला लावलेली शाई पूसून दोनदा मतदान करा असे पवार साहेब म्हणाले होते. आर. आर. पाटील म्हणतात कि बलात्कार करायचा तर निवडणूकीपर्यंत तरी थांबायचे होते. ही नैतिकता आहे का ? म्हणजे आधी तोंड सैल सोडायचे आणि आपल्या विधानांचा गाजावाजा झाला कि 'मजेत बोललो' असे म्हणायचे किंवा दिलगीरी व्यक्त करुन मोकळे व्हायचे. अजित पवारांची धरणात ..........ची भाषा, मासाळवाडी गावात दम देऊन मत मागण्याची पद्धत या गोष्टी नैतिक, लोकशाही प्रक्रियेशी सुसंगत असतील तर मग बोलायलाच नको.

शरद पवार अपवाद वगळता सत्तेच्या बाहेर कधीही राहिले नाहीत. 1978 साली पूलोदचा प्रयोग करुन त्यानी अनपेक्षित सत्ता मिळवली होती. तेव्हा तर जनसंघालाही सामावून घेतले होते. अनेक ठीकाणी स्थानिक स्वराज्य संस्थान्मधे सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही पक्ष-संघटनांशी तडजोड करण्याची तयारी शरद पवारानी नेहमीच ठेवली आहे. त्यामूळेच आता सत्ता जाणार या भितीने त्यानी भाजपला बाहेरुन पाठींबा देवू केलाय. भाजप तो पाठींबा स्विकारतो कि नाही हे कळेलच, परंतू त्यामूळे पवारांची काहीही करुन सत्तेत राहण्याची व्रुत्ती दिसून येते. नामदेव ढसाळ म्हणतात, "या सत्तेत जीव रमत नाही". तर पवार साहेबांचे धोरण आहे, "या सत्तेशिवाय जीव रमत नाही". काहीही असो, पवारानी ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचा पाठींबा भाजपला देवू केलाय ते पहाता त्याना पुरोगामीत्वाचा जयघोष करण्याचा अधिकार नाही.

-प्रकाश लालासाहेब पोळ, कराड.

Wednesday 15 October 2014

जनतेने को‘न्ग्रेस - राष्ट्रवादीची हाकालपट्टी केली.

जनतेने को‘न्ग्रेस - राष्ट्रवादीची हाकालपट्टी केली.

 राज्यातील जनतेने अट्टल जातीयवादी नी महाभ्रष्ट को‘न्ग्रेस - राष्ट्रवादीला नाकारले आहे. हे हरामी नकोत. दुसरे पक्ष कसेही असले तरी आम्हाला ते चालतील असा जनतेच्या या कौलाचा अर्थ आहे.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच राज्यातून स्वत:ला  "सेक्युलर, समाजवादी, फुले शाहू आंबेडकर वादी " म्हणवणार्‍या  आणि फक्त  नामस्मरण करून भ्रष्ट, मुजोर आणि "एकजातीय" सरकार चालवणार्‍यांची जनतेने हाकालपट्टी केली आहे.

जे झाले ते अत्यावश्यक होते.

जातीयवादी को‘न्ग्रेस - राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र आता  मोकळा श्वास घेऊ शकेल.

जनतेच्या या कौलाचे / जनादेशाचे मी हार्दीक स्वागत करतो.
........................................................

Monday 13 October 2014

मी भाजपला मत देणार नाही. कारण...


