Tuesday 20 August 2013

नरेंद्र दाभोलकर : महाराष्ट्राचा विवेकवाद--- प्रा.हरी नरके


                                                   


चार दिवसांपुर्वी नरूभाऊंचा फोन आला होता. "हरी, लेखाचे लक्षात आहे नारे बाबा?" अशी सुरुवात करून बराच वेळ बोलत होते. बार्टीच्या वतीने  {डा. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण  संस्था, पुणे}" महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मुलन विचाराची वाटचाल" या विषयावरील पुस्तक ते संपादीत करीत होते.त्यासाठी मी "सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक चळवळीचे अंधश्रद्धा निर्मुलनातील योगदान " हा लेख द्यायचे कबूल केलेले होते. गेल्या दोन महिन्यात पाठपुराव्यासाठी त्यांची पत्रे आणि फोन आले होते.
नरूभाऊंचा स्वभाव  अतिशय आर्जवी आणि संयमी होता. ते  काटेकोर शिस्तीचे होते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या तोडीचा उत्तम संघटक दुसरा सापडणे केवळ अशक्य.त्यांची जुन्याजाणत्यांपासून युवा पिढीतील अनेकांशी गट्टी होती.आपल्या विचारांशी ते ठाम असले तरी कोणताही टोकदार मार्ग ते टाळत असत. कायम आपले म्हणणे अत्यंत विनयपुर्वक, युक्तीवादाच्या आधारे मांडीत असत. त्यांच्यासारख्या ऋजु स्वभावाच्या नेत्यावर खुनी हल्ला व्हावा हे भयानक आहे. हादरवणारे, सुन्न करणारे आहे. फुले, शाहू. आंबेडकर, आगरकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात आज कोणीही विवेकी माणूस सुरक्षित आहे असे वाटत नाही.
अंधश्रद्धा निर्मुलन चळवळीचे ते एक महत्वाचे नेते  होते. शाम मानव यांच्यासोबत काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. गेली १८ वर्षे राज्यात अनिष्ट प्रथा आणि जादूटोणा विरोधी विधेयक संमत व्हावे म्हणून दाभोळकर झटत होते. हे विधेयक त्वरित पारित करणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.
राज्याच्या पुरोगामी चळवळीतील एक खंदा कार्यकर्ता आज आपण गमावला आहे. विवेकवादाचा आवाज दाबण्यासाठी कार्यरत असलेल्या विचारशत्रूंनी ही हत्त्या केली असावी असे वाटते. गेली अनेक वर्षे ते "साधना" साप्ताहिकाचे संपादक होते. त्यांनी या साप्ताहिकाला एक नवे कलदार आणि कसदार रूप प्राप्त करून दिले. ते अतिशय प्रभावी वक्ते आणि लोकप्रिय क्रिडापटू होते. कबड्डी या खेळातील ते राज्यपातळीवरील नामवंत खेळाडू होते. सामाजिक कृतज्ञता निधी आणि महाराष्ट्र फौंडेशनचे समन्वयक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने आज पुरोगामी चळवळीचा आवाज हरपला आहे.
अंधश्रद्धा निर्मुलनाचा त्यांनी ध्यास घेतलेला होता.ते या चळवळीचे जणू प्रतिकच बनले होते. त्यांची या विषयावरील असंख्य पुस्तके प्रसिद्ध आहेत. नरूभाऊ हे मुळात सातार्‍यातील एक नामवंत डाक्टर. लक्ष्मण माने, वर्षा देशपांडे आदींना सातार्‍यात आणून सामाजिक कामात उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.समतावादी चळवळीत सक्रीय झाल्यानंतर त्यातच ते इतके गुरफटून गेले की वैद्यकीय व्यवसायासाठी वेळ देणे त्यांना शक्य झाले नाही.