माझा सहकारीAnand Bhandare याचं हे निवेदन.
वाचा आणि स्वस्थ बसू नका.
मी भाजपला मत देणार नाही. कारण...
* मोदी म्हणतात, गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ. आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल म्हणतात, उद्योगपतींनो, मुंबई, महाराष्ट्रात तुमच्यासाठी काय ठेवलंय? हा काय प्रकार आहे?
* मोदी म्हणतात, महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. भाजप लगेच सांगतो, विदर्भ वेगळा होणारच! ही लपवाछपवी कशासाठी?
* गेले पंचवीस वर्ष विदर्भाची मागणी आम्ही करतोय, असं फडणवीस म्हणतात. मग गेले पन्नास वर्ष सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात यायला धडपडताहेत, यावर भाजपची भूमिका काय हे कुणी सांगेल काय?
* कर्नाटकचे माजी भ्रष्ट मुख्यमंत्री येडियुरप्पा महाराष्ट्रात येऊन सांगतात, येथील कन्नडिगांनी भाजपला मतदान करावे. मग येळ्ळूरमधील लोकांनी मराठी फलक लावल्यावर कर्नाटक सरकार खवळून का उठले?
* मुंबई महाराष्ट्रातच असताना मोदी सतत त्यांच्या भाषणातून मुंबई आणि महाराष्ट्राचा स्वतंत्रपणे उल्लेख का करतात?
* रिझर्व्ह बॅंकेचे मुख्यालय मुंबईतून हलविण्याची एवढी घाई भाजप सरकारला का आहे?
* पाणीपुरीच्या भांड्यात लघ्वी करणाराचं चित्रण करणाऱ्या मुलीला जाहीरपणे 'वेश्या' म्हणणाऱ्या मुंबई प्रदेशच्या माजी अध्यक्षावर (राज पुरोहित) कारवाई सोडाच उलट या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकिट दिले आहे. हेच का भाजपवाल्यांचे
'पार्टी विथ डिफरन्स?'
* मुनगंटीवार म्हणतात, जिंकण्यासाठी मते कमी पडत असतील आणि इतर पक्षांतून आलेल्या उमेदवारांमुळे आम्ही जिंकणार असू तर त्यांना घेण्यात गैर काय?
* केवळ सत्ता मिळावी यासाठी सर्व पक्षातील जवळपास साठ लोकांना उमेदवारी देणाऱ्या भाजपवाल्यांनी साधनशुचितेच्या बाता माराव्यात का?
* ज्यांच्यावर आरोप आहेत अशांना सर्वच राजकीय पक्षांनी तिकिटे देवू नये, असे मोदींनी संसदेत आवाहन केले आणि इकडे महाराष्ट्रात येऊन विजयकुमार गावित, अनिल गोटे, शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी आवाज बसेपर्यंत भाषणे दिली (तिकडे हरियाणात डी पी यादवांबरोबर अमित शहा फिरतात), याला काय म्हणायचे?
* महाराष्ट्राची बूज न राखणारी, खुलेआम महाराष्ट्राची खिल्ली उडविणारी जाहिरात करून 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?' विचारताना गेली पंधरा वर्ष विरोधी पक्षात असून, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपदी असूनही 'कुठे नेऊन ठेवलाय?' मध्ये भाजपवाल्यांची काहीच जबाबदारी नाही का?
* भाजपची जाहिरात सांगते, पन्नास हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. मोदी सांगतात, साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. कुणाचं खरं मानावं?
* देशातील फक्त चार राज्यांत (गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ) भाजपची सत्ता. यातील दोन राज्ये तर बीमारूच. तरीही यांची जाहिरात असं सांगते की भाजपच्या सर्व राज्यांमध्ये 'हे घडतंय'. म्हणजे नेमकं कुठे घडतयं?
* रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या २०१३ च्या अहवालानुसार कित्येक क्षेत्रातील मानांकानुसार महाराष्ट्र हा गुजरातच्या कितीतरी पुढे आहे, हा अहवाल खोटा आहे असं भाजपवाले म्हणतील का?
* मुंबईत मेट्रो असतानाही 'मी मुंबईला मेट्रो देईन' असं मोदी म्हणतात, या 'मी' पणाला काय म्हणावं?
* वल्लभभाई पटेलांचा पुतळा स्वखर्चाने बांधण्याची टिमकी वाजविणाऱ्या गुजरात सरकारला केंद्रातून आता ८०० कोटी मिळणार आहेत, ते कशाला?
* महाराष्ट्राचा हरीत पट्टा जपणारा गाडगीळ अहवाल मोदी सरकारने फेटाळला. ग्रामपंचायतीलाही विकासात अधिकार न देणारे मोदी सरकार 'सबका साथ, सबका विकास' कसा करणार आहेत?
* पर्यावरण कायद्यात बदल, वन्यजीव कायद्यात बदल, वन संरक्षण कायद्यात बदल, कामगार धोरणात बदल हे मोदी सरकारचे धोरण कुणासाठी आहे?
* विकास हा फक्त खाजगीकरणातूनच होतो हा मोदी आणि कंपनीचा विखारी विचार महाराष्ट्राच्या खरंच हिताचा आहे का?
* अमेरिकन औषधी कंपन्यांच्या फायद्याकरीता नियमात बदल करणारे मोदी सरकार कुणाचे भले करणार आहे?
* अरूणाचल प्रदेशावर अडेलतट्टू भूमिका घेणाऱ्या चीनला मोदी सरकारने उत्तर प्रदेशात तीन एसईझेड प्रकल्प मंजूर करून दिलेत, हे उघड गुपित काय सांगते?
* पाकिस्तानच्या सध्याच्या गोळीबारीबाबत 'राजकारण' करू नका, असे मोदी आताच का बोलताहेत?
* पालघर येथे होणारे कोस्ट गार्ड हब केंद्रात भाजप सत्तेवर येताच गुजरातच्या पोरबंदरला हलविण्याची घाई का केली?
* बुलेन ट्रेन ही वास्तविक लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी असताना पहिली बुलेट ट्रेन मुंबई - अहमदाबाद अशीच का? आणि पुन्हा ती अहमदाबादच का?
* मुंडे असते तर मला यावं लागलं नसतं, असं म्हणणारे मोदी लोकसभेच्या प्रचारावेळी मुंडे असतानाही महाराष्ट्रात का आले होते? मुंडेंचं एवढं महत्व पक्षात असताना त्यांना केंद्रात मंत्रिपद देताना भाजपची एवढी चलबिचल का झाली? आणि मुंडेंची चिता विझायच्या आत त्यांच्या खात्याचा कारभार लगेच गडकरींकडे कसा काय सोपवला जातो?
* गेल्या साठ वर्षात भारतात विकास झालाच नाही असं प्रचारसभेत सांगणारे मोदी मंगळावर आम्ही पोचलो, असं अमेरिकेत सांगतात. घरात एक आणि बाहेर एक हे गौडबंगाल काय आहे?
* शिवाजी महाराज आणि भगतसिंगांच्या काळातही अमेरिकेत भारताचा डंका वाजलेला नाही असं अमेरिकेत सांगताना मोदींना नेमकं काय सांगायचं होतं?
* डंका वाजलेला नाही तर मग 'शिवछत्रपतींचा आशिर्वाद' ही जाहिरात भाजपला आताच का करावी लागली?
* महाराष्ट्रातील प्रचारसभेत महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेईन, हरियाणातील सभेत हरियाणाला गुजरातच्या पुढे नेईन, असं म्हणणाऱ्या मोदींना किमान भाजपची तरी इतर राज्यंही दिसत नाहीत काय?
* देशाचा प्रधानमंत्री एका राज्याला दुसऱ्या राज्यापेक्षा पुढे घेऊन जाईन असं म्हणूच कसा शकतो? आणि मग इतर राज्यांनी प्रधानमंत्र्यांवर विश्वास का म्हणून ठेवायचा?
* असा कोणता लौकिक आहे की गुजरात आणि राजस्थान या भाजपच्याच राज्यातील पोलिस कुमक पहिल्यांदाच महाराष्ट्रातील विधानसभा मतदानाच्या बंदोबस्तासाठी आणण्यात आली आहे?
* ज्या पध्दतीने २५ वर्षांची सेनेबरोबरची युती तोडली, शिवसेनाप्रमुखांच्या मृत्यूनंतर सेनेला जी मानहानीकारक वागणूक दिली, सर्वाधिक खासदार सेनेचे असूनही जे एकमेव मंत्रीपद दिले, तो अमित शहा आणि कंपनीला झालेला सत्तेचा भस्म्या रोग नाही तर काय आहे?
* मोदींचा चेहरा वगळता प्रदेश भाजपला महाराष्ट्रात चेहरा आहे का? नाही ना? तर मग मोदींच्या तालावर नाचणारे सरकार महाराष्ट्राला हवे आहे का?
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मित्रहो,
मोदी, शहा या जोडगोळीच्या आश्रयाने आणि केवळ प्रचारतंत्राच्या नवनव्या जाहिराती करून पराचा कावळा करणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश भाजपला त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आणि संधी महाराष्ट्राकडे चालून आली आहे. हे तुम्हाला पटत असेल तर स्वत:च्या नावाने आपल्या मित्रमंडळींना हा मेसेज पुढे पाठवा. विश्वास ठेवा, तुमच्या स्वत:च्या नावामुळे तुमच्या सभोवतालात निश्चितच फरक पडेल.
आनंद भंडारे.

तिरकी रेघ- संजय पवार


सौजन्य: दैनिक लोकसत्ता
.....................................................
मोदींना कुणाशी संवादच नकोय. अहम् ब्रह्मास्मि! त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जिथे ते जुमानत नाहीत, तिथे मित्रपक्ष काय चीज? असाच 'अहम्' इंदिरा गांधींत शिरला होता आणि 'इंदिरा इज इंडिया' ही घोषणा जन्माला आली होती. मतदारांनी त्यांना 'इंडिया' म्हणजे कोण हे दाखवून दिलं. तसंच आज 'मोदी मोदी' करणारे काही दिवसांनी 'मोडीत' निघू शकतात, हे मोदींसकट मोदीप्रेमींनी लक्षात ठेवावं.
......................
तर आठवले ५२ पत्त्यांत एक जोकर असतो तसे युती असो, आघाडी असो, रिडालोस असो, रंगीबेरंगी अवतारात चारोळ्या करत हजर असतात. मोदींनी अप्रत्यक्षपणे तुमची गरज नाही हे अधोरेखित केले. २५ वर्षे मित्र पक्ष असलेल्या आणि १५ च्या वर खासदार निवडून आणलेल्या सेनेला त्यांनी ओवाळून टाकलेलं अवजड उद्योग खातं दिलं, ते मोदी आठवलेंना मंत्री करणार? राज्यात मंत्रिपद, महामंडळं देणार?

.............................................

२५ वर्षीय स्थानिक मित्रपक्षाला कोंडीत पकडून मोदी अ‍ॅण्ड कंपनी महाराष्ट्र पुन्हा एकदा दिल्लीच्या पर्यायाने गुजरातच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करताहेत.

पण महाराष्ट्राची जनता, 'कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?' या सवालाला 'महाराष्ट्र नेऊन ठेवेल तुम्हाला.. योग्य जागी' असं खणखणीत उत्तर देईल. शेवटी कुठलाही मीपणा महाराष्ट्र खांद्यावर घेत नाही हे मोदींनाही कळणं गरजेचं आहे.
आघाडीला लोकसभेत समज दिली, भाजपला ती इतक्या लवकर द्यावी लागेल असं मतदारांना वाटत नव्हतं. पण नाइलाज को क्या इलाज?
........................................................................................


खरं तर गोष्ट फार सोपी होती. एक वटवृक्ष उन्मळून पडल्यावर उर्वरित झाडेझुडपे साफ करायला फार ताकदीची, कष्टाची आणि वेळेचीही गरज नव्हती. १६ मे नंतर वातावरण पूर्ण बदललं होतं. नव्या अपेक्षा, उत्साह यात देश न्हाऊन निघत होता. महाराष्ट्रही याला अपवाद नव्हता. पुढच्या सहा महिन्यांतच होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेचा निकाल १६ मेलाच लागला होता.
युतीची महायुती झाल्याने सोशल इंजिनीअरिंगही व्यवस्थित झालं होतं. महायुतीतल्या घटक पक्षांची ताकद मर्यादित असली तरी ताकद होती. भाजपमध्ये राहूनही मध्यम कनिष्ठ जाती, भटके विमुक्त, मुस्लिम यांची मोट बांधण्याचे कसब गोपीनाथ मुंडेंनी कमवले होते. युतीची महायुती करण्याची रणनीती यशस्वी ठरली होती. पण मुंडेंच्या आकस्मिक निधनाने बसलेला चटका विधानसभेच्या विजयात परावर्तित करण्याच्या मन:स्थितीत, महायुतीच्या मतदारांसह महाराष्ट्रातली तमाम जनता आघाडी सरकारच्या विसर्जनाची औपचारिकता पार पाडण्यासाठी निवांत झाली होती. प्रचाराला १२ दिवसच मिळणार या बातमीचा मतदारांवर काहीच परिणाम झाला नाही, कारण मनोमन त्यांनी लावायचा त्यांचा निकाल लावला होता. १२ दिवस काय, दोन दिवसांतही त्यांनी स्पष्ट कौल दिला असता.

युतीची महायुती झाल्याने सोशल इंजिनीअरिंगही व्यवस्थित झालं होतं. महायुतीतल्या घटक पक्षांची ताकद मर्यादित असली तरी ताकद होती. भाजपमध्ये राहूनही मध्यम कनिष्ठ जाती, भटके विमुक्त, मुस्लिम यांची मोट बांधण्याचे कसब गोपीनाथ मुंडेंनी कमवले होते. युतीची महायुती करण्याची रणनीती यशस्वी ठरली होती. पण मुंडेंच्या आकस्मिक निधनाने बसलेला चटका विधानसभेच्या विजयात परावर्तित करण्याच्या मन:स्थितीत, महायुतीच्या मतदारांसह महाराष्ट्रातली तमाम जनता आघाडी सरकारच्या विसर्जनाची औपचारिकता पार पाडण्यासाठी निवांत झाली होती. प्रचाराला १२ दिवसच मिळणार या बातमीचा मतदारांवर काहीच परिणाम झाला नाही, कारण मनोमन त्यांनी लावायचा त्यांचा निकाल लावला होता. १२ दिवस काय, दोन दिवसांतही त्यांनी स्पष्ट कौल दिला असता.

पण अश्वमेधावर आरूढ भाजपचे सरदार घोडय़ापेक्षा जास्त फुरफुरू लागले! त्यांच्या अंगात सिकंदर संचारला. त्यात मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने तर १६ मेच्या यशानंतर एनडीएच्या घटक पक्षांना बाजूला काढायचा पणच केला. परिणामस्वरूप चर्चेची गुऱ्हाळं लावत भाजपने 'अचानक झालं', 'दु:खद झालं' असा अभिनय करत युती तोडली. युतीसोबत महायुतीही तुटली. प्रतिक्षिप्त क्रियेसारखी आघाडीही तुटली आणि सरळ सामना पंचरंगी करून भाजपने सोपे गणित कठीण करून टाकले. आकांक्षा जेव्हा लालसेत बदलते तेव्हा अशी विनाशकाले विपरीत बुद्धी सुचते! आता या पंचरंगी लढतीत आघाडीला आपले वस्त्रहरण रोखता येईल. जाती-पातीच्या राजकारणाला ऊत येईल. पैशाचा पाऊस पडेल. 'कुछ भी हो सकता है' अशा वातावरणात आघाडीला पुन्हा सत्ता मिळण्याची स्वप्ने पडली तर तो त्यांचा निलाजरेपणा नाही तर भाजपच्या अहंगंडाने त्यांनी ती संधी दिली आहे.

युती तुटल्यावर भाजपने घटक पक्षांना सोबत ठेवत सेनेची कोंडी करत वर मानभावीपणाने 'आम्ही सेनेवर बोलणार नाही' असा लबाड पवित्रा घेतला. सेनेने मात्र चवताळलेल्या वाघासारखी भाजपवर टीका सुरू केली. बैठकांचे तपशील उघड होऊ लागले. आकडय़ांचे खेळ रंगू लागले. खऱ्याखोटय़ाचे पत्ते उघड होऊ लागले. सपासप वार होऊ लागले. चार महिन्यांपूर्वीच गळ्यात गळे घालणारे एकमेकांचा केसाने गळा कापू लागले. उमेदवार पळवापळवी, लांच्छनास्पद पक्षांतरे, पातळी सोडून केल्या जाणाऱ्या आरोपांना ऊत आला. त्यात 'रुबिक क्युब मास्टर' साहेबाचीच ही खेळी असा एक संदेशही पसरला. दर दिवशी शरद पवारांच्या नावे नवे समीकरण जन्माला येते आहे. साधी सरळ निवडणूक पोरखेळ पातळीवर आणल्याने सर्वपक्षीय मतदार भयंकर नाराज आहे. आपल्याला 'गृहीत' धरून राजकारण्यांचे चाललेले बेशरम चाळे हातावर हात ठेवून बघण्यापलीकडे काही करू शकत नाही.