मी शाळकरी वयात त्यांच्या भाषणांचा चाहता होतो.१९८२ साली नामांतर आंदोलनात  त्यांच्यासोबत ठाण्याच्या तुरुंगात  एकाच कोठडीत असताना त्यांचा मला प्रदीर्घ सहवास लाभला.त्यांच्याशी रात्रंदिवस मारलेल्या गप्पा आजही स्मरणात आहेत. ते आमचे हिरो होते. समता आंदोलन या संघटनेत त्यांच्या नेतृत्वाखाली मी काही वर्षे काम केले.मी साधनेत अधूनमधून लिहित असे.ते साधनाचे संपादक झाले तेव्हा प्रा. रामकृष्ण मोरे यांनी राज्यात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला.त्याला प्रचंड विरोध झाला.स्वत: नरूभाऊ त्याच्या जबरदस्त विरोधात होते. मी मात्र या निर्णयाचा समर्थक होतो. त्यांनी साधनेचा एक विशेषांक त्यावर काढला. त्यात दुसरी बाजू यायला हवी म्हणून मी लेख लिहावा किंवा शिक्षण मंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत घ्यावी असे नरूभाऊंनी सुचवले. अवघ्या दोन दिवसात हे करायचे होते.त्या मुलाखतीसाठी मी खूप आटापिटा केला होता. मी घेतलेली मोरेसरांची मुलाखत पुढे अत्यंत गाजली.पहिल्यांदा मोरेसर मुलाखत द्यायला तयारच नव्हते. साधना हे साप्ताहिक  मूठभर लोक वाचतात, त्यात मुलाखत दिली काय नी नाही दिली काय, काय फरक पडतो? असे त्यांचे मत होते. आज दाभोळकरांनी प्रचंड परिश्रमाने साधनेला मिळवून दिलेली लोकप्रियता आणि उंची बघायला मोरेसर असते तर ते नक्कीच चकीत झाले असते.साधना बालदिवाळी अंकाचा लाखभर खप ही मोठी गोष्ट आहे. . नरूभाऊंचा एकखांबी तंबू नव्हता. युवा संपादक म्हणून विनोद शिरसाठ या युवकाला नरुभाऊंनी आपल्या तालमीत तयार केले. तो साधना उत्तम चालवित आहे.
नरूभाऊ तत्वनिष्ठ असले तरी अव्यवहारी नव्हते. मिडीयाचे ते डार्लिंग होते. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची किमया त्यांना साधलेली होती.अनेक ख्यातनाम व्यक्तींशी जुळवून घेण्याची कला त्यांनी आत्मसात केलेली होती. त्यांच्या नाना तर्‍हा सांभाळण्यात नरूभाऊ वाकबगार होते. एक ना धड भाराभर चिंध्या असे मात्र त्यांनी कधीही केले नाही. गेली २५ वर्षे चिकाटीने त्यांनी "अनिस"चे काम लावून धरले. अनेक बाबा,बुवांचे भंडाफोड केले.आम्ही मात्र त्यांना गमतीने नरेंद्र महाराज दाभोळकर म्हणत असू. औरंगाबादला  त्यांच्यावर आणि डा.श्रीराम लागूंवर हल्ला झाला तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. त्यावेळी डा. लागूंचा हल्लेखोरांपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यासोबत चार रट्टे मीही खाल्ले आहेत.
नरूभाऊ फार चाणाक्ष होते. आमच्या चळवळीचे ते चाणक्यच होते. अत्यंत धोरणी आणि हिशोबी. १४ वर्षांपुर्वी राज्यातल्या एका बड्या मुत्सद्दी आणि धूर्त नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी सार्वत्रिक निवडणुकांच्या  काळात भल्याभल्यांना कामाला लावले होते. "लोकशाही प्रबोधन व्यासपीठ" ची उभारणी करून लोकशाही, पुरोगामी, धर्मनिरपेक्ष शक्तींना मतदान करा असे सांगण्यासाठी हा दौरा आखण्यात आला होता. नरूभाऊ आमचे सारथी होते. डा.लागू, निळू फुले, सदाशिव अमरापूरकर या बड्या ग्ल‘मरवाल्या लोकांसोबत एक लिंबूटिंबू म्हणून मीही असायचो. राज्याच्या सर्व प्रमुख शहरातील  ह्या सभा फार गाजल्या. पुढे अनेक वर्षे आम्हाला या सभांचा खरा सूत्रधार माहितच नव्हता. बर्‍याच वर्षांनी आपल्याला कोणी कामाला लावले याची निळूभाऊंना कुणकूण लागली. डाक्टरांचे सगळ्या राजकारण्यांशी मधुर संबंध असत. कोणाला भेटायला जाताना कोणाचा उपयोग करून घ्यायचा याचे त्यांचे गणित अचूक असे. ते राजकारण्यांच्या सोबत असत. आणि तरीही त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून त्यांच्यावर ते तुटूनही पडत.