खरी गोष्ट काय, खोटी गोष्ट काय, चूक कोणाची या तपशिलात जाऊनही सर्वसाधारण मतदारांत भाजपच्या छप्पन्न इंची छातीचा गर्वाने फुगलेला फुगा आणि त्यातल्या अति आत्मविश्वासाच्या हवेने नाराजी आहे. आपण देश जिंकला, आता महाराष्ट्र पादाक्रांत करायला कशाला कुणाची सोबत हवी, ही मग्रुरी जन्मण्याचं कारण नरेंद्र मोदी.

मोदींच्या करिश्म्यावर, जादूवर आपण देशात जसं स्वबळावर सरकार स्थापलं तसं महाराष्ट्रातही स्थापन करू या मनोविकारानं त्यांना पछाडलं. अमित शहा आणि मोदींनी त्याला मूकपाठिंबा दिला. भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे फक्त मोदी, आणि फक्त मोदी म्हणजे विजय या भ्रमाला मधल्या काही पोटनिवडणुकांनी इशारा दिला होता. पण विरोधकांना गणतीत काय खिजगणतीतही न धरण्याची मोदींची अहंमन्य वृत्ती या पराभवाने विचलित होण्याची सुतराम शक्यता नाही. कारण आपल्यातले न्यून झाकायचे आणि बाकीचेच इतके मोठे करायचे की ते 'न्यून' अगदीच न्यून होऊन जावे.

२५ वर्षांची युती आणि सहा महिन्यांपूर्वीची महायुती तोडताना भाजपची कसलीही राजकीय अपरिहार्यता नव्हती. होती फक्त सत्ता लालसा! आज त्यांना ज्या शाब्दिक कसरती कराव्या लागताहेत किंवा सेनेवर न बोलण्याच्या सुसंस्कृत मुखवटय़ाआड त्यांचा दांभिक चेहरा झाकण्याची सोय हे सगळे त्यांना विजयाऐवजी पराजयाकडेच घेऊन जाणार आहे. 'रामा'कडून 'छत्रपती शिवरायांकडे' वळण्याची अगतिकता हे सगळं मतदारांना कळत नसेल? दुधावर ताव मारून मिशा पुसून बसणाऱ्या बोक्यासारखी भाजपची प्रतिमा झालीय.

नरेंद्र मोदींवर, महाराष्ट्रानेच नाही तर दक्षिणेचा आणि पूर्वेचा काही भाग वगळता संपूर्ण देशाने विश्वास टाकला. ते जायंट नाही तर महाजायंट ठरले, पण या प्रवासात त्यांनी विरोधी पक्षासोबत स्वपक्षातल्या लोकांनाही दूर लोटले. मी आणि फक्त मी!

३० वर्षांच्या कालखंडानंतर देशात काँग्रेसेतर पक्षाची स्वबळावर सत्ता आणणारा नेता, आज देशाचा पंतप्रधान आहे. पण दिल्ली सोडून महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेसाठी १०-१२ दिवस ठाण मांडून होते मोदी! शरद पवार सोडले तर ते कुणाशी लढाई खेळत होते? उद्धव आणि राज ठाकरे यांच्याशी! देशाचा पंतप्रधान प्रादेशिक पक्षांच्या दोन तरुण नेत्यांशी दोन हात करण्यासाठी मुक्काम ठोकतो? मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन केलेली सेना सेनाप्रमुखांनी भाजपच्या बरोबरीने हिंदुत्वाकडे वळवली, म्हणून ही जनसंघाची मिणमिणती पणती, भाजपच्या नव्या अवतारात कमळ बनून महाराष्ट्रभर उमलली! अगदी मागच्या निवडणुकांपर्यंत चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला सेनेमुळे सर्वदूर पसरता आलं. आज मोदी काय मिळाले, महाराष्ट्र भाजपला वाटले, आता काय कुणाची गरज? बाळासाहेबांच्या निधनानंतर सेनेला खिंडीत गाठायचे, मातोश्रीचे महत्त्व कमी करायचे आणि वर मोदी म्हणणार बाळासाहेबांच्या स्मृतीला स्मरून, त्यांचं योगदान मानून 'सेने'वर बोलणार नाही! मोदींची चलाखी इथेच संपत नाही. ते म्हणतात, 'केंद्रातून मला महाराष्ट्रात मदत करायची आहे तेव्हा इथे मला प्रतिसाद देणारं, साथ देणारं सरकार हवं आहे, म्हणून भाजपला विजयी करा!' २५ वर्षांचा मित्रपक्ष तुम्हाला तुमचा वाटत नाही? काँग्रेसने जसे गांधी भिंतीवर टांगले तसे बाळासाहेबांना भिंतीवर टांगून तुम्ही सत्ता ओरपणार? वाजपेयी केंद्रात होते तेव्हा महाराष्ट्रातल्या सेनेच्या मुख्यमंत्र्याशी त्यांचा संवाद होता, मग तुमचा का नाही होणार? नाही होणार, कारण मोदींना कुणाशी संवादच नकोय. अहम् ब्रह्मास्मि! त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना जिथे ते जुमानत नाहीत, तिथे मित्रपक्ष काय चीज? असाच 'अहम्' इंदिरा गांधींत शिरला होता आणि 'इंदिरा इज इंडिया' ही घोषणा जन्माला आली होती. मतदारांनी त्यांना 'इंडिया' म्हणजे कोण हे दाखवून दिलं. तसंच आज 'मोदी मोदी' करणारे काही दिवसांनी 'मोडीत' निघू शकतात, हे मोदींसकट मोदीप्रेमींनी लक्षात ठेवावं.

मोदींना व्यक्तिमत्त्व आहे, वक्तृत्व आहे. मनमोहन सिंगांच्या १० वर्षांच्या मौनी कारभारानंतर मोदी म्हणजे मुक्याला कंठ फुटावा तसे झाले. पण लोकांना आवडतेय म्हटल्यावर त्यांनी राज्यकारभारापेक्षा भाषणांचाच सपाटा लावला. परदेशी पाहुणे देशात आणणे किंवा आपण परदेशी जाणे आणि भाषण ठोकणे हा एक नवाच उद्योग सुरू केला. दूरचित्रवाणीचा पडदा कमी पडला, म्हणून आता ते आकाशवाणीवरही बोलू लागले आहेत. या वेगाने ते प्रा. शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर आणि बाबासाहेब पुरंदरेंचाही विक्रम मोडतील!

त्यात आता आत्मस्तुतीही येऊ लागलीय. आजवर अमेरिकेत असं स्वागत, असा मान कुठल्या पंतप्रधानांना ६० वर्षांत मिळाला आहे, असा प्रश्न करून ते विचारतात, 'कुणामुळे मिळाला?' लोक 'मोदी' असे ओरडतात. मग हे नाटय़मय विनयाने 'नही, १२५ करोड हिंदुस्थान की जनता की वजह से!' असं म्हणणार!

'अहम् ब्रह्मास्मि'ग्रस्त मोदीजींना माहिती नाही की, भारतात पंतप्रधान म्हणून सर्वात जास्त लोकप्रियता नेहरूंची होती. नेहरूंचे कपडे पॅरिसला धुवायला जातात हे लोक कौतुकाने सांगत. 'चाचा नेहरू' ही उपाधी त्यांना सहजपणे मिळाली आणि अमेरिका आणि भारत या इतिहासात बघायचं तर नेहरू आणि जॉन केनेडी यांची भेट इतकी गाजली, की लोकांनी घराघरात नेहरू-केनेडींचे फोटो लावले होते. तसे ओबामा-मोदींचे लागले? आणि इंदिरा गांधींनी तर अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता, पूर्व पाकिस्तान तोडून बांगलादेशची निर्मिती केली. याउलट यंदा चीनचे पंतप्रधान येऊन गेले न् गेले तर चीनने घुसखोरी केली आणि पाकशी वाटाघाटी बंद करूनही त्यांनी 'एलओसी'वर भारतीय जवानांना शहीद केले! तेव्हा आमचे पंतप्रधान 'शत प्रतिशत भाजप'साठी बीड, औरंगाबाद, मुंबई फिरत होते. अमेरिकेतला सत्कार सोहळा देखणा भव्यदिव्य होता, पण तो अमेरिकनांनी नाही, तिथल्या भारतीयांनी- त्यातही अधिकतर गुर्जर बांधवांनी केला. चीन, जपान, अमेरिका गुंतवणूक करणार अशा घोषणा होताहेत. पण विरोधाभास असा, की अरुणाचलमध्ये घुसखोरी करून वर आडमुठय़ा राहणाऱ्या चीनला आपण यूपीत तीन एसईझेड मंजूर करून दिले. तिथे कामगार कोण असणार यावरचा निर्णय झालेला नाही, अशी माहिती वाणिज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनीच दिली. अमेरिका दौऱ्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची देहबोली खूप काही सांगत होती. रशियाचा पोलादी पडदा जिथे फाटू शकतो, तिथे मोदींचा 'हम करेसो कायदा' किती दिवस चालणार?

शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंविषयीचा कळवळा म्हणजे मेलोड्रामाचा नवा अवतार! म्हणे, 'गोपीनाथ मुंडे असते तर मला यावं लागलं नसतं!' मग लोकसभेला का फिरलात? मुंडे होते की! मुंडेंची एवढी ताकद मानता तर मंत्रिपद देताना खळखळ का केली आणि मुंडेंची चिता विझायच्या आत संध्याकाळी सहा वाजता त्यांची खाती गडकरींकडे सोपवल्याची बातमीही येते! संपूर्ण प्रचारात मोदी मुंबई आणि महाराष्ट्र असा स्वतंत्र उल्लेख करत होते. कशाला? मुंबई महाराष्ट्रात नाही? मुंबईच्या निवडणुका वेगळ्या होताहेत?

आश्चर्य वाटतं राजू शेट्टींचं! त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात त्यांच्या कृषीमंत्र्यांचे पुतळे जाळले, स्वत: शेट्टींनी महायुतीतून बाहेर पडायची धमकी दिली होती. त्यांच्यासह जानकर, आठवले यांची नावं सोडा, दखलही घेतली नाही. जानकरांनी पंकजाला बहीण मानल्याने त्यांचा नाइलाज आहे; तर आठवले ५२ पत्त्यांत एक जोकर असतो तसे युती असो, आघाडी असो, रिडालोस असो, रंगीबेरंगी अवतारात चारोळ्या करत हजर असतात. मोदींनी अप्रत्यक्षपणे तुमची गरज नाही हे अधोरेखित केले. २५ वर्षे मित्र पक्ष असलेल्या आणि १५ च्या वर खासदार निवडून आणलेल्या सेनेला त्यांनी ओवाळून टाकलेलं अवजड उद्योग खातं दिलं, ते मोदी आठवलेंना मंत्री करणार? राज्यात मंत्रिपद, महामंडळं देणार?

मोदींनी आता भाषणबाजी आणि भपकेबाज योजनांचे इव्हेंट सोडून देश कारभार करावा. ते स्वप्रेमाने इतके आंधळे झालेत की उदाहरण म्हणून त्यांना फक्त गुजरातच दिसतो! शिवराज सिंह चौहान, रमणसिंग या भाजप मुख्यमंत्र्यांचा दाखला सोडा, ते नावही घेत नाहीत. तेही मोदींप्रमाणे सातत्याने निवडून येताहेत. अन्नसुरक्षा योजना काँग्रेसपेक्षा रमणसिंगानी सक्षमपणे राबवलीय. पण मी, मी आणि मी ही प्रतिमा लोक अजून वर्षभर सहन करतील. नंतर हिशेब मागायला लागतील. 'दागी' लोकांना स्थान नाही म्हणणाऱ्या मोदींच्या पक्षाचा अध्यक्ष डझनभर गुन्ह्यांत आरोपी आहे, तर उपाध्यक्ष येडीयुरप्पा भ्रष्टाचारामुळे राजीनामा द्यावे लागलेले वादग्रस्त आणि जातीग्रस्त पुढारी आहेत.

मोदी असल्याने आपण कमरेचे काढून डोक्याला बांधलं तरी लोक खांद्यावर घेतील असं प्रदेश भाजपला वाटल्याने त्यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, अपक्ष, लोकसंग्राम अशा पक्षांतल्या त्यांनीच भ्रष्ट ठरवलेल्या ५५ ते ६० लोकांना उमेदवारी दिली आहे. या दागी राष्ट्रवादी नेत्यांचे समर्थन करताना फडणवीस एखाद्या ह.भ.प. सारखे आपद्धर्म, शाश्वत धर्म वगैरे बडबडत होते. याला धरून मग पुढे समन्वय धर्म, तडजोड धर्म, क्षमा धर्म, पापक्षालन काहीही येऊ शकतं!