सामाजिक कार्यकर्त्यांना दरमहा काही आर्थिक पाठबळ देता यावे या हेतूने "सामाजिक कृतज्ञता निधी" जमा करायचे ठरले. बाबा आढाव, पुष्पा भावे आदींनी त्यासाठी "लग्नाच्या बेडीचा" दौरा आखला. त्या नाटकात तनुजा, लागू, निळूभाऊ, सुधीर जोशी असे अनेक दिग्गज भुमिका करीत होते. दौर्‍यात या सर्वांची सोय करणे हे सोपे काम नव्हते. नरूभाऊच ते काम करू जाणेत.नरूभाऊंनी हा "साकृनि"आजवर सांभाळला.
अमेरिकेच्या सुनिल देशमुख यांच्याशी नरूभाऊंची मैत्री होती.  महाराष्ट्र फौंडॆशनचे ते गेली काही वर्षे समन्वयक होते. अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. मात्र सगळ्याच कामात शक्ती खर्च करण्याऎवजी दोनतीन ठिकाणीच त्यांनी सगळी शक्ती केंद्रीत केलेली होती.आणि ती कामे चिकाटीने लाऊन धरलेली होती.त्यामुळे त्या कामांवर ते आपला ठसा उमटवू शकले. त्यांची ही मोहर{मुद्रा} अखंड राहील.
नाशिकच्या एकनाथ कुंभारकरने आंतरजातीय विवाह केलेल्या नऊ महिन्यांच्या गरोदर मुलीची,प्रमिला कांबळेची निर्घृण हत्त्या केली.जातपंचायतीच्या दहशतीमुळे त्याने हे अघोरी कृत्य केले. अनेकांनी त्याविरुद्ध आवाज उठवला.नरुभाऊंचे टायमिंग फार अचुक असे. नरुभाऊंनी नाशिकला तातडीने मोर्चा संघटित केला. परिषद लावली.परवा लातुरलाही "जातीला मूठमाती द्या" ही परिषद घेतली. त्यानिमित्ताने मी त्यांच्याशी चर्चा करीत होतो. जाती संघटना आणि जात पंचायती यांचे पोशिंदे राजकारणी आहेत, निवडणुकीत जातीचे गठ्ठा मतदान मिळावे म्हणून ते याला रसद पुरवतात, त्यांच्यावरच हल्ला करायला हवा असे माझे मत होते, आहे.नरूभाऊ म्हणाले, "हे करण्याएव्हढे आपण शक्तीशाली नाही.ते करायचे तर "पर्यायी राजकारण" करावे लागणार.आजतरी तसे करणे मला परवडणारे नाही."
मध्यंतरी मी संभाजी ब्रिगेडचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडॆकर यांच्या जातीद्वेश पसरवणार्‍या पुस्तिकांचा साधार पंचनामा करणारे लेख लिहिले. सर्व ब्राह्मण पुरुष जातीय दंगली घडवून जाळून किंवा कापून मारण्याच्या खेडॆकरांच्या भुमिकेचा पर्दाफास केला.ते लेख मी साधनाकडे पाठवले.सतत सावधचित्त असणार्‍या नरूभाऊंनी मराठा संघटनांच्या दहशतीमुळे हे लेख छापायला चक्क नकार दिला.नरुभाऊ धाडशी होते,पण ते धाडस हिशोबी होते हे मला कळून चुकले. त्यांची आज हत्त्या व्हावी हे चिंताजनक आहे. निषेधार्य आहे.
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन आम्ही नगर जिल्ह्यात लावले होते. नरुभाऊंनी शनी शिंगणापुरला घराला कुलुपे नाहीत,चोर्‍या होत नाहीत या अंधश्रद्धेवर आघात करण्यासाठी, त्याचवेळी "चला चोर्‍या करायला, चला शिंगणापुरला" अशी मोहीम घोषित केली. आमच्या परिषदेवर संकट आले.आम्ही चिडलो. "त्यांनी हीच वेळ का निवडली? अंधश्रद्धा वाईटच आहेत पण चोर्‍या करणे नैतिक कसे?" यावर माझा त्यांचा कडाक्याचा वाद झाला.चळवळीतील अंतर्गत वादावर बहुधा भुमिका न घेण्याचे व त्याद्वारे अजातशत्रू राहण्याचे कौशल्य त्यांना साधलेले होते.
व्यक्तीची हत्या करून विचारांची हत्त्या होत नसते.उलट विचार अधिक मजबूत होतात.शहीद डा. नरेंद्र दाभोळकर अमर झाले आहेत. अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा तातडीने मंजूर करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
..................................................................









No comments:

Post a Comment