मुळात सत्ताधारी जेवढे बेबंद होते, तेवढेच विरोधी सेना-भाजपही निष्क्रिय होते. भ्रष्टाचार हा आघाडीच्या अंतर्गत वादातून माध्यमात पोहचला. विरोधकांचे कार्य शून्य! पण केंद्र सरकारला जसे लोक विटले तसेच इथल्या आघाडीला विटले आहेत. महायुती हा सक्षम पर्याय त्यांना समोर दिसत असताना, २५ वर्षीय स्थानिक मित्रपक्षाला कोंडीत पकडून मोदी अ‍ॅण्ड कंपनी महाराष्ट्र पुन्हा एकदा दिल्लीच्या पर्यायाने गुजरातच्या दावणीला बांधायचा प्रयत्न करताहेत.

पण महाराष्ट्राची जनता, 'कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?' या सवालाला 'महाराष्ट्र नेऊन ठेवेल तुम्हाला.. योग्य जागी' असं खणखणीत उत्तर देईल. शेवटी कुठलाही मीपणा महाराष्ट्र खांद्यावर घेत नाही हे मोदींनाही कळणं गरजेचं आहे.
आघाडीला लोकसभेत समज दिली, भाजपला ती इतक्या लवकर द्यावी लागेल असं मतदारांना वाटत नव्हतं. पण नाइलाज को क्या इलाज?

शेवटची सरळ रेघ- रामदास आठवले म्हणाले, मोदी बुद्धाचाच विचार मांडताहेत. सिद्धार्थाने बोधीवृक्षाखाली तपश्चर्या करून बोधित्व प्राप्त केलं. मोदींचं बोधीत्व ऐकताना रामदास आठवले नेमके कुठल्या झाडाखाली बसले होते हे तपासावे लागेल!

Wednesday 8 October 2014

जेम्स लेन, भांडारकर आणि निवडणुका




राज्यातील निवडणुकांनी आता जातीसंघर्शाचे उग्र रूप धारण केले आहे. मोदींचा सभांचा धडाका, त्यांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद यामुळे उर्वरित चार पक्ष हतबल झाले आहेत.सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायची सगळ्यांचीच तयारी आहे. माणिकराव ठाकरे हे सत्ताधारी को‘न्ग्रेसचे तसेच वाचाळवीर आर.आर.पाटील हे राष्ट्रवादीचे  दुय्यम दर्जाचे नेते. पायाखालची वाळू घसरू लागताच या दोघांनी १० वर्षांपुर्वीच्या जेम्स लेनच्या वादाला पुन्हा हात घालून जातीयवादी प्रचाराला सुरुवात केली आहे.
गेल्या १० वर्षात ज्या आर.आर.च्या गृहखात्याला भांडारकरला या वादात क्लीन चीट द्यावी लागलीय, त्याच आर.आर. नी पुन्हा संशय निर्माण करण्याचा हा उद्योग करावा यातून हा माणूस किती पराकोटीचा जातीयवादी आहे हेच दिसून येते.

५ जानेवारी २००४ ला संभाजी ब्रिगेडने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला. जेम्स लेन याने त्याच्या पुस्तकात जिजामाता नी शिवराय यांचे चारित्र्यहनन केल्याच्या रागापोटी हा हल्ला केला गेला असे सांगितले गेले. जेम्स लेनचा भांडारकर संस्थेशी काहीही संबंध नाही. त्याच्या या लेखनाचा भांडारकरने तीव्र निषेध केलेला आहे. एखादा माणूस एखाद्या संस्थेच्या होस्टेलमध्ये  चार दिवस राहिला नी पुढे २५ वर्षांनी त्याने आपल्या पुस्तकात काही चुकीचे लिहिले तर त्याला ती संस्थाच जबाबदार आहे असा जावईशोध लावणे म्हणजे सापसाप म्हणुन भुई धोपटणे होय. खरे तर २००४ साली होणार्‍या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी नामशेष होणार असा गृहखात्याचा अहवाल आल्याने आर.आर. नी हा निवडणूक प्रचारासाठी जातीयवादी पवित्रा घेतल्याचे एव्हाना उघड झाले आहे. तसे ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी जाहीर भाषणातही सांगितले आहे. आजही मराठा विरूद्ध ब्राह्मण हा जातीयवाद हा प्रचाराचा मुद्दा बनवण्यासाठी आर.आर. आणि माणिकराव यांनी हे झाकलेले "माणिक " म्हणून गाडलेला कोळसा उकरून काढला आहे.

जेम्स लेन हा अमेरिकन लेखक १९८० साली पुण्यात आलेला असताना भांडारकरच्या गेस्ट हाऊसवर चार दिवस राहिला होता. त्याने आपल्या २००३ सालच्या पुस्तकात त्याबद्दल भांडारकरचे आभार मानले आहेत. संस्थेतील व बाहेरील अनेक ब्राह्मण नी ब्राह्मणेतर अभ्यासकांचे त्याने आभार मानलेत. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजूळ यांच्या एका पुस्तकात लेनचा पाश्च्यात्य अभ्यासक म्हणुन उल्लेख आहे. या तीन गोष्टी एकत्र करून लेनला हे लेखन भांडारकरनेच पुरवले असा आरोप ब्रिगेडकडून केला गेला.

आर.आर.च्या पोलीसांना सखोल चौकशीत या कपोलकल्पित आरोपात तिळमात्र तथ्य आढळले नाही. तरिही खुद्द आर.आर. ह्या आरोपाचा फायद्यासाठी पुन्हापुन्हा वापर करीत आहेत. माध्यमांतील चाणक्य आता तरी आर.आर.ला डोक्यावर घेणे बंद करतील काय?

उलट ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरूषोत्तम खेडेकर यांच्या २००३ सालच्या अमेरिका वारीत ते कोणाकोणाला भेटले होते याची चौकशी व्हावी अशी मागणी असताना आर.आर. नी तशी चौकशी कधीही का केली नाही याचे रहस्य आजवर उलगडलेले नाही.

भांडारकर ही जगातील ख्यातनाम संशोधन संस्था आहे. तिला शतकाचा इतिहास आहे. संस्थेत जगातील सर्वात मोठा प्राचीन पोथ्यांचा संग्रह आहे. त्यात सुमारे तीस हजार हस्तलिखिते आहेत. भांडारकरच्या पां.वा. काणे यांना धर्मशास्त्राचा इतिहास लिहिल्याबद्दल "भारत रत्न " मिळाले आहे. जगातील सर्वात मोठा बौद्ध साहित्याचा संग्रह भांडारकर मध्ये आहे. तो जमविण्यसाठी धर्मानंद कोसंबी यांनी सारे आयुष्य वाहून घेतले होते.

छत्रपती संभाजी राजांच्या "बुधभुषण " या ग्रंथाचे प्रकाशन १९२६ साली भांडारकरने केलेले आहे. तो भांडारकरचा ठेवा आहे. तोच नष्ट व्हावा यासाठी संभाजी ब्रिगेडने संस्थेवर हल्ला करावा हे दुर्दैवी आहे.

भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळावर ब्रिगेडचे शंकराचार्य {शिवधर्माचे संस्थापक} डा. आ.ह. साळुंखे यांनी या हल्ल्यानंतर अनेक वर्षे काम केलेले आहे. खेडेकरांचे नागपुरचे नातेवाईक डा.श्रीकांत जिचकार, डा. विजय भटकर आदींनी संस्थेत पदाधिकारी म्हणुन काम केलेले आहे.गेले कित्येक वर्षे ब्रिगेड नी मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक {राणे समितीचा मराठा आरक्षणाचा अहवाल लिहिणारे} डा. सदानंद मोरे या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आहेत.

मराठा समाजाचे प्रमुख नेते शामराव सातपुते हे संस्थेत कित्येक वर्षे काम करीत आहेत. मराठा समाजातले असंख्य अभ्यासक भांडारकरशी संबंधीत आहेत.

तरिही निवडणुकीच्या तोंडावर हा वाद उकरून काढणे ही मराठा राज्यकर्त्यांची हातचलाखी आहे. त्याला आपण बळी पडणार का?

ब्रिगेडचे भाजपातील समर्थक मा. विनोद तावडे यांच्या भुमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे....
............................................................................=====......................................................................................................................

Saturday 4 October 2014

ओबीसींच्या समस्या सुटणार का?

Prakash Pol यांच्या सौजन्याने


'अच्छे दिन आयेंगे' म्हणत मोदीनी भारतीय जनतेला विकासाचे स्वप्न दाखवले आणि कांग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या दहा वर्षांच्या बेजबाबदार कारभाराला कंटाळलेल्या जनतेनेही मोदीना भरभरुन प्रतिसाद दिला. गेल्या पंचवीस वर्षात पूर्ण बहूमत मिळवून भाजपा आणि मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आले. कांग्रेसचे तर पूर्ण पानिपत झाले. त्याना विरोधीपक्ष नेतेपदही राखता आले नाही. ममता बॅनर्जी
यांचा तणमूल कांग्रेस आणि जयललिता यांचा अण्णा द्रमुक वगळता इतरांचे पानिपत झाले. भाजप च्या मित्रपक्षांचाही फायदा होऊन शिवसेना, लोकजनशक्ती पार्टी याना यश मिळाले. भाजपला तर पूर्ण बहुमत मिळून त्याना कुणाच्याही कुबड्यांची गरज भासली नाही. कांग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कांटाळलेल्या जनतेने मोदींच्या आश्वासक चेहर्याकडे पाहून भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले. याआधी भाजप राममंदिर, रथयात्रा अशा प्रकारे धर्म, धार्मिक प्रतिके आणि त्यामाध्यमातून धर्माच्या आधारावर मतांचे ध्रूवीकरण करत सत्तेवर आला होता. भाजपला सत्तेवर येण्यासाठी बाबरी पतन आणि तिथे राममंदिर उभारण्याचा मुद्दा परिणामकारक ठरला होता.
मंडल आयोगाच्या अमलबजावणीनंतर देशाचे पूर्ण राजकारण बदलून गेले. राजकीय द्रुष्ट्या जाग्रुत नसलेल्या ओबीसी समाजाला मंडल मुळे आत्मभान आले. ओबीसी vote bank ही सर्वात प्रबळ असून तीला डावलून देशाचे राजकारण करणे शक्य नाही हे सर्वच राजकीय पक्षानी ओळखले होते. मंडलचा परिणाम म्हणून अनेक ओबीसी नेत्यांचा उदय राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील राजकारणात झाला. भाजपने मात्र मंडल विरोधी वातावरण निर्मीती करुन 'मंडल विरुद्ध कमंडल' हा नारा दिला. मंडलविरोधी भूमिका घेवूनही राममंदिराच्या मुद्द्यावर भाजपने ओबीसी मतदार हातातून निसटून दिला नाही. RSS च्या माध्यामातून जाणिवपूर्वक ओबीसी समाजामध्ये प्रचार प्रसार करुन ओबीसीमध्ये संघाचे कट्टर प्रचारक तयार केले. ओबीसींच्या समस्या, अडचणी ओळखून त्यावर भाष्य करायला चालू केले. संघाच्या रणनीतिचा भाग म्हणून ओबीसी नेत्रुत्व पुढे आणून त्या त्या भागातील प्रस्थापित नेत्रुत्वाला/प्रस्थापित समाजघटकाला शह देण्याचाही प्रयत्न केला. माहाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे तर संघाच्या माध्यमातूनच प्रमोद महाजन यानी वंजारी समाजातील गोपीनाथ मुंडे यांचे नेत्रुत्व पुढे आणले. त्याचप्रमाणे धनगर समाजातील अण्णा डांगे याना पुढे आणून महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचा समाज भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केला गेला. महाराष्ट्रातील प्रस्थापित मराठा समाजाला/मराठा राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न माधव (माळी-धनगर-वंजारी) pattern वापरुन केला. राज्यातील सत्तेची समीकरणे माधवं pattern ने बदलून टाकली.
कांग्रेस किंवा राष्ट्रवादी या पक्षांचे राजकारण महाराष्ट्रात मराठा समाजाभोवतीच फिरत राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील ब्राम्हण नेत्रुत्व क्षीण होत गेले. हळूहळू ब्रह्मणानी महाराष्ट्राच्या राजकारणातून काढता पाय घेतला. यशवंतराव चव्हाणप्रेरित बेरजेच्या राजकारणाने राज्यात कांग्रेसचा पाया मजबूत झाला. चाणाक्ष कांग्रेसने मराठा असलेल्या यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धूरा सोपवली आणि कांग्रेसचा राज्यातील जनाधार वाढायला सुरवात झाली. बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून शेतकरी कामगार पक्षाला खिंडार पाडून मातब्बर मराठा नेते कांग्रेसच्या गोटात आणले. यामध्ये यशवंतराव मोहिते, आनंदराव चव्हाण (प्रुथ्वीराज चव्हाण यांचे वडील) यांचा समावेश होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात कांग्रेसचा जनाधार प्रचंड प्रमाणात वाढला. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून मराठा वर्चस्वाच्या राजकारणाला सुरवात झाली. त्यानंतर वसंतराव नाईक, बॅरिस्टर अंतुले, मनोहर जोशी यांचा अपवाद वगळता मुख्यमंत्री मराठा समाजाचाच राहिला आहे. बहुतांशी मंत्री, आमदार, खासदार मराठाच होते. परिणामी ओबीसी समाजामध्ये राजकीय पोकळी निर्माण झाली होती. ओबीसी समाजामध्ये अपवाद वगळता खंबीर, स्वतंत्र नेत्रुत्व पुढे येवू शकले नाही. जे ओबीसी नेते म्हणून समोर आले ते त्यांच्या त्यांच्या पक्षाची गरज, पक्षाला मिरवायला असावा म्हणून एखादा ओबीसी चेहरा अशी अवस्था ओबीसी नेत्यांची झाली. त्यामुळे ओबीसी ना महत्वाची पदे मिळाली की त्याविरुद्ध नाराजीचा सूर प्रस्थापित राजकीय नेत्यामधून दिसून येतो. छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्याच पक्षातील काही नेत्याना वाईट वाटलं होतं.
कांग्रेसच्या मराठा वर्चस्ववादी राजकारणाला पायबंद घालण्याचे कामही दिल्लीतील पक्ष नेत्रुत्वाकडून होत होते. वसंतराव नाईक, अंतुले यांच्यासारख्या मागास किंवा अल्पसंख्यांक जातीतील नेत्याना मुख्यमंत्री करणे, यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर शरद पवारांचे खच्चीकरण करणे यामाध्यमातून कांग्रेस पक्ष नेत्रुत्व इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि त्यानंतर सोनिया गांधी यानी हाच मार्ग पत्करला. या सर्व गोष्टींची जाणीव असल्यानेच शरद पवारानी कांग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रावादी कांग्रेसची स्थापना केली. अल्पावधीतच या पक्षाने अभूतपूर्व यश मिळाले. पवारांच्या तोंडात नेहमी फुले-शाहू-आंबेडकर आणि पुरोगामी भाषा. पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीशी कोणत्याही राजकीय नेत्याचे नसतील इतके घनिष्ठ संबंध शरद पवारांचे आहेत. पवारानीही महाराष्ट्राचे राजकारण ओळखून पक्षाला पुरोगामी, सर्वसमावेशक चेहरा देत असल्याचे भासवले. प्रत्यक्षात मात्र राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष एकाच जातीपुरता मर्यादित राहिला. ओबीसी चेहरा म्हणून दाखवायला छगन भुजबळ होतेच. परंतु गेल्या काही वर्षात पक्षातच त्यांचे झालेले खच्चीकरण सर्वानाच माहित आहे. प्रवक्ता म्हणून एखादा नवाब मलिक नेमले कि मुस्लिम प्रतिनिधीत्व असल्याचा भासही होतो. परंतु गेल्या काही वर्षातील राष्ट्रवादीची वाटचाल पाहिली तर हा पक्ष फक्त मराठा या जातीपुरता मर्यादित झाल्याचे दिसून येते.
या पक्षात भुजबळ सोडले तर एकही आश्वासक बहुजन, दलित, ओबीसी चेहरा नाही. पक्षाची बहुतांशी महत्वाची पदे ही मराठा नेत्यांच्या ताब्यात आहेत. पश्चिम महाराष्ट्र जो मराठाबहुल भाग आहे, जिथे अनेक प्रबळ मराठा घराणी आहेत तिथेच राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येते. पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, शैक्षणिक संस्था या मराठा समाजातील व्यक्तींच्या मालकीच्या आहेत. याच संस्थात्मक जाळ्याच्या आधारे काही घराण्यांचे राजकारण खोलवर रुजले आहे. ही सर्व घराणी, सहकार सम्राट, शिक्षण महर्षी हा राष्ट्रवादीचा मजबूत आधार आहे. हे सर्व लोक मराठा असल्याने राष्ट्रवादीला त्यांच्या पक्षात जास्तीत जास्त मराठा समाजाला समावून घेण्याची कसरत करावी लागते. कांग्रेस राष्ट्रवादीचे हे मराठा वर्चस्ववादी राजकारण ओळखून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ओबीसी जातीना हाताशी धरुन राज्यातील प्रस्थापित राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न चालवला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीआधी गोपीनाथ मुंडे यानी पुढाकार घेवून विविध समाजिक घटक भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केला. गेल्या पंचवीस वर्षांच्या संघर्षाने धनगर आणि ओबीसी समाजात आपले स्थान निर्माण करणार्या महादेव जानकर याना मुंडे यानी युतीमध्ये घेतले. महाराष्ट्रात ओबीसी नेत्रुत्व पुढे आले पाहिजे असे वाटणार्या जानकरानी लगेच मुंडेना साथ दिली. यानंतर मुंडे यानी राजू शेट्टी, विनायक मेटे यानाही युतीत सामील करुन त्याचे रुपांतर महायुतीत केले. रामदास आठवले तर आधीपासूनच होते.
अशा रितीने अनेक मागास समाजघटकाना सामावून घेवून, गडकरी, फडणवीस हे ब्राह्मण चेहरे, मुंडे, खडसे हे ओबीसी चेहरे वापरुन भाजपने इथल्या मराठा वर्चस्ववादी राजकारणावर आघात करायला सुरुवात केली. दुसर्या बाजूने शिवसेनेनेही अनेक ओबीसी चेहरे पुढे आणून भाजपचाच कित्ता गिरवला. या सर्व राजकीय घडामोडीमध्ये ओबीसी समाजाची मात्र कुचंबना होत राहिली. तथाकथित धर्मनिरपेक्ष कांग्रेस आणि बेगडी पुरोगामी राष्ट्रवादी कांग्रेस याना साथ द्यावी तर मराठा वर्चस्वाच्या राजकारणात आपल्या वाट्याला काहीच येत नसल्याची भावना आणि भाजप-सेनेला साथ द्यावी तर जातीयवादाला हातभार लावल्याचा दोष अशा कात्रीत ओबीसी अडकला आहे. परंतु सध्या तरी ओबीसीचा कल भाजप आणि मित्रपक्षांकडे दिसतो आहे. ओबीसी मोदीना पंतप्रधान आणि ओबीसी शहाना पक्षाध्यक्ष करुन भाजपने ओबीसी vote bank capture करायची मोहिमच आखली आहे. त्यात आता कट्टर हिंदूत्व सौम्य करुन मोदी विकासाची, परिवर्तनाची भाषा बोलायला लागलेत. त्यामुळे त्यांच्या या भाषेला ओबीसी न भुलले तर नवलच. पण इतके सर्व करुन ओबीसीना सत्तेत वाटा मिळेल, जसे पंतप्रधान मोदी ओबीसीच आहेत. परंतु सर्वच क्षेत्रात अधोगती झालेल्या ओबीसींच्या समस्या सुटणार का हा खरा प्रश्न आहे.
-प्रकाश लालासाहेब पोळ....